राईस मिलरच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक -धानभरडाई लवकरच सूरू करा – छगन भुजबळ

27

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.16फेब्रुवारी):-भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यातील राईस मिलर्सच्या अडचणी दूर करण्यासाठी व धानभरडाई बाबत चर्चा करण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीवेळी उर्जा मंत्री नितीन राऊत, खा. प्रफुल्ल पटेल , आमदार राजू कारेमोरे ,अव्वर सचिव पणन सुनंदा घड्याळे, मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, मार्कफेडचे सरव्यवस्थापक डॉ.अतुल नेहरकर, भंडारा व गोंदियाचे प्रादेशिक व्यवस्थापक ए. डी. राठोड , गडचिरोली चंद्रपूरचे प्रादेशिक व्यवस्थापक जी आर कोरलावार व सर्व जिल्ह्यांचे पुरवठा अधिकारी आणि इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह राईस मिलर्स असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते गेले अनेक दिवस पाचही जिल्ह्यात धानभरडाई सूरू नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे पण राईस मिलर्सच्या प्रश्नांबाबत देखील राज्य सरकार सकारात्मक आहे.त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने मिलर्स बरोबर करार करून आणि त्यांच्या अडचणी सोडवून ताबडतोब धानभरडाई सूरू करावी असे आदेश आज अधिकाऱ्यांना दिले.

राईस मिलर्सच्या प्रश्न सोडविण्याबाबत राज्यसरकार सकारात्मक आहे. त्यांच्या हक्कावर कोणतीही गदा न आणता शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळावे व सामान्य नागरिकांना योग्य दर्जाचा तांदूळ मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राईस मिलर्सने ६७% टक्के सीएमआर तांदूळ जमा करण्याची हमी द्यावी व धानभरडाई सूरू करावी. या पाचही जिल्ह्यात यंदा विक्रमी धान खरेदी केंद्रे सुरू केली होती. मोठ्या प्रमाणात धान भरडाईसाठी तयार आहे. मात्र, राईस मिल्सनी अद्याप भरडाई सुरू केली नाही. यामुळे शेतकऱ्यांबरोबरच राईस मिलर्सचेही नुकसान होणार आहे. राईस मिलर्सच्या मागण्यांवर आज सकारात्मक मार्ग काढून त्यांना धानभरडाई सूरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या पाचही जिल्ह्यातील काही मिलर्सने मिलिंग न करण्याचे धोरण अवलंबिले होते मात्र आज त्यांचे देखील प्रश्न समजून घेऊन स्थानिक प्रशासनाला तातडीने त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले आहेत व त्यानुसार सर्व मिलर्सने देखील आम्ही धानभरडाई सूरू करू असे आश्वासन देखील दिले..