अभिनिवेश बाजूला ठेवून इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी गरजेची – प्रा. कपिल राजहंस

    72

    ✒️कोल्हापूर(पुुरोगामी संदेश नेटवर्क)

    कोल्हापूर(दि.17मार्च):-इतिहासाची मांडणी करत असताना जात धर्म पंथ प्रांत प्रदेश सामाजिक स्तर आदींचा अभिनिवेश ठेवून केलेली मांडणी हा खरा इतिहास होऊ शकत नाही त्यामुळेच या सगळ्या गोष्टींचा अभिनिवेश बाजूला ठेवून इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी गरजेचे आहे असे मत इतिहास अभ्यासक प्रा. कपिल राजहंस यांनी आज व्यक्त केले. सत्यशोधक इतिहास परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

    आपल्याकडे जुनी मढी उकरून काढणे या आणि अशा संकुचित दृष्टिकोनातून इतिहासाकडे पाहण्याचा पारंपारिक दृष्टीकोन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्यावर बिंबवण्यात येतो मात्र इतिहास हा केवळ जुन्या घटनांचा आढावा घेणे इथे पर्यंत मर्यादित नसून नवीन घटकांची पुनर्मांडणी देशाची समाजाची सभ्यतेची भूमिका निर्माण करण्याचे काम इतिहास करत असल्यामुळे इतिहास लेखनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे मात्र आपल्याकडे इतिहास हा केवळ जेत्यांचा लिहिला गेल्यामुळे इतिहासापासून आणि ऐतिहासिक लेखनापासून वंचित असणाऱ्या घटकांच्या इतिहासावर म्हणावे तितके लेखन झाले नाही म्हणूनच या सगळ्या अप्रकाशित घटकांना प्रकाशित करण्यासाठी आणि त्यांच्या इतिहासाच्या मांडणीचे पुनरावलोकन करण्यासाठी नवीन इतिहास संशोधन पद्धती अवलंबावे लागतील आणि त्यासाठीची आवश्यक असणारी प्राथमिक आणि दुय्यम संदर्भ साधने आपल्याला अभ्यासावी लागतील असेही त्यांनी पुढे नमूद केले. 

    अलीकडच्या काळात ऐतिहासिक महामानवांच्या इतिहास लेखनाच्या प्रक्रियेमध्ये घडणाऱ्या घटनांनी पेक्षा आपल्याला सोयीस्कर असणाऱ्या अनेक तत्त्वांचा अंतर्भाव तो इतिहास लेखन करणाऱ्या इतिहासकार अथवा साहित्यिकांच्या लेखनात होत असल्यामुळे अलीकडच्या काळात इतिहास लेखनाच्या बाबतीतील अनेक गंभीर चुका नव्याने उजेडात येत आहेत मात्र येणाऱ्या काळात अशा प्रकारचे प्रसंग टाळायचे असतील तर वस्तुनिष्ठ इतिहास केल्याशिवाय आणि त्या पद्धतीची संशोधनात्मक मांडणी केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि म्हणूनच याच भावनेतून सत्यशोधक इतिहास परिषद इथून पुढच्या काळामध्ये नवीन सत्यांवेशी इतिहासाच्या मांडणीसाठी कार्यरत होत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.  त्याचेच औचित्य साधून दिनांक 20 मार्च रोजी संध्याकाळी 4.30  वाजता “इतिहासाच्या विकृतीकरणाला जबाबदार कोण?” या विषयवार परिसंवाद आयोजित केला असून, त्यासाठी रुपेश पाटील, अमित मेधावी, सुरेश केसरकर, सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे 

    पत्रकार परिषदेला अनिल म्हमाने, प्रबुद्ध कांबळे, प्रियाताई शिरगावकर, सुनिल दादा पाटील, राहुल राजहंस, जावेद मुजावर आदी उपस्थित होते.