शेतकऱ्यांना पिककर्ज तात्काळ द्या अन्यथा शिवसंग्राम प्रत्येक बँक शाखेपुढे करणार बोंब मारो आंदोलन

    45

    ✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

    बीड(दि.4सप्टेंबर):-अख्ख्ये खरीप सिझन संपत आले आहे, शेतकऱ्यांना आवश्यक असणारे पीककर्ज अद्याप नगण्यच वाटप झालेले आहे. प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचे पीककर्ज वाटपाकडे दुर्लक्ष होत आहे, त्यांना शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष देणे महत्वाचे वाटत नाही. तात्काळ पीककर्ज वाटपात गती आली नाही तर शिवसंग्राम शेतकऱ्यांना सोबत घेऊन शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांच्या सूचनेवरून व जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जवाटप करणाऱ्या संपूर्ण बँक शाखांपुढे बोंब मारो आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसंग्राम तालुकध्यक्ष नवनाथ प्रभाळे यांनी दिला आहे.

    बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीककर्जाची अत्यंत आवश्यकता असताना बँकांकडून वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात विलंब केला जात आहे. महाविकास आघाडीचे सत्ताधारी लोकप्रतिनिधी या वाटपास गती यावी यासाठी कसलेही प्रयत्न करताना शेतकऱ्यांना दिसत नसून शेतकऱ्यांकडे खते, आंतरमशागतीसाठी कसलीही पुंजी शिल्लक नसून शेतकरी हवालदिल झालेला आहे. एकतर पेरणी शेतकऱयांनी आपल्याकडे असलेल्या सोनेचांदीची मोडतोड करून केली आहे, अत्यंत गरज असूनही बँका पीककर्ज देत नाहीत, महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचे नेते मंडळी नुसत्या घोषणा करून अंमलबजावणी बाबत कसलीच तत्परता दाखवत नाहीत. तात्काळ पीककर्जाची गती वाढली नाही तर बँकांसमोर शिवसंग्राम शेतकऱ्यांना सोबत घेऊन बोंब मारो आंदोलन करणार असल्याचा इशारा तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे यांनी दिला आहे. सदर निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले. हे निवेदन देताना शिवसंग्राम सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुनील शिंदे, युवक ता.अध्यक्ष गणेश साबळे, शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष अक्षय माने, नेते पंडीत माने, सुमित_मोरे, लगुरे आदींची उपस्थिती होती.