प्रेमळ व सुस्वाभाची छाप कायम!

    43

    [संत आशाताई निकोडे जन्म दिन]

    संत नेहमी जगाला प्रेमाचे दान करतात. स्वतः जळून मेणबत्तीप्रमाणे इतर मानवांना प्रकाश देतात. अंधार असो वा प्रकाश, दोन्ही परिस्थितीत ते प्रसन्न चित्ताने प्रकाशाचीच उधळण करित असतात. संत निरंकारी मिशनच्या संतश्रेष्ठ आशाताई निकोडे या अशाच सेवाभावी संत होऊन गेल्या. त्या आपल्या सहकारी निरंकारी सेवदलच्या महान परोपकारी भगिनींच्या बरोबर सेवा, सत्संग व सुमिरण यांत सदैव तत्पर असत. आपला प्रपंच नेटका व सुखमयी करता करताच त्यांनी परमार्थही प्राणपणाने प्रज्ज्वलित केला. संत्संगात त्या नेहमी गीत गात असत – “वदनी वदावी सदा अमृत वाणी। जीवन बनवी देवा निर्मळ पाणी।। देव पाहिल्यावर देवासारखे। निर्मळ हे मन पाहिजे, हे जीवन पाहिजे।।”

    संत आशाताईचा जन्म दि.१८ मे १९७१ रोजी गरीब शेतकरी संत तुळशीराम गुरनूले व संत पार्वताबाई या दांपत्याच्या कुटुंबात झाला. त्यांचे जन्मगाव गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील देलोडा बुजरूक हे होय. जन्मापासूनच त्या साध्या व सद्गुणी होत्या. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण जन्मगावीच पूर्ण केले. उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी त्या इतर शाळकरी मुलींसोबत दररोज सुमारे ३ किमी अंतरावर असलेल्या वडधा येथील शाळेत पायी पायी जात असत. त्यांचा विवाह दि.७ जून १९९१ रोजी झाला. प्राथमिक शिक्षक व संतप्रवृती असलेले त्यांचे पती कृष्णकुमार निकोडे हे याच तालुक्यातील पिसेवडधा येथील रहिवासी पण नात्यातीलच होते. त्या काही काळ पतीसोबत नोकरीच्या गावी राहिल्या. तेथेही त्यांनी आपल्या प्रेमळ व सुस्वभावाची छाप पाडली. त्या नेहमी गुणगुणत असत – “सारी दुनिया का तूही करणधार है। बिना तेरे ना किस को लगा पार है।। फिर तो हम को फिकर कौन से बात की। भूखे मरने की हो या तो खैरात की। कहता तुकड्या यही मेरा निर्धार है।।” नंतर त्या प्रियंका व दुर्वांकूर या दोन मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून पतीपासून दूर मध्यवर्ती अशा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मुलांसह राहू लागल्या.मुलांना त्यांनी आईबापाचे प्रेम देत वाढविले व सुसंस्कृत केले. स्त्रीपुरुषाची सर्व जबाबदारी त्या एकट्याच पार पाडत. पती पंधरा दिवस ते एकेक महिनापर्यंत घरी येत नसतानाही त्यांनी आपला प्रपंच नेटका ठेवला होता.

    संत आशाताई कृष्णकुमार निकोडे या संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक विचार प्रवाहाशी सन १९९८ मध्ये समरस झाल्या. त्यांनी निरंकारी बाबा प. पू. सद्गुरुदेव हरदेवसिंहजी महाराजांचे पवित्र ब्रह्मज्ञान आत्मसात केले. ते पवित्र ब्रह्मज्ञान त्यांनी लाखांदूर जिल्हा भंडारा येथील ज्ञानप्रचारक महात्मा संतश्रेष्ठ पांडुरंगजी गुरनूले यांच्या करकमलांद्वारे प्राप्त केले. तेव्हापासून त्यांनी स्वतःला मानव सेवेत झोकून घेतले होते. शेजारीपाजारी, आप्त इष्टमंडळी यांच्याकडे किंवा निरंकारी सत्संग-संतसमागम अशा ठिकाणी होणाऱ्या सेवाकार्यात त्या स्वखुशीने सहभाग घेत असत. त्यात लंगरच्या स्वयंपाकातील तयारीची कामे, पाणी वाटप, झाडलोट व स्वच्छतेची कामे यात त्यांचा अवश्यच सहभाग असे. मदतीला धावून जात, त्यांच्या सुखदुःखात त्या स्वकीयांसारख्या मिसळून जात असत. आपल्या प्रेमळ व मृदू वाणीने त्या इतर अनोळखी व्यक्तींनाही मंत्रमुग्ध करून मैत्री साधत. मिशनच्या कार्यासाठी आपल्या सहकारी सेवादार भगिनी संत मीराबाई चोपकार यांच्यासोबत सर्वप्रथम नियोजित स्थळी उपस्थित होत आणि सर्व सेवाकार्ये आटोपून सर्वात शेवटी ते स्थळ सोडत. सद्गुरच्या कार्याला त्या प्रथम प्राधान्य देत असत.

    त्यांनी आपले आईवडील, भाऊबहिणी, जवळच्या नातलगांना तसेच मित्रमंडळींनाही मिशनच्या आध्यात्मिक विचार धारेशी जुळवून आणले. त्या संत संगतीची महती पटवून देताना म्हणत – “संतांच्या संगती मिळते मनाला शांती! येऊनी बसावे या संतांच्या पंगती!! संत संगत धरा हो आला आहे मोका। निरंकारी संत हे गर्जून सांगती।।” ते सर्वजण सद्गुरू व निरंकार परमात्म्याचे गुणगान गात सन्मार्गावर चालू लागले. अशाप्रकारे त्या मिशनच्या प्रचार व प्रसार सेवाकार्यातही खऱ्या उतरल्या. दारात आलेल्या याचकांना त्यांनी कधीच रिकाम्या हाताने जाऊ दिले नाही. तृषार्थास पाणी, भुकेल्याला अन्न, गरजूंना धन-राशी, वस्त्रप्रावरणे आदी दानधर्म करत असत.

    म्हणतात ना,”जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला!” या उक्तीप्रमाणे अशा महान संत आशाताई निकोडे यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग जडल्याच्या कारणाने नश्वर देहाचा त्याग केला. त्या दि.६ एप्रिल २०२१ रोजी वयाच्या अवघ्या ४९व्या वर्षी ब्रह्मलीन झाल्या. एका कवीवर्यांनी म्हटलेच आहे – “अशी पाखरे येती, स्मृती ठेवुनीया जाती! दोन दिसाची रंगतसंगत, दोन दिसांची नाती!!” अशा त्यांच्या अल्पवयात निघून जाण्याने गडचिरोली साधसंगतमधील एक खरी सेवाभावी संत हरपल्याची खंत कायम राहिलच..!

    !! पुरोगामी संदेश परिवारातर्फे जन्म दिनामित्त संत आशाताईंना व त्यांच्या सेवाभावी तथा प्रेमळ स्वभावांना कोटी कोटी दंडवत प्रणाम !!

    ✒️संत चरणरज:-दास : श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.[संत व लोक साहित्याचे गाढे अभ्यासक.]C/o – प.पू. गुरूदेव हरदेव कृपानिवास, मु.एकता चौक – रामनगर, गडचिरोली.जि. गडचिरोली, मोबा. ७७७५०४१०८६.
    इमेल – Krishnadas.nirankari@gmail.com