दोन नागड्यांच्या भांडणात जनता वा-यावरच

30

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

दोन नागडे समोरासमोर येतात. त्यातला एक नागडा पुढच्या नागड्याला जोर-जोरात चिडवायला सुरूवात करतो. त्याचे चिडवणे, ओरडणे, किंचाळणे इतके मोठे असते की आजूबाजूचे लोक क्षणभर हे विसरून जातात की हा ओरडणाराही नागडाच आहे. हा जोर-जोरात समोरच्या माणसाला नागडा नागडा म्हणून गोंधळ घालत असतो. पण त्या वेळी त्याचा एक हात त्याने खाली धरलेला असतो. चिडवण्याच्या ओघात तो हातही काढून समोरच्याला चिडवायला सुरूवात करतो. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधीमंडळात जोरदार भाषण केले. त्यांची जोर-जोरात ओरडण्याची स्टाईल नवी नाही. ते मुख्यमंत्री होण्यापुर्वी त्यांच ओरडणं बरं वाटायच. तेव्हा ती त्यांची पोटतिडीक वाटायची. हा माणूस संवेदनशील आहे, व्हीजनरी आहे असं वाटायचं. हा माणूस जर मुख्यमंत्री झाला तर राज्यात चांगले परिवर्तन करू शकतो. तो नैतिकता, शिष्टाचार पाळतो, भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतो. हा माणूस वेगळं आणि चांगलं काम करेल असं वाटत होत पण सत्तेत आला आणि हा ही नागडाच निघाला. याच्या फक्त बाताच होत्या. हा चांगल्या थापा ठोकू शकतो, ओरडून आरडून पुढच्याला गंडवू शकतो हे लक्षात आले. ज्या वेळी जबाबदारीची वेळ येते तेव्हा हा ही फकड्या कॉंग्रेस राष्ट्रवादीतल्या अव्वल बदमाषांच्या पुढचा बदमाष असल्याचे लक्षात आले. २०१४ पुर्वी देवेंद्र फडणवीस हे नाव माझ्या गुडबुकमध्ये होते. त्यांच्याबद्दल आदर होता. पण महाशय सत्तेत आले अन त्यांचे गाढवही आणि ब्रम्हचर्यही गेले. त्यांचा करणी आणि कथनीतला फरक लक्षात आला. आजचे त्यांचे आक्रस्ताळे भाषण याच दुगलपणाचा, नागडेपणाचा उत्तम नमुणा होता. त्यामुळे त्यांची किवच जास्त येत होती.

सिंचन घोटाळ्यावर ठो-ठोकून भाषण करत, पवारांना अटक करण्याच्या वल्गणा करत सत्तेत आलेल्या या बहाद्दराने पवारांचे काही वाकडे केले नाही. ज्या अजित पवारांच्या मुतात सत्ता स्नान केले त्याच अजित पवारांसोबत पहाटे पहाटे निर्लज्जपणे शपथविधी उरकला. ज्या अजित पवारांच्यावर बेंबीच्या देठापासून, पँटीची बटणे तुटेपर्यंत ओरडत आरोप केले त्यांच्यासोबतच या साहेबांनी बेमालूपणे हसत हसत शपथ घेतली. ती घेताना काही लाज- शरम वाटली का ? थोडा संकोच तरी वाटला का ? फडणवीसांच्या काळात शेतकरी प्रश्न असतील, महिला अत्याचार प्रकरणं किंवा राजकीय नैतिकता असेल या सर्व बाबतीत फडणवीस कसे भोंगळे आणि भंपक आहेत हे लक्षात आले. मराठी मुलीचा विनयभंग करणा-या गणेश पांडेचे त्यांनी काय केले ? श्रीपाद छिंदमचे काय केले ? लष्करी जवानांच्या गैरहजेरीत त्यांना पोरं होतात असं बोलणा-या आमदार परिचारकची काय वाकडी केली ? मंत्रालयात शेतक-याने आत्महत्या केली, एका शेतक-याला मंत्रालयातच बेदम मारहाण केली गेली तेव्हा या महाशयांनी काय केले ? काय कारवाई केली ? याचा विसर अजून पडलेला नाही. चौदाच्या निवडणूकीत भाजपाने केलेल्या घोषणा आणि राज्यकारभारातली नमकहरामी दोन्ही डोळ्यासमोर आहे. फडणवीस हा माणूस राजकारणातला निव्वळ थापाडा पोपट असल्याचे लक्षात आले. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र दोघेही थापाडे आणि रंगबदलू असल्याचे लक्षात आले. असं म्हणतात की माणूस संधी मिळेपर्यंत प्रामाणिक व नैतिक असतो. एकदा संधी मिळाली की तो प्रामाणिकपणाला, नैतिकतेला घोडा लावतो. फडणवीसांनी त्यांच्या सत्ता काळात ते दाखवून दिले. काँग्रेस राष्ट्रवादीतली अनेक भ्रष्ट लेकरं पदराखाली घेत त्यांना सत्तेचे स्तनपान केेले. तिकडे होती तेव्हा त्यांच्या भ्रष्टाचारावर नैतिकतेची प्रवचने झोडणारे फडणवीस त्यांना पवित्र करून भाजपात घेत होते. तेव्हाच त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे लक्षात आले.

काँग्रेस-राष्ट्रवादीवाले बदमाष आहेत म्हणून यांना लोकांनी संधी दिली तर हे महाबदमाष निघाले. या दोघांच्यात एक महत्वाचा फरक आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीवाले नालायक आहेत पण त्यांनी आदर्शवादाचा कधी आव आणला नाही, आदर्शवादाची झुल कधी पांघरली नाही. जसे आहे तसे बेधडक वागतात ते. सभ्यतेची व साधन शुचितेची नौटंकी कधी करत नाहीत. आम्ही नालायक आहोत तर आहोतच अशा थाटात त्यांचे वागणे असते पण या बेट्यांनी राजकारणाला नैतिकतेचा, तात्विकतेचा मुलामा दिला. अनेक वर्षे आदर्शवादाच्या गप्पा मारल्या आणि वेळ येताच त्यांच्यापेक्षा आम्ही महानालायक आहोत हे दाखवून दिले. म्हणजे परस्त्री माते समान असते, तिचा आदर केला पाहिजे असे सांगायचे आणि गर्दीत, अंधारात सापडली की तिला लुटायचे असला प्रकार या लोकांनी केला आहे. खरेतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही नागडे आहेत. एक नागडा त्याच्याकडे बोट दाखवतो तर दुसरा नागडा याच्याकडे बोट दाखवतो. दोघेही स्वत: नागडे असताना परस्परांना नागडा नागडा म्हणून चिडवत आहेत. आपण स्वत:च नागडे आहोत याचे भान या दोघांनाही नाही. राज्य सरकारवाले वीजेच्या बाबतीत लोकांना पिळत आहेत पण तेच लोक पेट्रोल दरवाढीवर बोलतात. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी सत्तेत येण्यापुर्वी वीज बील, शेतीच्या हेक्टरी नुकसानीबाबत दिलेली आश्वासने ते स्वत:च विसरले आहेत. भाजपवाले २०१४ पुर्वी गँस आणि पेट्रोल दरवाढीच्या विरोधात रस्त्यावर उतरून बोंब मारत होते. कदाचित आज त्यांना त्याचा विसर पडला असावा किंवा लोक त्यांची बोंब विसरले असतील असे तर त्यांना वाटत असेल. सत्ताधा-यांनी पेट्रोल-डिझेल व गँस दरवाढीचा विषय काढला की विरोधक वीजेचा विषय काढतात. विरोधकांनी राज्यात बोट दाखवले की सत्ताधारी केंद्रात बोट दाखवतात. या दोन्हीही नागड्यांना लाज-शरम नाही
ते लोकांना मुर्ख समजत आहेत. लोकांनाच खुळ्यात काढत आहेत. या दोघांच्या अक्कल हूशारीमुळे समाजमाध्यमात दोन्हीकडच्या भक्ताडगँगमध्ये घमासान सुरू होते, वाद रंगतात, चर्चा झडतात आणि मुळ प्रश्नांना बगल मिळते. प्रश्न तसेच भिजत पडतात. त्यावर नंतर कुणीच बोलत नाही. या सगळ्या गदारोळात सामान्य माणूस मात्र वा-यावर सोडला जातोय. त्याला केंद्रातले आणि राज्यातलेही लुटतायत. गेले एक वर्ष कोरोना व लॉकडाऊनमुळे वाताहात झालेल्या लोकांना भरमसाठ वीजबील भरणे मुष्कील झाले आहे. सरकारने थकीत वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. लॉकडॉऊनच्या काळात घरभाडे माफ करा असे आवाहन लोकांना करणा-या संत उध्दव ठाकरेंना जनतेची वीज कनेक्शन तोडली जाताना काय वाटत नाही का ? वीजेबाबत आपण लोकांना काय गाजरं दाखवली होती ? याची तरी त्यांना आठवण होते का ? असे प्रश्न पडतात. पेट्रोलपंपावर पेट्रोल भरायला गेल्यावर तोंड बांधलेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा फोटो पाहून असे वाटते की नियतीने या माणसाला तोंड दाखवायच्या लायकीचे ठेवले नाही. गेल्या सहा वर्षात इतक्या लबाड्या केल्या की लोकांनी त्यांचे पुर्ण तोंड पाहूच नये असे नियतीला वाटले की काय ? असा प्रश्न पडतो. हाच फकड्या २०१४ पुर्वी महागाई, डिझेल-पेट्रोलच्या दरवाढीवर, रूपयाच्या घसरण्यावर दमदार भाषण ठोकत होता. सत्ता येताच त्याचेही खरे दात दिसून आले. त्यामुळेच की काय तोंड झाकलेल्या अवस्थेतले पोस्टर पेट्रोल पंपावर लावण्याची वेळ मोदींच्यावर आली ? सत्ताधारी आणि विरोधक या दोन नागड्यांच्या भांडणात जनता मात्र रोज नागवली जाते आहे. तिचे कुणाला पडलय ? आपल्यात भानगड झाली तर ती झाका, विरोधकाने केली तर ती उघडी पाडा ! असा प्रकार सुरू आहे. दोघेही नालायकीचे उत्कृष्ट नमुणे आहेत हे मात्र नाकारता येणार नाही.