अंधारातून प्रकाशाकडे यशस्वी प्रेरणादायी प्रवास !

40

आदरणीय बाळासाहेब उर्फ प्रकाश यशवंतराव आंबेडकर आज आंबेडकरी चळवळीचे रक्ताचे आणि खऱ्या अर्थाने वैचारिक चळवळीचे वारसदार आहेत.आपले राजकीय वारसदार बनण्यासाठी अहोरात्र जीवतोडून प्रयत्न सुरु आहेत. सम्यक समाज आंदोलन या सामाजिक जनआंदोलनातून आपण सुरवात केली होती.त्या जनआंदोलनाचे आपण नेते होता. त्यात योगदान देणारे अनेक नेते होते.त्यांच्या मुळेच आपण मुंबईसह राज्यात गांव तिथे बौध्द महासभेची शाखा, गांवागांवात जाऊन जनजागृती करण्याचा यशस्वी झाला. त्यातून अनेक निष्ठावंत कार्यकर्ते तयार झाले.खूप मोठी जनजागृती झाली होती.असे लिहले तर चुकीचे होणार नाही.त्यामुळेच राजकीय समीकरण बदलली होती.मागासवर्गीय समाजातील लोक बहुजन म्हणूनच जवळ आले.विशेष बुलढाणा,अकोला,वाशीम जिल्ह्यातील बौद्ध समाजावर होणारे हल्ले, अन्याय, अत्याचार करणारे कोण आहेत?. हे पाहिल्यावर,आपले एकूण संघटन,बौद्ध महासभा,भारिप बहुजन महासंघ आणि डाव्या चळवळीशी असलेला घरोबा कुठे तरी कमी पडतो असे वाटते.

त्याचे सत्यशोधक पद्धतीने आत्मपरीक्षण करून त्यातील काही प्रश्न आपल्या वाढदिवसा निमित्य आपल्या भक्त आणि शिष्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न करतो. कारण आंबेडकरी चळवळीत अनेक बुद्धिवादी लेखक,पत्रकार,साहित्यिक आहेत.पण त्याच्या मध्ये एका गोष्टीचा अभाव आहे.तो म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात नाही.सत्य मांडल्यावर समाज काय म्हणेल?.सत्ताधारी नाराज होतील.याची त्यांना भिती वाटते. म्हणून ते सत्याला सत्य म्हण्यास लिहण्यास घाबरतात.हे आपणच (विचारवंतां कडून अपेक्षा -आंबेडकर चळवळ संपली आहे.पण नंबर ३६ ) म्हटले आहे.त्यामुळे हा नियम मला लागू नाही.

कारण मी प्राध्यापक,वकील,इंजिनियर,साहित्यिक,विचारवंत नाही. एक असंघटीत कामगार वकार्यकर्ता आहे.आणि अब्राम्हण सत्यशोधक मासिकातून लिहता लिहता वृत्तपत्रात लिहायल लागलो. क्रांतिकारी विचारांच्या चळवळीची दिशा व दशा यावर सत्यशोधक नजरेतुन चिंतन आणि परीक्षण करून
लिहायला लागलो.प्रकाश यशवंत आंबेडकर यांचा जन्म १० मे १९५४ दादर मुंबई येते झाला होता.भारतीय राजकीय सामाजिक चळवळीत त्यांना बाळासाहेब आंबेडकर म्हणून ओळखल्या जाते,ते सामाजिक कार्यकर्ते नेते,आणि कायदेविषयक तज्ञ वकील म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचं बरोबर ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु आहेत.त्यामुळे त्यांच्या नांवाला एक मोठे वलय आहे.बाळासाहेब आंबेडकर हे दोन वेळा लोकसभेत खासदार म्हणून बसले आहेत, प्रथम १८ सप्टेंबर १९९० ते १७ सप्टेंबर १९९६ ते राज्यसभा सदस्य होते.दुसऱ्या वेळी १० मार्च १९९८ ते २६ एप्रिल १९९९ तिसऱ्या वेळी १० ऑक्टोबर १९९९ ते ६ फेब्रुवारी २००४ लोकसभेत खासदार म्हणून विशेष कार्यकाळ गाजविला होता.भारतीय रिपब्लिकन पक्ष १९९४ ते १९९९ पर्यंत भारिप होता,भारिप बहुजन महासंघ १९९४ ते २०१९ पर्यंत होता.२०१८ ला शंभर च्या वर लहान मोठ्या संघटना आणि पक्षांना एकत्र संघटित करून वंचित बहुजन आघाडी ची स्थापना करण्यात आली होती.२०१९ ला लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविण्याचा आली त्यात त्यांना मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडी हा दखल पात्र पक्ष झाला.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारधारेचा रिपब्लिकन पक्ष ते वंचित बहुजन आघाडी हा बाळासाहेब आंबेडकर यांचा राजकीय धक्कादायक यशस्वी प्रेरणादायी प्रवास आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० ला दलित चळवळीला वैचारिक बैठक दिली.राज्य समाजवादाचा पुरस्कार करून देशाला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी महत्वपूर्ण विचार मांडले. आर्थिक समता प्राप्त झाली तरच राजकीय स्वातंत्र्याला अर्थ राहील असे त्यांचे मत होते.भारत हा कृषिप्रधान देश आहे.परंतु त्यामध्ये राबणारे बहुसंख्य शेतकरी निव्वळ काबाडकष्ट करीत आहेत त्यांचे जीवन दुखी बनले आहे.अशा भूमिहीन शेतमजुरांची पिळवणूकीतून मुक्तता करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतिकारी विचारांची मांडणी केली व भूमिहीन शेतमजुरासाठी लढा दिला.त्यांच्या हयातीपासूनच भूमिहीन,असंघटीत कष्टकरी शेतमजूर यांच्या परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी संघर्ष सुरु होता.खेड्या,पाड्यातील अस्पुश्यांच्या सामाजिक व आर्थिक अशा दुहेरी समस्या होत्या.

बाळासाहेब आंबेडकर यांनी हा दुवा पकडून ग्रामीण भागातील पडीत जमिनी,गायरान जमिनी वन विभागाच्या जमिनीवरील भूमिहीन शेतमजुरांनी केलेल्या अतिक्रमाच्या स्वरक्षणासाठी दादासाहेब गायकवाड भूमिहीन हक्क समिती द्वारे सामाजिक चळवळीतुन सुरवात केली. प्रकाश आंबेडकरांची राजकीय एन्ट्री एका विशेष परिस्थितीत झाली.भूमिहीन शेत मजुरांचे प्रश्न सोडविण्या करिता त्यांना आपण गायरान,पडीत, वनविभागाच्या जमीन ताब्यात घेऊन कसायला लावून शेतमजुरांचे अल्पभूधारक शेतकरी केले. त्याच्या त्या कसलेल्या जमिनी नांवावर करण्यासाठी “भूमिहीन हक्क संरक्षण समिती स्थापन” केली होती. त्यामुळे बाबासाहेबाच्या लढ्यातील एका सेनापतीच्या अर्धवट राहिलेल्या लढ्याला आपण एक वेगळी दिशा देण्याचे काम हाती घेतले होते. “कसेल त्याची जमीन नसेल त्याचे काय?.” या घोषणेने राज्यच नव्हे तर संपूर्ण देश ढवळून निघाला होता.तोच धागा पकडून आपण राजकारण नको समाजकारण हवे, त्याच्या समाज परिवर्तनातून राजकारण करू असाही आपला संकल्प होता.त्यामुळे राज्यातील नव्हे तर देशातील मागासवर्गीय, शोषित, पिडीत,आदिवाशी समाज तुम्हाला अंधार नष्ट करणारा नवा सूर्य प्रकाश म्हणत होती. सूर्याची किरण वरून खाली येतात.इथे प्रकाश खालून वर गेला.

आणि बरेच काही विसरला.असे भूमि कसणारे हक्कदार
कास्तकार म्हणतात. काही लढता लढता मेले. त्या आंदोलनातील लोक काल पण आपल्या सोबत होते आणि आज ही तुमच्या सोबत असतील ते केवळ बाबासाहेबांचे नातु म्हणून.पण कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहक्क समितीचे पुढे काय झाले?.मराठवाडा, विदर्भातील पडीत,गायरान, वनविभाग शेत जमीनी नांवावर झाल्या काय?. आपली राजकीय शक्ती वाढली असली तरी बुलढाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यातील बहुसंख्येने शेतजमिनी नांवावर आज ही झाल्या नाही. त्यांचे दावे अपात्र ठरविण्यात आले. अनेक गांवात वन हक्क समितीचे गठन होत नाही.त्यामुळेच नाहरकत पत्र, ठरावाचे पत्र ग्रामसभा देत नाही. त्याबाबत आता आपली आपल्या पक्षाची कोणतीच ठोस भूमिका का नाही.एस सी,एस टीच्या शे पाचशेच्या मतदानाच्या साठी पाच दहा हजार मतदान असलेल्या बहुजन समाजातील लोकांनां आपणास नाराज करायचे नाही हेच राजकारण त्यामागे आहे की नाही?. अनेक संघटनानां हे भूमिहीन, शेतकऱ्यांचे जन आंदोलन करावे लागत आहे.१९८२/८४ पासुन शेतजमीन कसणाऱ्या भूमिहीन शेतकाऱ्यांच्या जमिनीची नोंद सातबाऱ्यावर होत नाही.

गांवातील बौद्धांचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जागरूकता बहुजनास सहन होत नाही.म्हणून अन्याय, अत्याचार व लक्षवेधी हत्याकांड होत आहेत. म्हणजेच आपण जिथून सुरुवात केली होती.ते समस्या आज ही कायमस्वरूपी अस्तित्वात आहे. यांचा आपणास राजकीय सोयी साठी सोयीस्कर विसर करावा लागत असेल तर सामाजिक आंदोलन राजकिय दृष्ट्या यशस्वी कसे होईल असा माझा प्रश्न आहे.तो तुमच्या भक्तांना कार्यकर्त्यांना चुकीचा वाटत असे.तर त्यांनी आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील असंघटित कष्टकरी शेतमजूर, भूमिहीन लोकांचा सर्वे करावा.आदरणीय ऍड बाळासाहेब आंबेडकर भारिप बहुजन महासंघाचे राष्टीय अध्यक्ष झाल्यावर “माझा पक्ष,माझी सत्ता” घोषणा दिली.आणि मी आंबेडकरी चळवळीतील राजकीय निळ्या आकाशातील चमकणारे तारे आहोत.

हे दाखवून दिले.ज्या डॉ बाबासाहेबाच्या रक्ताचे आपण वारसदार आहेत.त्या बाबासाहेबानी आपले आयुष्य अस्पुष्य समाजाला धार्मिक,सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय अधिकार मिळवून देण्यासाठी खर्ची केले.त्यासाठी त्यांनी अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक संस्था,संघटना, पक्ष निर्माण केल्या. त्याची सुरवात त्यांनी “बहिष्कृत हितकारणी सभा” स्थापन करून केली.पुढे त्याचा विस्तार करत “समाज समता संघ ” उभा केला.राजकीय क्षेत्रात आपले हक्क प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी ‘स्वतंत्र मजूर पक्ष ‘ स्थापन केला. भारतदेश हा कृषी प्रधान आहे ७०% लोक शेतीवर मजुरी करून जगतात.त्यातील ८५% समाज हा बहुजन समाजातील आहे.म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,विमुक्त भटक्या जाती, इतर मागासवर्गीय,आदिवाशी समाजातील लोक आहेत.हे सर्व भारिप बहुजन महासंघाचे अधिकृत सभासद असणारच. त्याच्या साठी बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून राजकीय हक्क्चे व्यासपीठ निर्माण केले होते. तो पक्ष ते विचार आज कोणा कडेच जिवंत राहिले नाहीत.

देशातील मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांनी स्वतःच्या ट्रेंड युनियन काढून त्या स्वतंत्र मजदूर युनियन Independent Labour Union (ILU). संलग्न कराव्यात आणि राष्ट्रीय ट्रेंड युनियन निर्माण करून सरकारवर कायमस्वरूपी दबाव ठेवावा हेच मागासवर्गीय समाजातील कामगारांचे मुख्य उद्धिष्ट असले पाहिजे होते.हे ही बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते.त्या गोष्टीकडे कामगार,कर्मचारी अधिकारी,कार्यकर्ते,नेते पूर्णपणे दुर्लक्ष करतात. बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गाने न जाता नवीन मार्ग शोधतात त्यात आपली मोठी शक्ती खर्च होतेच पण मतभेदांमुळे आंबेडकरी चळवळीतील सर्व समाज विखुरलेल्या जात आहे.यात आपली निर्णायक भूमिका आणि जबाबदारी असली पाहिजे होती.ती आपण एकट्या बौद्ध समाजाला संघटीत न करता सर्वच वंचित समाजाला एकत्र करून संघटीत करण्याची जबाबदारी पार पाडतांना दिसता.परंतु वंचित समाज कोणासोबत प्रामाणिक आहे यांचे सामाजिक आर्थिकदृष्ट्या ऑडीत झाले पाहिजे.

बाळासाहेब, मागासवर्गीय बहुजन समाज हा सर्वात मोठा असंघटीत कामगार वर्ग आहे.आज त्याची संख्या सरकारी आकड्यानुसार ९३ टक्के आहे.त्याचा विकास आणि कल्याण करण्यासाठी अनेक योजना आहेत.त्याची आपणास संपूर्णपणे माहिती असणारच.पण आपण म्हणता की सरकारी योजना मागासवर्गीय समाजाला अपंग बनवितात.मग डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी, कल्याणासाठी विकासासाठी राज्य व केंद्रात ज्या योजना कायदेशीर रित्या बनवुन देशाला अर्पण केला.त्या चुकीच्या होत्या काय?.डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे स्वप्न होते की माझा समाज सत्ताधारी जमात व्हावा. महाराष्टातील आजची राजकीय वर्तमान स्थिती पाहता रिपब्लिकन पक्षातील फुट एकजातीय आहे.केवळ सर्व बौद्ध समाज एकत्र आला तरी राजकीय टक्केवारी पाहता सत्ताधारी बनू शकत नाही.पण सर्व बौद्ध समाजातील आंबेडकरी गट एकत्र आले तर एकच वैचारिक क्रांतिकारी गट मजबूत होऊ शकतो. त्याची एकी पाहून इतर मागासवर्गीय आदिवाशी भटक्या समाजातील लोक या पक्ष कडे आकर्षित होऊ शकतात. हा वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग यशस्वी होतांना दिसत आहे.त्यासाठी एक विश्वास पात्र नेत्याची गरज आहे. आणि ते फक्त बाळासाहेब आंबेडकर पूर्णपणे करू शकतात.

असा विश्वास आता वंचित बहुजनात होतांना दिसत आहे.त्यासाठी आपण नेहमीच दूरदर्शी व धोरणी,मुत्सद्दी पणा दाखवता. धाडशी निर्णय घेऊन नेतृत्व करता त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. २१ जानेवारी १९४९ रोजी औरंगाबादला झालेल्या कार्यकमात बाबासाहेब आपल्या अनुयायांना उदेशून सांगतात.जो पर्यंत तुम्ही तुमची मजबूत संघटना जगाला इतर समाजाला दाखवत नाही तो पर्यंत तुमच्यावर असे अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार होतच राहतील.म्हणून दुसऱ्यावर अवलबून राहू नका.स्वताची ताकद निर्माण करा.मग पहा तुम्हाला कोण त्रास देतो. तुमच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांना शंभर वेळ विचार करावा लागेल.बाळासाहेब, आज मागासवर्गीय समाजात जो तो नेता संस्थापक राष्टीय अध्यक्ष आहेत. त्यांना त्याची मर्यादा आपण दाखवू शकता.प्रत्येक नेत्याला त्याचा मतदार संघ वाटून द्या इतर जिल्ह्यात मतदार संघात ढवळाढवळ करण्याचीही कोणालाही गरज नाही.आपण लिहता की आंबेडकरी चळवळीचा व आंबेडकरी विचाराचा माणूस मोठ्या प्रमाणत मुंबई,नांदेड, विदर्भातील बुलढाणा,अकोला,भंडारा, गोंदिया,चद्रपूर,नागपुर,गडचिरोली,असे काही आंबेडकरी जिल्हे आहेत. तिथे आंबेडकरी विचारधारेची माणस घडविण्याची गरज आहे.(आंबेडकरी चळवळ संपली आहे,पान ४१/४२ )
ऍड बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्यावर लिहणे म्हणजे खूप मोठी जोखीम असते.

त्याच्या भक्तांना त्याच्या बाबत खरे लिहणे पसंत पडत नाही.प्रकाश यशवंत आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीतील एक तरुण तडपदार नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहेत, पण त्याच बरोबर ते अत्यंत अभ्यासू, दूरदर्शी व धोरणी,मुत्सद्दी नि परिवर्तनवादी नेतृत्व म्हणून ही त्यांची ख्याती आहे असे म्हणतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू असल्यामुळे सर्व समाज त्यांचा खूप आदर करतात. पण त्या पलिकडे जाऊन एक स्वतंत्र व्यक्तीमत्व म्हणून त्यानी स्वत:ची ओळख निर्माण करत राजकारणात व समाजकारणात मोठी मजल मारली आहे. खरं तर बाबासाहेबांच्या घरात जन्माला आल्यावर नावाचा जो फायदा मिळतो तो मिळालाच पण त्याच बरोबर मोठ्या माणसाच्या घरात जन्मास येण्याचे तोटे ही असतात.प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू असल्यामुळे उगीच लोकांच्या अपेक्षाही उंचावल्या अन त्यात काही वावगं ही नाही.मात्र त्यातून सावरत त्यानी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करत अकोल्यात वेगळा राजकीय आदर्श घालून दिला.एकमेव नेता असा आहे कि ज्याचा स्वताचा मतदार संघ आहे.बाकी सर्व आंबेडकरी चळवळीतील राजकीय नेते उंटावरचे शहाणे आहेत.जे स्वताला संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेतात पण वीस वर्षात स्वताचा मतदार संघ बांधू शकले नाहीत.म्हणूनच बाळासाहेब आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीचे राजकीय वारसदार आहेत हे सिद्ध होत आहे. करीता मित्रांना शत्रू न बनविता मित्रच राहु द्या मित्र शत्रु झाल्यास काय होते हे एका गोष्ठीतुन पाहता येईल.

एकदा कुत्र्यात व गाढवात पैज लागते की जो लवकरात लवकर मुंबईत जाईल तो सिंहासनावर बसेल. ठरल्याप्रमाणे दोघेही तयार झाले.कुत्र्याला वाटले मीच जिंकेल कारण गाढवापेक्षा मी जास्त धावू शकतो.पण कुत्र्याला पुढे काय होणार यांची नक्की माहिती नव्हती.शर्यत सुरू झाली कुत्रा जोरात धाऊ लागला.पण थोडेसे पुढे गेला नसेल तर लगेच गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.असेच प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात घडत राहिले कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासना जवळ पोहचला तर बघतो तर काय गाढव त्या आधीच पोहचले होते.त्यामुळे त्याने शर्यत जिंकून ते राजा झाले होते.निराश झालेला कुत्रा तेव्हा म्हणतो माझ्याच लोकांनी मला मागे ओढलं नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते.हीच परिस्थिती वंचित मागासवर्गीय बहुजन समाजातील नेत्यांची कार्यकर्त्यांची झाली आहे.म्हणूनच आपल्या माणसांना विश्वासात घ्या,पुढे जाण्यासाठी सहकार्य करा. त्यांना प्रोत्साहन द्या,नाहीतर बाहेरची गाढव आपल्यावर राज्य करीत राहतील.

म्हणूनच बाळासाहेब आपल्या कडून सर्व समाजाची खूप अपेक्षा वाढल्या आहेत. आपण समाजाचे ऐक्य घडवू शकतात. आपण स्वाभिमान आहात, स्वाभिमानी असावे पण समाज हिता करिता अभिमान आणि स्वाभिमान. समान अंतरावर ठेवल्यास बाबासाहेबाचे खरे रक्ताचे आणि वैचारिक वारसदार आपणच ठरू शकता. फक्त आपल्याला वीस पावले मागे येऊन पन्नास पुढे जाता येईल.आपण पंधरा वीस आमदाराची अपेक्षा करता. देशात असंघटीत कष्टकरी कामगार मजूर ९३ टक्के आहे तो शंभर टक्के वंचित समाज आहे.तो जागृत झाला तर पन्नास साठच काय शंभरच्या पुढे आमदार आपण सहज निवडून अनु शकता. त्याकरिता आपल्या समोर आंबेडकरी जिल्ह्याची अभ्यासपूर्ण माहिती आहे.त्याचा योग्य वापर करून संघटना बांधणी केली पाहिजे. क्रांतिकारी आंबेडकरी विचारांच्या सर्व वंचित बहुजन समाजाचे ऐक्य घडवा.आणि अज्ञान अंधश्रद्धा असमानतेच्या अंधारात चाचपडत पडलेल्या वंचित बहुजन समाजाला प्रकाशाच्या यशस्वी प्रवासात सहभागी करा. आपल्या वाढ दिवसा निमिती हार्दिक शुभेच्छा!!!.

प्रबोधन हा एक फक्त शब्द आणि विचारच नाही तर अवघ्या मानवी विश्वाला व त्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक स्थित्यंतरांना योग्य दिशेने, योग्य पध्दतीने प्रभावित करून किंवा संचालित करून समाजाची नव्या दमाने पुनर्रचना आणि पुनर्बांधणी करण्याची प्रक्रिया असते.या प्रबोधनातूच लोक, समाज आणि राष्ट्राची जडणघडण होत असते. लोक प्रबोधन म्हणजे?.लोकांच्या स्वाभिमानाची जागृती,लोकांतील अज्ञानाला-अंधश्रध्देला-असहिष्णुतेला तिलांजली.लोकांना त्यांच्या स्वतंत्र व महत्त्वपूर्ण अस्तित्वाबाबत आणि चांगल्या-वाईटा बाबत सतत सजग आणि सतर्क करत राहणे. लोकांना त्यांच्या समाजाप्रती आणि राष्ट्राप्रती असलेल्या कर्तव्यांची तसेच हक्कांची जाणीव करून देणे, लोकांना जागृत, स्वाभिमानी, ज्ञानसंपन्न, स्वयंभू आणि स्वयंप्रकाशित करण्याची प्रक्रिया असते.राष्ट्र उभारणीसाठी आणि राष्ट्रीय विकास आणि कल्याणासाठी लोक हेच बीज भांडवल ! लोक हेच सर्वस्व.लोक प्रबोधित तर समाज जागृत आणि पर्यायाने राष्ट्र उन्नत व प्रगत असते.कोणताही देश, त्या देशातील लोक म्हणजेच पर्यायाने समाज जर जागृत नसेल तर अशा ठिकाणी विकास आणि प्रगती ह्या अवस्था आभावानेच आढळतात किंवा अर्धवट-डळमळीत स्वरुपात पाहायला मिळतात.म्हणूनच महापुरुषांच्या संतांच्या महामानवाच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर असला पाहिजे.त्यांची विचारांची आठवण करण्यासाठी त्यांचा जन्म दिन,स्मृतिदिना निमित्याने वैचारिक प्रबोधन झाले पाहिजे त्यातूनच परिवर्तन होऊ शकते त्यासाठी मी नियमितपणे जयंतीदिनी, स्मृतिदिनी ,परीक्षण करून लेख प्रपंच करीत असतो.सर्व वाचकांनी त्यावर निपक्षपणे निर्भीडपणे प्रतिकीर्या व्यक्त केल्या पाहिजेत.हीच अपेक्षा असते.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे- भांडूप मुंबई९२२१३१५८०६,अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य