देशाला कोरोनाच्या खाईत ढकलून निवणुका जिंकायला निघालेल्या सत्तापिपासू भाजपला जनतेने धडा शिकवला – जयदीप कवाडे

31

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.3मे):-एका महिलेला पराभूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ, देशभरातील भाजपचे नेते आणि केंद्र सरकारच्या सर्व संस्था देशातील जनतेला वा-यावर सोडून पश्चिम बंगालमध्ये प्रचार करत होते. सत्ता, पैसा, केंद्रीय संस्थांचा प्रचंड गैरवापर करूनही बंगालच्या जनतेने भाजपला पराभूत करून बंगाली समाज आणि संस्कृतीवर आक्रमण करू पाहणा-या हुकुमशाही प्रवृत्तीला त्यांची जागा दाखवून दिली आहे. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडूतील भाजपच्या पराभवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला कोरोना संकट हाताळण्यात आलेल्या अपयशावर शिक्कामोर्तब केले आहे, अशी प्रतिक्रिया पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी दिली आहे.

पाच राज्यांच्या निवडणूक निकालावर बोलताना जयदीप कवाडे म्हणाले की, कोरोनाच्या महाभयंकर संकटकाळात बेड्स, ऑक्सिजन, औषधे, रेमडेसिवर इंजेक्शन याच्या तुटवड्यामुळे देशात दररोज हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. अशा परिस्थितीतही देशाचे पंतप्रधान मरणा-या लोकांना वाचविण्याऐवजी पश्चिम बंगालमध्ये एका महिलेला हरवून सत्ता मिळविण्यासाठी प्रचार करत होते. देशाच्या इतिहासात असे चित्र कधी दिसले नव्हते. या निवडणूकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असंवेदनशील, क्रूर आणि भेसूर चेहरा देशासोबतच जगाने पाहिला. जगभरातील माध्यमांनी त्यांच्या या असंवेदनशील आणि बेफिकीरपणाची चिरफाड केली. आजच्या निकालातून पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडूच्या जनतेने निवडणुका जिंकून सत्ता मिळवण्यासाठी अत्यंत खालच्या पातळीवर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सणसणीत चपराक लगावली आहे.

भाजप ने आपल्या नेहमीच्या कार्यपद्धतीने धार्मिक तणाव निर्माण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न या निवडणुकीतही केला. केंद्र सरकारच्या अख्त्यारितील विविध संस्थांचा सायासाठी पुरेपूर गैरवापर केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. कोरोनाचे नियम पायदळी तुडवत सत्तेसाठी कोट्यवधी लोकांचे आरोग्य धोक्याच टाकणा-या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि निवडणूक आयोग या दोघांवरही न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. बंगाल, केरळ, तामिळनाडूच्या सूज्ञ जनतेने दिलेला कौल आपल्या बेजबाबदार केंद्र सरकारला व आपली स्वायत्ता गहाण ठेवून केंद्रातील सत्ताधा-यांना शरण गेलेल्या सर्वांसाठी धडा घ्यावा असे टोचक प्रतिक्रिया पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.