शहरे – महानगरांमध्ये जनता लॉकडाऊन खपवून घेणार नाही – पुजा उदगट्टे

    98

    ✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    पुणे(दि.20मार्च):- प्रचंड प्रमाणात वाढलेली महागाई पेट्रोल- डिझेल मध्ये झालेली भरमसाठ वाढ सामान्यांना आता डोकेदुखी ठरू लागली आहे. रोजच्या जेवणात अन्न शिजवण्यात महत्त्वपूर्ण ठरणारा गॅस सिलेंडरच्या गगनाला भिडणार्‍या किमती बघूनच सर्वसामान्य माणसाला आता आठ तासांऐवजी किमान चौदा तास काम केल्यानंतर सुद्धा संसारिक- प्रापंचिक खर्च भागविणे अवघड होऊन बसले आहे. असे असताना त्यामध्ये जर लॉकडाऊन केले तर जनता ते धुडकावून लावेल, असा इशारा रयत शेतकरी संघटना प. महाराष्ट्र अध्यक्ष पुजा उदगट्टे यांनी औरंगाबाद येथे बोलताना दिला.

    सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाने भिक मागायचे ठरवले तर रस्त्यावर गेल्यावर पोलिसांच्या काठीचा मार खावा लागणार असेल, तर आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना, अशा पद्धतीचे केंद्रातील सरकार वागत आहे. केंद्रातल्या सरकारला सर्वसामान्य- मध्यमवर्गीय- गरीब माणसाची अजिबात काळजी नाही, असे देत दिसून येत आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार सारखीच राज्य सरकारची परिस्थिती आहे. राज्य सरकारला तरी सर्वसामान्य माणसाची काळजी कुठे आहे? असा संतप्त सवाल रयत शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ पूजा उदगट्टे यांनी विचारला आहे. एकीकडे तेलंगाना सारख्या, दिल्लीसारख्या राज्यांनी मोफत वीज दिली.

    मग महाराष्ट्र का देऊ शकत नाही? असं फक्त विरोधी बाकांवर बसलेले असतानाच विचारता येत का ? सत्तेवर आले की आपण सक्तीने वीजबिलांची वसुली करणार का ? लाखो कुटुंबांना वीजजोडणी देणे, हे लक्ष पूर्ण करण्याऐवजी, गरीब मध्यमवर्गीयांना अंधारात बसविणारी वीजतोडणी मोहीम राज्यात जोरदार सुरू आहे. लॉकडाऊन करण्यात केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारला इतका इंटरेस्ट का आहे?? हे आता लोक ओळखून आहेत. म्हणूनच कष्ट केल्याशिवाय, कामाला गेल्याशिवाय आपल्या घरात दोन वेळची चूल पेटणार नाही. याची जाणीव असणारी माणसं शहरांमधलं- महानगरं मधलं लॉकडाऊन खपून घेणार नाहीत. असे स्पष्ट मत रयत शेतकरी संघटना प. महाराष्ट्र अध्यक्षा सौ पूजा उदगट्टे यांनी व्यक्त केला आहे.