चिमूर येथील स्टेट बँकेत ग्राहकांना त्रास-वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

650

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9423608179

चिमूर(दि.21मार्च):-भारतीय स्टेट बँक शाखा चिमूर येथे बँकेच्या कारभारापायी बरेच ग्राहक त्रस्त आहेत. या बँकेत ग्राहकांना फक्त वर्षातून एकदाच खातेपुस्तक ( पासबुक) दिले जाते. बँकेचा असा कोणताही नियम नसताना वर्षातून एकदाच पासबुक का? इतर सर्व बँकामध्ये एक पासबुक भरले की, दुसरे पासबुक देण्यात येते.

या बँकेत अनेक गोष्टींचा ग्राहकांना सतत त्रास होतो. सदर बँकेत कर्ज प्रकरणे अनेक दिवस मंजूर केली जात नाही, त्यात काही त्रुटी असल्या तर संबंधित ग्राहकांना कळविल्या जात नाही. ग्राहकांकडून कागदपञे घेतली जातात पण ती प्राप्त झाल्याची प्रत देण्यात येत नाही.
बँकेच्या ग्राहकांना सभ्यतेची व सौहार्दपूर्ण वागणूक दिली जात नाही. एखादी ग्राहक कामासाठी गेला तर गावातील कितीही प्रतिष्ठित माणूस असला तरी त्याला बराच वेळ उभेच ठेवण्यात येते. बसा म्हणण्याची तसदीही घेत नाही. इथे अनेक कर्ज प्रकरणे पेन्डीग ठेवली जातात.

ग्राहकांना जेव्हा गरज असते अशावेळी तो बँकेकडे कर्ज मागणीसाठी जातो. ही बँक एक राष्ट्रीयकृत बँक आहे. इथे अनेक गोष्टींसाठी ग्राहकांना ञास होत असल्यामुळे अनेक ग्राहक इतर बँकेकडे कर्ज मागणीसाठी जातात त्यामुळे या बँकेचे पर्यायाने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. चिमूरला या बँकेची शाखा उघडल्यापासूनचे काही ग्राहक आहेत. परंतू येथील प्रशासनाच्या कंटाळापायी अनेक ग्राहकांनी सदर बँकेकडे आता पाठ फिरविली आहे. या बँकेत विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शासकीय योजनाव्दारे शॆक्षणिक कर्ज मिळते. परंतू शॆक्षणिक कर्जाच्या मागणीचे अर्ज अनेक दिवस पेन्डीग ठेवण्याचे अलिखित धोरण या बँकेने आखले आहे.

कर्जाच्या मागणीचे अर्ज किती दिवसात पारित केले पाहिजे, असे या बँकेवर बंधन नसल्याचे संकेत आहेत. कर्ज मागणी अर्जातील त्रुटीही संबंधितांना कळविण्यात येत नाही व त्याची त्वरित पूर्तताही करून घेतली जात नाही. काही ग्राहक वर्षानुवर्षे या बँकेशी व्यवहार करतात पण त्यांचीही दखल या बँकेकडून घेतली जात नाही.

चिमूर शहरात महाराष्ट्र बँक, को— आॅपरेटीव्ह बँक, अँक्सिस बँक,अनेक पतसंस्था, सहकारी सोसायट्या व नव्याने एचडीएफसी बँक आली आहे, इतर बँकेत ग्राहकांना कोणत्याही कामासाठी फारसा त्रास होत नाही. परंतू या बँकेला ग्राहकांची गरजच नाही, अशाप्रकारचा व्यवहार इथे सुरू आहे. वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांचे सदर बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. इथे आलेल्या सर्व कर्ज प्रकरणांची चॊकशी करून ही किती दिवसापासून पेन्डीग ठेवली आहेत याबाबत योग्य ती कारवाई व्हावी अशी अनेकांची मागणी आहे.

बँकेच्या अधिकारी व कर्मचार्यांनी एकदम अहंकार बाळगू नये. कारण यापूर्वी काही बँका बंद झाल्यात व कर्मचारी देशोधडीला लागले याची कितीतरी उदाहरणे आहेत. नागपूर व वर्धा जिल्ह्याची को— आॅपरेटीव्ह बँक बंद झाली व तेथील अनेक कर्मचारी व त्यांची कुटुंब यांची उपासमार झाली व ते बेरोजगार झाले. कृपया स्टेट बँक शाखा चिमूरने आपल्याकडील कामे महिनोगिनती पेन्डीग न ठेवता ती त्वरित पूर्ण करावी. इथे खोटे बोलण्यालाही मर्यादा व सीमारेषा नाही. शुद्ध खोटे बोलून काम टाळण्याची व आजचे काम पुढे ढकलण्याची प्रवृत्ती इथे बळावली आहे. तरी या सर्व बाबींचा वरिष्ठांनी तात्काळ मागोवा घेवून तसे या बँकेला दिशानिर्देश द्यावे असे सर्वसामान्य ग्राहकांचे मत आहे. या बँकेला त्वरित कामे करणे शक्य नसेल तर ही शाखा काढण्यामागे हेतू काय आहे? असा सवालही काही ग्राहकांनी केला आहे.