समाजकल्याण मध्ये बार्टीच्या समतादूतांना कायम शासकीय सेवेत घ्या : संदेश भंडारे

25

🔸उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी

✒️तासगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

तासगाव(दि.28जुलै):-तासगाव – डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्ष संस्था तथा बार्टीतील राज्यभरातील कंत्राटी समतादूतांना कायम शासकीय सेवेत घ्यावे व बार्टीला 1200 कोटींचा वाढीव निधी द्यावा अशी मागणी सांगली जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य तथा आरपीआयचे लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदेश भंडारे यांनी भेटून केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना अजितदादा पवार हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने तासगाव येथे भेट घेऊन उपमुख्यमंत्री पवार यांना भेटून विविध प्रश्नांच्यावर चर्चा केली. यावेळी पालकमंत्री ना जयंतराव पाटील उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे,आस्थापनेवरील मानधन तत्वावरअसणारी कंत्राटी पदे प्रकल्प अधिकारी व समतादूत यांना कायम सरळ सेवेत समाविष्ट करून समाज कल्याण विभागात कायमस्वरूपी पदनियुक्ती करणे महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॅा. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत महाराष्ट्रात राज्यभर जानेवारी 2015 पासून समतादूत प्रकल्प सुरु आहे. या समतादुत प्रकल्पांतर्गत बार्टीच्या प्रशासनाच्या आदेशाने जिल्हास्तरावर कार्यरत प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समतादूतांकडून संपुर्ण महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यात, खेडो-पाडी, वाड्या-वस्त्या, तांड्यामध्ये छत्रपती शाहू महाराज,महात्मा जोतीबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, सर्वथोर संत-महापुरुष यांचे समतेचे विचार व भारतीय संविधानातील शिकवण-स्वातंत्र्य,समता,न्याय व बंधुता, स्त्री-पुरुष समानता, अंधश्रध्दा निर्मुलन व जातीय दुर्भावना निर्मुलन इत्यादी बाबींवर प्रबोधनाच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत विचार व शिकवण पोहचवण्याचे महत्वपुर्ण कार्य समतादूतांनी केलेले आहे.

शासनाच्या अनेक योजना तालुका स्तरावर पोहचवण्याचे काम समतादूत प्रकल्पातील प्रकल्प अधिकारी व समतादुत यांच्या मुळे अतिशय कमी वेळेत व प्रभावीपणे राबवणे सोईस्कर झाले.कोविड 19 महामारीच्या काळात प्रकल्प अधिकारी व समतादुत यांनी राज्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्रातील परराज्यात अडकलेले मजूर व कामगार तसेच परराज्यातील महाराष्ट्रात अडकलेले मजूर व कामगार यांना त्यांच्या स्वग्रही परतण्यासाठी राबवण्यात आलेल्या अभियानात समन्वयक म्हणून अत्यंत महत्वपूर्णव जबाबदारीचे कामकाज केलेले आहे. तरी या सर्वांचा विचार करून त्यांना शासनाने कायम सेवेत समावेश करून घ्यावे. अशी मागणी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य तथा आरपीआय जिल्हाध्यक्ष संदेश भंडारे यांनी केली, यावेळी दलित महासंघाचे नेते तुकाराम सदाकळे, मुन्ना कोकणे, प्रवीण मोरे, तालुकाध्यक्ष प्रविण धेंडे, राजू लोंढे, धोंडीराम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.