आज विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांसारखा आत्मविश्वास निर्माण करणे आवश्यक. – प्रा.अरुण बुंदेले डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज आचरणात आणण्याची गरज. – श्री पी.बी.वनस्कर

83

 

अमरावती ( प्रतिनिधी )
” भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थी जीवन प्रेरणादायी आहे. बाबासाहेब विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणतात की, आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी
व बुद्धिमान होऊ शकतो.कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही. 24 तासापैकी 18 तास अभ्यास केल्यामुळे इंग्लंडमधील ज्या अभ्यासक्रमाला आठ वर्षे लागतात तो मी दोन वर्षे तीन महिन्यात पूर्ण केला.यावरून बाबासाहेबांची अभ्यासविषयक जिद्द व चिकाटी किती होती हे दिसून येते.आजच्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांसारखा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण केल्यास ते प्रज्ञावंत व गुणवंत बनू शकतात.” असे विचार प्रमुख वक्ते ” आदर्श अभ्यासाचे तंत्र ” या पुस्तकाचे लेखक प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.
ते श्री संत रविदास जीवन विकास बहुउद्देशीय संस्था, अमरावती तर्फे आयोजित सर्वोदय कॉलनी येथील संस्थेच्या कार्यालयात संपन्न झालेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते पदावरून विचार व्यक्त करीत होते.
भीमजयंतीच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पी.बी.वानस्कर ( ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ) , प्रमुख वक्ते साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले,प्रमुख अतिथी श्री अनिल भागवतकर (अध्यक्ष ,श्री संत रविदास जीवन विकास बहुउद्देशीय संस्था,अमरावती.) दिनेश भागवतकर,गोपाल चंदन, नगरसेवक संजय वानरे,दिनेश चापके,संजय गव्हाळे होते तर श्रीकृष्ण मोहोकर,गणेश भागवतकर,रमेश भटकर,संजय खंडारे,विशाल इंगळे,प्रभाकरराव बुंदिले,मधुकर विरूळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम अध्यक्ष,प्रमुख वक्ते व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.
अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी स्वतःच्या ” निखारा ” या काव्यसंग्रहातील ” डॉ.बाबासाहेब आंबेडकर ” हे वंदनगीत सुमधूर आवाजात गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून श्री पी.बी.वनस्कर यांनी ,” डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी जी सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्रांती केली त्याची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी झाली. त्यांनी लिहिलेल्या संविधानाचे
काटेकोरपणे अमलबजावणी झाल्यास संपूर्ण भारत सुखी, समृद्ध होऊ शकतो ; म्हणून बाबासाहेबांचे विचार आचरणात आणण्याची आज गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.”
याप्रसंगी प्रमुख अतिथी श्री अनिल भागवतकर,गोपाल चंदन, दिनेश चापके,संजय गव्हाळे, दिनेश भागवतकर यांनी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री संजय खंडारे तर आभार कृष्णा मोहकर यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता
अल्पोपहाराने झाली.