शिवसैनिकांच्या हिंदुहृदयसम्राटाचा १० वा स्मृतिदिन

    42

    सहा डिसेंबर 1956 पासून दादरच्या चैत्यभूमी शिवाजी पार्क परिसर दरवर्षी पंचवीस तीस लाख लोक विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनाला वंदन करण्यासाठी येतात.त्यांचे रिकार्ड मराठी हिंदू ह्र्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर संपून जाईल असे अनेक मराठा समाजाचे स्वताला सुवर्ण समजणारे कट्टरपंथीय शिवसैनिक म्हणत होते.कारण स्वताला सुवर्ण समजणाऱ्या मराठा समाजाच्या रक्तात दलित मुस्लीम समाजा विरोधात जहर पेरण्याचे काम मराठी हिंदू ह्र्दय सम्राट बाळ ठाकरे यांनी केले होते.जे बाळ कडू पाजले होते ते आज ही कायम आहे.त्याला निमित्य होते २७ जुलै१९७८ ला मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ हे नांव देण्याचा विधानसभा विधानपरिषद मध्ये एकमताने मंजूर झालेला ठराव.

    त्यामुळेच मुंबई ठाण्यापुरती मर्यादित असलेली शिवसेना ग्रामीण भागातील खेड्या पाड्यात “जय शिवाजी जय भवानी” घोषणा घेऊन पोचली.त्यात मराठा ओबीसी समाजाचे गांवगुंड असलेले पोर शिवसैनिक झाले.त्याची सुरवात ठाण्यातून झाली.सध्या गाजत असलेल्या धर्मवीर सिनेमात पोलीस अधिकाऱ्यांनी पकडलेल्या गुंडांना सोडविण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब येतात आणि सांगतात हे तुमच्या रिकार्ड मध्ये गुंड असतील पण ते माझे कट्टर शिवसैनिक कार्यकर्ते आहेत.तोच रिक्षावाला वाहन चालक,नगरसेवक आमदार झालेला शिवसैनिक आज मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाचा स्मृतिदिन कशा पद्धतीने साजरा करतो.हा आत्मचिंतन व परीक्षणाचा विषय आहे.
    स्वर्गीय बाळ ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली.१९५० मध्ये ते फ्री प्रेस जर्नल मध्ये व्यंगचित्रकार म्हणून कामाला लागले होते.

    पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्या समवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच ठाकरे विविध संस्थांसाठी,कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे, व्यंगचित्रे जाहिरातीचे डिझाइन बनवून देण्याचे काम करीत होते. त्यांच्या व्यंगचित्रात विशेष इंदिरा गांधीची व्यक्तिरेखा आवडती होती.त्यामुळेच ते जास्त प्रसिद्धीच्या झोतात राहत असत.

    बाळासाहेबांनी फ्री प्रेस जर्नल मधली नोकरी सोडून स्वतःचे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट १९६० मध्ये मार्मिक हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना वडील प्रबोधनकारांनी सुचविले होते. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक होते. ‘मार्मिक’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंत राव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. या समारंभास प्रा.अनंत काणेकर उपस्थित होते. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण मुंबईतील मराठी माणसावर अनेक प्रकारे अन्याय होत होता. या प्रश्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना ठाकरेंनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून महत्वपूर्ण आणि लक्षवेधी टीका करत होते.त्यामुळे मराठी माणसांचे प्रबोधन आणि परिवर्तन होत होते.

    स्वर्गीय बाळ ठाकरे त्यामुळे ते १९६० पासून ते राष्ट्रीय व राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत,तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी माणसांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. माननीय बाळ ठाकरेंनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली होती. त्यावेळी त्यांच्या मते,समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे. पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार आहे. महाराष्ट्रात पैसा भरपूर आहे पण मराठी माणूस गरीब आहे. महाराष्ट्राला भारताची औधोगिक राजधानी असलेले राज्य म्हणून मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (विशेष मुंबईत) अपमानित होत होता.

    शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतीर्थावर आजच्या शिवाजी पार्क मैदानावर संपन्न झाला होता.त्यावेळी राज्यातील अंदाजे ५ लाख लोकांचा सहभाग होता असे सांगण्यात येते. त्या वेळेच्या मेळाव्या पासूनच बाळ ठाकरे आणि शिवतीर्थावरील शिवाजी पार्क वरील मराठी माणसांची गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली.

    स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे कुशल वक्ते संघटक होते. त्यांची ठाकरी भाषा मराठी माणसांच्या ह्रदयाला भिडणारी होती.आणि वक्तृत्वा बरोबरच बाळासाहेब ठाकरे यांची लेखणी तलवारीच्या धारेपेक्षा तेज होती. केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे आणि प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात नेहमी जाणवायचा.पण प्रबोधन कार ठाकरेचे क्रांतिकारी विचार अंमलात आणण्याचे धाडस बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच केले नाही.म्हणूनच त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेला मावळा,शिवसैनिक त्यांनी घडविला नाही तर मनुवादी हिंदुत्व मानणारा गोब्राम्हण प्रतिपालक सैनिक त्यांनी घडविला. त्यांच्या निधनानंतर काही वर्षातच त्याचा कट्टरपंथीय हिंदू शिवसैनिक त्यांचा वारसा सोडून गेला.त्यामुळेच शिवसैनिकांच्या हिंदुहृदयसम्राटाचा १० वा स्मृतिदिन कसा साजरा होणार याचा पोलिसावर मोठा दबाव आहे. कालचा बाळकडू पिऊन मोठा झालेला बाळ सैनिक आज पेशवाईचा कट्टर मानसिक गुलाम झाला आहे.त्यांचे एकच उदिष्ट आहे.

    स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेची शिवसेना मुळासकट नष्ट करायची. हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांना शिवसैनिकांनी “हिंदुहृदयसम्राट” म्हटले. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणाही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग होती.मनुवादी विचारांच्या राजकीय पक्षाने भाजप लहान भाऊ म्हणून मोठ्या भावाची शिवसेनेची हत्या घडवून आणली असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही.

    १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईतील बांद्रा कलानगर मातोश्री या निवासस्थानी बाळ ठाकरे यांचे निधन झाले.त्याला १७ नोव्हेंबर २०२२ ला दहा वर्ष पूर्ण होत आहेत. मराठी माणसांच्या न्याय हक्कसाठी स्थापन झालेली शिवसेना आणि तिचे संस्थापक शिवसेना प्रमुख यांनी मुंबई ठाण्यातील मराठी तरुणांना प्रस्थापित राजकीय पक्षाच्या विरोधात मूलभूत समस्यावर हल्ला बोल करून स्थानिक नगरसेवक,आमदार,खासदारांना जेरीस आणले होते,कायदेशीर कायदेकानुन सनदशीर मार्गाचा अवलंब न करता तोडफोड करून दंगली घडवून दहशत निर्माण केली होती. स्थानिक मराठी लोकाधिकार समितीच्या नांवाने सर्व ठिकाणी परप्रांतीय कामगारांची होणारी भारती याविरोधात प्रस्थापित कामगार संघटना,युनियनच्या विरोधात संघर्ष करून मराठी तरुणांना नोकरीत घेण्यास भाग पाडले होते. कंपनीचा मालक असो की व्यापारी, बिल्डर,बँक मॅनेजर यांच्या घरात कार्यालयात घुसून तोडफोड करून तोंडाला काळे फासून दहशत निर्माण केली होती.

    त्याविरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी नोंदी झाल्या पण ठोस कारवाई झाल्याची नोंद नाही.त्यावर उपाय योजना करण्यास सत्ताधारी राजकीय पक्ष अपयशी ठरले. त्यामुळेच स्थानिक पातळीवर दहशत निर्माण करणारी शिवसेना मुंबई ठाणे महानगरपालिका मध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यास यशस्वी झाली होती. त्यांचे शाखा प्रमुख नगरसेवक झाले,नगरसेवकांचे आमदार झाले.त्यांनी दलित मुस्लिम समाजा विरोधात सतत गळल ओकली त्यामुळे मराठी हिंदू ह्र्दय सम्राटावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. त्यावेळी शिवसेना प्रमुखांची जाहीर धमकी होती माझ्या केसाला हात लावला तर उभा महाराष्ट्र पेटेल!.किंवा पेटून टाकील आणि त्यांचे परिणाम वाईट होती.या वक्तव्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था कायमस्वरूपी धोक्यात आली होती.पोलीस अधिकारी प्रत्येक वेळी कारवाई करण्यात मोठा धोका आहे असे रिपोर्ट सत्ताधारी पक्षाच्या गृहमंत्री,मुख्यमंत्री यांना सादर करीत होते.यामुळेच मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत राज्यात होती ती आता दहा वर्षात मनुवाद्यांनी बाळकडू पिलेल्या शिवसैनिकांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन संपविली.ती एवढा लवकर संपेल ही मराठी माणसांना अपेक्षा नव्हती. अशा मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसैनिकांच्या हिंदुहृदयसम्राटाच्या १० वा स्मृतिदिनास भावपूर्ण श्रदांजली.

    ✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप,मुंबई)मो:-९९२२०४०३८५९