✒️बोरघर/माणगांव,प्रतिनिधी(विश्वास गायकवाड )
नवी मुंबई(दि.21मे):-येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असून या विमान तळाला स्वर्गीय दि .बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी समाजातून उठत आहे. आज या मागणीचे रूपांतर आंदोलनात झाले असून रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसीलदार यांना भारत मुक्ती मोरच्या च्या वतीने निवेदन देण्यात आले. ज्या जमिनीवर आज आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे ती जमीन आमची भूमीपुत्रांची असून या भूमीत जन्मलेल्या किसान पुत्र दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे. अशी भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, सिडको आणि जेएनपीटी बंदर न्हावा शेवा प्रकल्प ग्रस्तांचा बुलंद आवाज असलेले लोकनेते दि बा पाटील अर्थात दिनकर बाळू पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील उपरोक्त प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी पोलीसांच्या लाठीचार्ज चा सामना करावा लागला होता. शेतकरी, कष्टकरी, कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी अग्रेसर असलेले लोकनेते दि बा पाटील पनवेल उरण विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा आमदार तर महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार होते.
दि बा पाटील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. सन १९ ९९ साली त्यांनी शेतकरी कामगार पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या नंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. अशा या लोक नेत्याचे नाव नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे या करीता भारत मुक्ती मोर्च्याने संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन करून दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास देण्यात यावे अशी मागणी सरकारकडे केली आहे.
नवी मुंबई येथील भूमिपुत्रांना न्याय मिळावा म्हणून भारत मुक्ती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली कोळी कोपर येथे मोठे आंदोलन करण्यात आले होते. तेथील शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात भारत मुक्ती मोर्चाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आता या विमानतलाला दि बा पाटील यांचे नाव देण्यास सरकारने टाळाटाळ केली तर जिल्ह्यात मोठे आंदोलन करण्याचा इशारा या वेळी भारत मुक्ती मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री विजय आवासकर यांनी दिला आहे.