जाती दर्शक लक्षणांना तिलांजली !

93

(महाड चवदार तळे सत्याग्रह स्मरण)

भारतीय जातीव्यवस्थेमुळे अस्पृश्यांना उच्च जातीय हिंदूंपासून वेगळे ठेवण्यात आलेले होते. अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्रोतामधून पाणी घेण्यास तसेच मुख्य रस्त्यावरून चालण्यास परवानगी नव्हती. ऑगस्ट १९२३मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांना ही वहिवाटीचा हक्क असेल. महाडच्या नगरपालिकेने ही जानेवारी १९२४ साली या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला. परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही. महाड सत्याग्रह हा दि.२० मार्च १९२७ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता. यामुळेच २० मार्च हा दिवस “सामाजिक सबलीकरण दिन” म्हणून भारतात साजरा केला जातो. ही आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती. या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते.

सभा व चवदार तळ्यावर पाणी पिणे : महाड सत्याग्रहाचे नेतृत्व करतांना डॉ.आंबेडकरांचे कांस्य धातुचे शिल्पचित्रण सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे व अनंत विनायक चित्रे यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्यांसह महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी महाड सत्याग्रह दरम्यान त्यांना मदत करण्याचे काम ते करीत होते. कोकणातील महाड हे शहर सत्याग्रहासाठी निवडले गेले. कारण उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती. त्यामध्ये अनंत विनायक चित्रे, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, सुरेंद्रनाथ टिपणीस हे महाड नगरपालिकेचे प्रमुखही त्यांत सहभागी होते. यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी महाड सत्याग्रह दरम्यान त्यांना मदत करण्याचे काम ते करीत होते. सन १९२७ साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती व सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने बाबासाहेबांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले. सभेनंतर सर्वजण चवदार तळ्याकडे गेले. आंबेडकरांनी सर्वात प्रथम त्या तळ्यांमधून पाणी पिले आणि त्या नंतर जमलेल्या सर्व लोकांनीही त्या तळ्याचे पाणी पिले. त्यावेळी स्त्री-पुरुष मिळून सुमारे ५००० जण या सभेसाठी व नंतर चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी आलेले होते. त्यातील पुरुष हे आपल्या हातात काठी घेऊन आलेले होते, हातात काठी घेणे हे महार जातीच्या पुरुषांचे चिन्ह होते.

सत्याग्रहींवर सनातन्यांचे अत्याचार : जरी महाड नगर पालिकेने सरकारी अखत्यारीतील सर्व पाणवठे अस्पृश्यांना खुले केले असले तरीही त्या पाणवठ्यांवर तसा कसलाही उल्लेख केला गेलेला नव्हता. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने अस्पृश्य जमा होऊनही त्यांनी आसपासच्या कोणत्याही पाणवठ्यावरून पिण्यासाठी पाणी घेण्याची हिंमत केली नाही. म्हणूनच ह्या सभेसाठी म्हणून आलेल्या लोकांच्या पाण्याच्या सोयीसाठी ४० रुपये किमतीचे पाणी उच्च जातीय हिंदूंकडून विकत घेण्यात आले होते. कारण सभेच्या ठिकाणी अस्पृश्यांना आसपासच्या पाणवठ्यावरून पाणी घेण्यास मनाई होती. चवदार तळ्याचे पाणी पिऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभेपुरते रहात असलेल्या सरकारी बंगल्यावर परतले आणि इतर सर्व लोक सभेच्या मंडपात परत गेले. चवदार तळ्यावरुन सर्वजण निघाल्यानंतर सुमारे दोन तासाच्या आतच महाड गावात एक अफवा उठली की, “तळ्यातील पाणी बाटवल्या नंतर आता जमलेला जमाव वीरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिरही बाटवणार आहे.” धर्म धोक्यात आल्याचे उच्च जातीय हिंदूंनी महाड गावभर पसरवले. त्यातून उच्च जातीय हिंदूंचा एक घोळका हत्यारे, लाठ्या-काठ्या घेऊन सभेच्या ठिकाणी आला व त्यांनी सभेनंतर गावाकडे जाण्यापूर्वी जेवण करत असणाऱ्या अस्पृश्यांना मारहाण केली.

हा उच्चवर्णीयांचा घोळका नंतर महाड शहरभर फिरुन सर्व अस्पृश्यांना धमकावत होता. शिवाय आसपासच्या सर्व गावांमध्ये या सभेला आलेल्या सर्व अस्पृश्यांना धडा शिकवण्यास संदेश पोहोचवला गेला. त्यामुळे अनेक अस्पृश्यांना स्वतःच्या गावी पोहोचल्यानंतरही हिंसेला सामोरे जावे लागले. या सत्याग्रहाला गांधींनी पाठिंबा दिला आणि, स्पृश्यांनी अस्पृश्यांवर अशाप्रकारे हिंसा करुन चूक केली आहे, असे मत त्यांच्या यंग इंडियामध्ये प्रकाशित केले. विरेश्वराच्या मंदिराच्या गुरवाने अस्पृश्यांनी विरेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याचा कट रचला आहे, अशी अफवा उठवल्यामुळे गावातील सनातनी हिंदुंनी सत्याग्रहासाठी आलेल्या लोकांवर हिंसा केली. परंतु अहिंसा हे तत्त्व मानणाऱ्या बाबासाहेबांनी अस्पृश्य सत्याग्रहींना सनातनी हिंदूंविरूद्ध “हिंसा करू नका” असा आदेश दिला होता. त्यामुळे एवढी हिंसा होऊनही व प्रत्यक्षात स्थानिक लोकांपेक्षा जास्त संख्येने असूनही काठीधारी अस्पृश्यांनी संयम ठेवला. त्याबद्दल म.गांधींनी सर्व सत्याग्रहींचे कौतुकही केले होते. नंतर दि.१९ मार्च १९४० रोजी डॉ.आंबेडकर यांनी महाडमधे १४वा महाड सत्याग्रह दिन आयोजित केेेला. महाड शहरात डॉ.आंबेडकर यांचा मोर्चा व सभा झाली.

या दिवशीं महाड नगरपालिका प्रेसिडेंट, ॲड.विष्णू नरहरी खोडके यांनी एक समारंभ आयोजित करुन बाबासाहेबांना मानपत्र देऊन गौरविले. खोडके यांनी सन १९३१पासून डॉ.आंबेडकर यांच्या चळवळींना पाठिंबा दिला होता.
दलित महिलांचा सहभाग : या सत्याग्रहासाठी स्त्रियांचा सहभाग लक्षणीय असल्याने, आंबेडकरांनी स्त्रियांना खास आवाहन केले. आपली जात दाखवणारी कोणतीच लक्षणे आपल्या शरीरावर न बाळगण्याविषयी उपस्थित स्त्री-पुरुषांना आवाहन केले. त्यातच पुरुषांनाही हातात कायम काठी ठेवणे सारखी चिन्हे बाळगण्याची आता गरज नाही. तत्कालिक स्त्रिया गुडघ्या पर्यंतच तोकडे लुगडे नेसत असत. आंबेडकरांनी स्त्रियांना इतर उच्च जातीय स्त्रीयांसारखे पूर्ण टाच घोळ लुगडे नेसण्याचे सुचवले. त्याची अंमलबजावणी लागलीच पुढच्या काही दिवसांतच घडून आली.
!! या सत्याग्रहाचे स्मरण ठेवून भारतीयांनी न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता कायम अंगी बाळगुया !!

✒️संकलक व लेखक:-निकोडे कृष्णकुमार गुरुजी.
मु. पिसेवडधा, ता. आरमोरी,जि. गडचिरोली (९४२३७१४८८३).