“स्त्री शिकली तर धर्म बाटेल” म्हणणारे सर्वात पुढे आहेत

29

भारतीय स्रिया नवरात्रात खूप उत्सवाने भाग घेऊन नऊ दिवस उपास तपास आणि नऊ दिवस नऊ कलरच्या साड्या टिकल्या शृंगार करून देवीची आराधना करतात. पण ज्या खऱ्या देवीने शेण माती चिखल दगड धोंडे, अपमानास्पद वागणूक सहन करून स्वता शिक्षण घेतले आणि संपूर्ण स्रियांना शिक्षणाचे दरवाजे कायमस्वरूपी उघडे करून दिले तिला ह्या सुशिक्षित सुरक्षित ठिकाणी नोकऱ्या करणाऱ्या एकूण सर्वच जाती धर्माच्या स्रिया विसरतात. “स्त्री शिकली तर धर्म बाटेल” म्हणणारे सर्वात पुढे आहेत.

त्या महिलांना ही आज जो काही मानसन्मान मिळतो तो केवळ सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या काष्टामुळे त्यागामुळे त्या त्यागमूर्ती माता सावित्रीबाई फुले यांची जयंती सावित्री उत्सव ३ जानेवारी २०२१ एक वेगळी आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरी करण्याची प्रतिज्ञा अनेक स्रियांनी घेतली आहे.त्यातील ह्या सुशिक्षित सुरक्षित स्रियांनी व्यक्त केलेलं मनोगत आणि प्रतिज्ञा त्यांच्या कडून इतर सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्या महिलांनी प्रेरणा घ्यावी यासाठी हा लेखप्रपंच.साधारण इयत्ता ८ वी,९ वी मध्ये असतानाच मी शिक्षिका व्हायचे ठरवले होते.

सन १९९८ मध्ये मी ताराबाई मोडक अध्यापक विद्यालयातून अ+श्रेणी मिळवून डी.एड पास झाले. त्यानंतर पुढे १२ वर्षे मला कायमस्वरूपी नोकरी नव्हती. नोकरीसाठी धैर्याने १२ वर्षे संघर्ष केला.परिस्थिती पुढे हात टेकले नाहीत. शिक्षणाची साथ सोडली नाही. डी. एड. नंतर बी. ए., एम्. ए., डी. एस.एम., ई. सी. सी. एड., इत्यादी शिक्षक नोकरी, घर व मुले सांभाळून पूर्ण केले. आता सुद्धा मी बी. एड. प्रथम वर्षाला प्रवेश घेतला आहे.
सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळी स्त्रशिक्षणासाठी केलेला संघर्ष हा कायमच मला प्रेरणादायी ठरला आहे.

म्हणुनच ३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस माझ्या साठी एखाद्या सणा पेक्षा कमी नाही. पुढील आयुष्यात सावित्रीबाईं सारखेच अखंड ज्ञानदान व समाजसेवा करण्याची माझीही मनापासून ईच्छा आहे.३ जानेवारी या दिवशी मी सावित्रीबाई जसे कुंकू कपाळावर लावायच्या (चिरी) तसे लावून शाळेत जाणार आहे. उंबरठ्यावर विवेकाची पणती लावून आपण सारे हा दिवस आनंदाने साजरा करावा. मी शिल्पा अमोल वालावलकर, ज्ञानप्रकाश विद्यालय, घाटकोपर सहायक शिक्षिका.सावित्रीबाई फुले यांना लक्षवेधी आदरांजली अर्पण करणार आहे. “स्त्री शिकली तर धर्म बाटेल” म्हणणारे सर्वात पुढे आहेत.त्या नवरात्र उत्सव नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालून साजरा करतात त्यांना त्यांच्या जातभाईचे वृत्तपत्रे खुप प्रसिद्धी देतात.

तेच वृत्तपत्रे सावित्रीबाई फुले जयंती उत्सव ३ जानेवारी ची किती दखल घेतात.महिलांंनी गांभीर्याने विचार करावा.
मी सावित्रीची लेक ! हो कारण आज मी एक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.आणि हे केवळ सावित्रीबाईंमुळेच शक्य झाले,गेली ३० वर्षे मी ज्ञानदानाचे कार्य अविरत चालू ठेवले आहे,आणि मी शिक्षिका असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.अध्यापनाचे कार्य करीत असतानाच कायम नवीन गोष्टी शिकत आहे,विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देऊन कायमच अध्यापनाच्या विविध पद्धत्तीचा अवलंब करून नाविन्यपूर्ण शिक्षणाच्या मार्गांने मराठीची अवीट गोडी अमराठी लोकांमध्ये निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहे.

सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळी स्त्रशिक्षणासाठी केलेला संघर्ष हा कायमच मला प्रेरणादायी ठरला आहे. म्हणुनच ३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस माझ्या साठी एखाद्या सणा पेक्षा कमी नाही. पुढील आयुष्यात सावित्रीबाईं सारखेच अखंड ज्ञानदान व समाजसेवा करण्याची माझीही मनापासून ईच्छा आहे.मीनल भोळे, शिक्षिका,विद्याभवन,मुंबई.त्या म्हणतात.
उंबरठ्यावर विवेकाची पणती लावून आपण सारे हा दिवस आनंदाने साजरा करूया व सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहूया.

जरी काळोख्या वाटा तरीही,चालत सदैव जावे
जाता जाता या ओठांवर गीत क्रांतीचे गावे ।
डोंगरवाटा तुफान लाटा तमा नसावी काही,ठाम असावा मार्ग आपुला दिशादिशांतून दाही ।
स्मरण करावे क्रांतीज्योतीचे वाचूनी इतिहासाला,स्वातंत्र्याचा अर्थ खरा मग कळे अक्षराला ।
हाती लेखणी आमुच्या नसती जर का आली तेव्हा,कळले नसते सूर्य उगवला नभी मंडपी केव्हा ।
या ओठांनी सदैव गावी सावित्रीची गाणी,तिच्या प्रयत्ने आम्हा लाभली अमृताची वाणी ।
वंदन तिजला करूया सारे कर जोडुनी आता,
तिच्याच चरणी झुकता राहो माझा तुमचा माथा ।।

मी सौ.महेश्वरी महेश चौगुले.मराठी विषय शिकवणारी, शिक्षणाद्वारे लोकांपर्यंत वेग वेगळे विचार पोहचविणारी आणि नव्या भावी पिढी व अनुभवी पिढीला जोडणारी दुवा. मी लग्नानंतर पदवी व पदव्युत्तर प्राप्त केले ते केवळ सावित्रीबाई यांच्या प्रेरणेमुळे व ज्योतिबाजी च्या सारखे प्रत्येक वळणावर प्रोत्साहन व साथ देणाऱ्या खांद्याला खांदा भिडवून काम करणाऱ्या पतीच्या सहकार्यामुळे.

मी सध्या Witty International School. Malad या नामांकित शाळेत मराठी अध्यापनाचे काम करते आहे.
इथ पर्यंतच्या शिक्षणाचा प्रवास मी केला तो केवळ सावित्री बाई फुले यांच्या प्रेरणेमुळेच,ही जाणीव मला आहे.त्यांनी केलेला संघर्ष मला पुन्हा समजून घ्यायचा आहे आणि त्यांचा वारसा पुढे नेताना, माझ्या कडून समाजाला कशी मदत करता येईल याची जाणीव मी ठेवीन.शेणा,दगडाचा मारा झेलत,स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची अवघड वाट सावित्री बाई चालत राहिल्या म्हणूनच आपली वाट प्रशस्त झाली.या वाटे वरून चालताना सावित्रीबाईंची आठवण तर काढायला हवी. ३ जानेवारी हा सावित्री बाईचा जन्म दिवस.हा दिवस आपण सावित्री उत्सव म्हणून साजरा करूयात.ही कल्पना राष्ट्र सेवा दलाने रुजविली आहे.

या दिवशी दारात रांगोळी, घरावर आकाश कंदील,दरवाज्याला फुलांचे तोरण,आणि उंबरठ्यावर विवेकाची एक पणती मी लावणार आहे आणि सावित्री बाई जशी कपाळावर कुंकू (चिरी ) लावायच्या तशी चिरी लावून मी शाळेमध्ये जाणार आहे व अध्ययन अध्यापनाचे व्रत निरंतर चालू ठेवणार आहे. चला…आपण सारे उंबरठ्यावर विवेकाची पणती लावू या आणि हा दिवस दिवाळसणा सारखा साजरा करूया आणि सवित्रीबाईना आदरांजली वाहूया.सौ.महेश्वरी महेश चौगुले.
वीट्टी इंटरनॅशनल स्कूल, मालाड.मराठी विषय शिक्षिका.

मी कविता मोरवणकर जन्म जरी माझ्या आईवडिलांनी दिला असला तरी या जन्माला समृद्ध केलंय ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्त्वानेच.म्हणूनच त्यांचा वसा घेऊन मीही आनंदराव पवार विद्यालय,बोरीवली येथे सहाय्यक शिक्षिका या पदावर कार्यरत आहे. ज्या काळात ‘स्त्री शिकली तर धर्म बाटेल’ असा अपप्रचार केला जात असताना त्याच काळात एका स्त्रीने शिक्षण घेऊन स्त्रियांच्या उद्धारासाठी उंबरठा ओलांडणे ही साधी आणि सोपी गोष्ट नव्हती.तरीही समाजाचा रोष पत्करून क्रांतिबा ज्योतिराव फुलेंच्या साथीने त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.

प्रसंगी दगड,शेण,चिखलाला फुलं समजून त्यांचा माराही सहन केला आणि त्याच फुलांनी स्त्री जीवन सुगंधी करत भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका होण्याचा मान मिळवला. “बालहत्या प्रतिबंधक गृह” स्थापन करून अनेक पीडित स्त्रियांचं छत्र झाल्या. न्हाव्यांचा संप घडवून केशवपन सारख्या कुप्रथांना रोखण्याचं धाडसी पाऊल त्यांनी त्याकाळी उचललं.क्रांतिबा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्री बाई यांच्या कार्याने आणि विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या कार्याचा व विचारांचा प्रसार करण्याच्या हेतूने मी व माझा नवरा मंगेश पवार आम्ही दोघांनी मिळून “ज्योती सावित्री” हे व्यावसायिक नाटक लिहिलं आणि त्याची निर्मितीही केली.

माझ्या कविता लिहिण्यामागची ऊर्जा मला माता सावित्रीकडूनच मिळाली आहे. आज कवितेतून व्यवस्थेविरुद्ध रोखठोकपणे व्यक्त होण्याचा निर्भीडपणा माझ्यात आलाय तो सवित्रीकडूनच.त्यांच्या कार्याची सर आज माझ्या किंवा आपल्या कार्याला नक्कीच येऊ शकणार नाही. पण तरीही सावित्रीच्या लेकी म्हणून आपण आपल्या आईच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजाचं काही अंशी ऋण फेडण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो.चला तर मग नवा समाज घडवण्यासाठी जुन्या रूढी परंपरेमधून बाहेर पडू या.इतकंच नव्हे तर ३ जानेवारी हा दिवस सावित्री उत्सव म्हणून साजरा करू या आणि साऱ्यांना ठणकावून सांगू या.आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही ज्योतिबाच्या लेकी, नका समजू आम्हाला दासी,आम्ही कर्तृत्त्वाच्या राशी.कविता मोरवणकर कवयित्री

आज मुंबईसह महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित सुरक्षित ठिकाणी नोकरी करणाऱ्या स्रिया सावित्रीबाई जशी कपाळावर कुंकू (चिरी ) लावायच्या तशी चिरी लावून मी शाळे,कॉलेज, बँक,रेल्वे,सरकारी निमसरकारी कार्यालयात बस,एसटी रेल्वे लोकलने प्रवास करून जावे. आपण ही जिथे असाल तिथे 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती लक्षवेधी साजरी करावी. “स्त्री शिकली तर धर्म बाटेल” म्हणणारे नवरात्र उत्सव नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालून महिला कडून साजरी करून घेतात त्याप्रमाणे सर्वात महिलांनी.सावित्री जन्मउत्सव ३ जानेवारी साजरा करावा. खऱ्या शिक्षण देणाऱ्या देवीचा २०२१ नव्या वर्षातला पहिला उत्सव गुरुवार दिनांक ३ जानेवारी २०२१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. हा “सावित्री उत्सव २०२१” म्हणून साजरा करावा. दारासमोर रांगोळी, दरवाज्याला तोरण, आकाश कंदील, उंबऱ्यावर ज्ञानाची पणती आणि घरात गोडधोड करून हा दिवस सणा सारखा साजरा करावा.

सावित्रीच्या ओवी,सावित्री – जोतिबा यांचे साहित्य, शेतकरी बांधवांबाबत लिहिलेले शेतकऱ्यांचा आसूड यातील काही उतारे याचे वाचन करून सावित्री बाई यांची आठवण जागवावी, असे आवाहन राष्ट्र सेवा दलाच्या वतीने करण्यात आले आहे.आपण ही सावित्री उत्सव ३ जानेवारी २०२१ मोठ्या प्रमाणावर साजरा करून तरुण पिढीला सावित्रीबाई फुले यांच्या कार्यांची ओळख करून द्यावी आणि त्रिवार वंदन करावे.सोशल मीडियावर सध्या अनेक सुशिक्षित स्रिया सावित्रीबाई यांचे योगदान मान्य करून जनजागृती चे पोस्ट करीत आहेत त्यातील ह्या चार महिलांचे संकलन वाचकांना माहितीसाठी देत आहे.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई(मो:-9920403859)