शिवराज भंडरवाड यांना जीवन रक्षक पुरस्कार प्रदान

26

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.7ऑक्टोबर):- तालुक्यातील मांजरम येथील जि.प.हायस्कुलचा विद्यार्थी शिवराज रामचंद्र भंडरवाड (इयता १० वी) यांस भारत सरकार कडून दिला जाणारा राष्ट्रीय जीवन रक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे ,आकर्षक स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र व एक लक्ष रुपयांचा चेक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

दरवर्षी हा पुरस्कार दिल्ली येथे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या उपस्थितीत भव्य समारंभात दिला जातो परंतु यावर्षी महामारी मुळे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत, केंद्र सरकारच्या वतीने राज्य सरकारकडे हा पुरस्कार पाठवण्यात आला.त्याचे आज नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकरावजी चव्हाण व जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या हस्ते हा पुरस्कार शिवराज याला नियोजन भवन नांदेड येथे देण्यात आला.

यावेळी शिवराजच्या संपूर्ण कुटुंबाचाही सत्कार करण्यात आला. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने ,रेखाताई काळम-पाटील , गंपुराज घुमे, बी. पी.बनवणे रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, विशाल पा. शिंदे, सोनकांबळे सर ( मुख्याध्यापक), शहाणे सर( तलाठी) व शिवराजचे नातेवाईक या कार्यक्रमात उपस्थित होते.

शिवराज ने मागीलवर्षी नाल्यात वाहात जाणाऱ्या दोन व्यक्तीचा जीव वाचवण्याचा धाडसी पराक्रम केला होता त्यामुळे भारत सरकारने जीवन रक्षक पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला आहे.हा पुरस्कार मिळावा म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक सोनकांबळे सर यांनी विशेष प्रयत्न केले.

त्यांना गावातील तरुण तडफदार व्यक्तिमत्व रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी मंत्रालयात राज्याचे माजी कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पाठपुरावा केला होता ,मागच्या सरकारच्या काळात केंद्राकडे पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केला गेला होता. तो पुरस्कार केंद्राने पाठवला व आज 5 ऑक्टोबर रोजी वितरित झाला आहे.

जिल्हा परिषद नांदेड च्या वतीनेही शिवराजच्या धाडसाचे राष्ट्रीय स्तरावर कौतुक घडवून आणण्यासाठी विशेष ठराव घेऊन शासन स्तरावर प्रयत्न करण्यात आले होते.