आता मंगल कार्यालयात 50 लोकांचा उपस्थितीत लग्न सोहळ्यास परवानगी

28

🔹चंद्रपूर(पुरोगामी नेटवर्क)

चंद्रपूर, (दि.23 जून): कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी 50 लोकांच्या मर्यादेत लग्नसमारंभास परवानगी आहे. परंतु, पावसाळा सुरू झाला असल्यामुळे राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने आता मंगल कार्यालयात 50 लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळ्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

50 लोकांच्या मर्यादेत घराच्या परिसरात लग्न समारंभ साजरे करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे 50 लोकांच्या मर्यादेतच सोशल डिस्टसिंग पाळून खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह येथे लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी देण्याबाबतच्या विविध मागण्या शासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत.

या सर्व सूचना व मागणी विचारात घेता तसेच आता पावसाळा सुरू झाला असल्यामुळे खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्नसमारंभ पार पाडण्यात येणार आहे. नागरिकांकडून मागणी प्राप्त झाल्यास परवानगी देण्यात येणार आहे.