पावनखिंडीचा रणझुंजार : बाजी प्रभू !

    44

    (बाजी प्रभू देशपांडे प्राणार्पण दिवस)

    बाजी प्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडावर सुखरूप पोहोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले. घोडखिंडीचा लढा आणि बाजी प्रभूंच्या स्वामीनिष्ठेची कथा मराठ्यांच्या जनमानसावर शेकडो वर्षे अधिराज्य गाजवत आहे. या कथेवर विपुल लिहिले गेले आहे. तर बाबूराव पेंटर यांनी सन १९२९मध्ये ‘बाजी प्रभू देशपांडे’ या चित्रपटाच्या माध्यमातून बाजीप्रभूंच्या पराक्रमाच्या स्मृती जतन करून ठेवल्या आहेत.

    जीवन: बाजी प्रभू देशपांडे यांच्या परिवाराबद्दल व जन्म तारखेविषयी कुठेही उल्लेख आढळून येत नाही. ते पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. ते हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. परंतु प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले.

    बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा महाराजांना समर्पित केली. ते पराक्रमी लढवय्ये तर होतेच. तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी व कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते.

    घोडखिंडीचा लढा: सिद्दी जोहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते. बाजीप्रभू हे बांदल यांचे सरदार होते. रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि सुमारे ६०० बांदल मावळे यावेळी महाराजांसमवेत होते. त्या वेळी आपली फसवणूक झाली, हे लक्षात येऊन विजापुरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत- घोडखिंडीत सिद्दीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या संख्येतील सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी व त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली.

    ही खिंड कोल्हापूर जिल्ह्यात आहे, तीला आज पावनखिंड म्हणून ओळखले जाते. सिद्दी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्रावतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. ही घटना दिनांक १३ जुलै १६६० रोजी घडली.

    मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजी-फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वराज्यनिर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप, सुरक्षित राहायला हवेत यासाठी स्वत: मृत्यूला सामोरे जायची तयारी असलेल्या बाजी प्रभू आणि फुलाजी देशपांडेंसारख्या सरदारांमुळे स्वराज्याचा पाया रचला जात होता. परंतु ही हिर्‍यांसारखी अमूल्य माणसे सोडून गेलेली पाहताना महाराजांना काय वाटत असेल? हे सांगणे कठीणच! बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.
    !! पुरोगामी संदेश परिवारातर्फे स्मृती दिनी त्यांना व त्यांच्या स्वामीनिष्ठेला विनम्र अभिवादन !!

    ✒️संकलन व शब्दांकन:-श्री. कृ. गो. निकोडे गुरुजी.
    (म.रा. डि.शै. दै.रयतेचा वाली- लेख विभाग प्रमुख व गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी तथा थोरांचा इतिहास अभ्यासक.)मु. पो. ता. जि. गडचिरोली (७७७५०४१०८६).