बारावी व दहावीच्या परीक्षांच्या पेपरची वेळ बदलवीण्यात यावी

52

🔹शिक्षक भारतीचे शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पत्र

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.4एप्रिल):-शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील बारावी व दहावीच्या परीक्षा अनुक्रमे २३ एप्रिल व २९ एप्रिल पासून होणार आहेत. दरवर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये होणाऱ्या या परीक्षा यावर्षी एप्रिल-मे महिन्यात होत आहेत. राज्यभर एप्रिल-मे महिन्यात कडक उन्हाळा असतो. राज्यातील अनेक ठिकाणचे तापमान ४० अंश पेक्षा जास्त असते. प्रचंड उकाड्यात पेपर लिहिताना शारीरिक त्रास होण्याची शक्यता जास्त आहे.

त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या नंबर गुणांवर होऊ शकतो. अशा परिस्थितीत सकाळी लवकर परीक्षा घेणे आवश्यक आहे. त्यामुळे बारावी / दहावीच्या परीक्षांच्या पेपरची वेळ बदलणेबाबत शिक्षक भारती संघटनेने शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पत्र दिल्याची माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.

कडक उन्हाळा आणि राज्यातील विदर्भातील वाढत्या तापमानाची परिस्थिती लक्षात घेऊन बारावी व दहावीच्या वार्षिक परीक्षा सकाळी लवकर म्हणजे सकाळी ८ वाजता सुरू करण्याबाबत नियोजन करण्याची विनंती या पत्राद्वारे शिक्षणमंत्र्यांना करण्यात आली आहे अशी माहिती शिक्षक भारती राज्य संयुक्त कार्यवाह संजय खेडीकर,नागपूर विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे,उपाध्यक्ष रविंद्र उरकुडे, भास्कर बावनकर, पुरुषोत्तम टोंगे, प्रशांत सुरपाम,राकेश पायताडे, प्रविण पिसे, सतिश डांगे, बजरंग जेनेकर,महेश भगत,रामदास कामडी आदींनी दिली आहे.