प्रतिकूल परिस्थितीतही रेशीम शेतीतून आणली समृद्धी- कल्याणा येथील 11 शेतकऱ्यांनी मिळून केली रेशीम शेती

    40

    ✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

    बुलडाणा(दि.31मे):-सगळीकडे कोरोनाची दहशत असताना शेतकरी राजा मात्र काळ्या मातीत राब राब राबत होता. कृषी क्षेत्र गतीमान ठेवून अर्थचक्र फिरवित होता. यामध्ये जिल्ह्यातील शेतकरीही मागे नव्हता. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शेतीतून समृद्धी आणण्याचा प्रयत्न बळीराजाचा सुरूच होता. जिल्ह्यातही याचे उदाहरणे समोर आली. मेहकर तालुक्यातील कल्याणा येथील 11 शेतकऱ्यांनी एकत्र येत रेशीम शेती केली. त्यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीतून रेशीम शेतीतून समृद्धी आणली आहे.

    रेशीम शेती मधील किटक संगोपनाची कामे साधारणतः उन्हाळ्यात बंद असतात. परंतु या वर्षी प्रतिकूल परिस्थिती सुद्धा कल्याणा ता. मेहकर येथील 11 शेतकऱ्यांनी मनरेगा अंतर्गत रेशीम कीटक संगोपन घेतले. तसेच यशस्वीपणे पुर्ण केले. अंदाजे 650 ते 700 किलो ग्रॅम कोष उत्पादन त्यांना होणार आहे. सध्या रु.280 ते 310 प्रति किलोग्रॅम भाव कोषबाजारात आहे. या उत्पादनातून सदर शेतकऱ्यांना अंदाजे रु 1.5 ते 2 लक्ष रूपयांचे उत्पन्न निश्चितच मिळणार आहे. अवघ्या 18 दिवसात त्यांनी कोषाचे संगोपन पूर्ण केले आहे. तुती लागवड करून तुती पानांचा रेशीम कीटकांना खाद्य म्हणून उपयोग केला जातो. त्यापासून रेशीम कोष निर्मिती होते. असे कोष जालना, पूर्णा, पाचोड व इतर कोष खरेदी करणारे व्यापारी यांना विक्री केली जाते.

    सन 2020-21 मध्ये कल्याणा येथील युवा शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रेशीम विकास प्रकल्प राबविण्याचे ठरविले. या 11 लाभार्थ्यांनी रेशीम अधिकारी कार्यालयात नोंदणी केली. उद्योगाची परिपूर्ण माहिती घेतली. माहे जून 2020 मध्ये तुती लागवड रोपांद्वारे करून नोव्हेंबर 2020 मध्ये रेशीम कीटक संगोपन गृह बांधकाम केले. मनरेगा अंतर्गत कामा नुसार यथायोग्य मजुरी व तुती लागवडीच्या रोपांची रक्कम मिळाली. पहिले पीक हिवाळ्यात घेतले, परंतु पहिले पीक, त्यात ऋतुमानानुसार येणाऱ्या अडचणींमुळे सरासरी उत्पन्न मिळाले. परंतु इतक्यावरच समाधान न मानता उन्हाळ्यातील प्रतिकूल परिस्थितीत रेशीम कीटक संगोपन घेण्याचे त्यांनी ठरविले. साधारणतः उन्हाळ्यात 40-43 डीग्री से.ग्रे तापमानात रेशीम किटक संगोपन घेतले जात नाही. परंतु तापमान कमी करण्याच्या सर्व उपाययोजना करण्याचा त्यांनी निर्धार केला.

    त्यासाठी संगोपन गृहाच्या नेटला पोते बांधून ड्रीपच्या पाईप ने पाणी सोडण्याची व्यवस्था केली. त्यासाठी गणेश उर्फ राजू नरहरी ठाकरे यांनी संगोपन गृहाशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडावर सिंटेक्स टाकी चढवली व त्यातून ठिबक च्या पाईप द्वारे पाणी पोत्यांवर सोडले. पूर्ण संगोपन होई पर्यंत 30 ते 33 से ग्रे तापमान कायम राखले. बुलडाणा येथील जगदीश गुळवे यांचे कडून बाल किटक (चॉकी म्हणजे दोन अवस्था पूर्ण झालेले रेशीम कीटक) घेतले. त्यानंतर प्रौढ किटक संगोपन 15 ते 20 दिवसांचे ऐन उन्हाळ्यात सुरू केले. वेळोवेळी रेशीम कार्यालयाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. सर्वांनी अतिशय मेहनतीने, जिद्द व चिकाटीने किटक संगोपन पूर्ण केले. सर्वांचे रेशीम कोष तयार झाले असून कोष विक्री साठी 15 दिवसात तयार झाले आहेत. उन्हाळ्यात कोष उत्पादन कमी होत असल्याने रेशीम कोषाचे दर वधारले आहेत. त्याचा फायदा नक्कीच या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना होईल.

    अंदाजे 650 ते 700 कि ग्रॅम कोष उत्पादन झाले आहे. सध्या 280 ते 310 रु प्रति कि.ग्रॅम दर असून त्यांना 1.5 लक्ष ते 2 लक्ष रूपये उत्पन्न 15 दिवसांच्या मेहनतीने त्यांना नक्कीच मिळणार आहे. या यशस्वी संगोपनाची श्रेय ते महेंद्र ढवळे, सहायक संचालक, विभागीय कार्यालय, अमरावती यांना देतात. तसेच मनरेगा अंतर्गत वेळोवेळी सहकार्य केल्याबाबत डॉ गरकल, तहसीलदार, मेहकर आणि करोना काळातही प्रत्यक्ष क्षेत्रीय भेट देउन मार्गदर्शन केल्या बद्दल सु.प्र. फडके, रेशीम विकास अधिकारी यांना देतात.