आंतरराष्ट्रीय योग दिन

52

योग हा व्यायामाचा एक असा प्रभावशाली प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्या विविध अवयवांमधीलच नाही तर मन,शरीर आणि आत्मा यांच्यातील संतुलन राखले जाते.योगाभ्यासामुळे शारीरिक व्याधींबरोबरच मानसिक विकारांवर सुद्धा विजय मिळवता येऊ शकतो.योग या शब्दाची उत्पत्ती युज या संस्कृत शब्दापासून झाली आहे.याचा अर्थ आत्म्याचा परमात्म्याशी संयोग किंवा आत्म्याचा चराचरात व्यापून उरलेल्या चेतनेशी संयोग,योग पद्धती जवळपास दहा हजार वर्षांपेक्षा अधिक काळापासून आचरणात आणली जात आहे.वैदिक संहितांनुसार तपस्वी,ऋषी यांच्या संदर्भात प्राचीन काळापासून योगाभ्यासाचे संदर्भ आढळतात.सिंधू संस्कृतीत सुद्धा योगमुद्रा आणि समाधी स्थितीतील मूर्त्या आढळतात.

हिंदू धर्मात साधू,संन्यासी आणि योगी सुरुवातीपासूनच योगमार्गाचे आचरण करत मात्र सामान्य लोकांचा याच्याशी फारसा संबंध नव्हता.अलीकडे सामान्यांमध्ये स्वस्थ,निरोगी,शांततापूर्ण जगण्यासाठी योगाभ्यासाचे महत्त्व वाढले आहे.कारण आजकालची तणावपूर्ण जीवनशैली ही सर्वसामान्यांची दिनचर्या बिघडवून टाकत आहे.आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये मनःशांती टिकवून ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग.योगाभ्यासात शारीरिक कृती आणि योग्य पद्धतीने श्वास घेणे यांचा अभ्यास केला जातो.शरीर,मन आणि आत्मा हे शरीराचे तीन मुख्य घटक,यांच्यातील परस्पर संबंधांचे नियमितीकरण असणे आवश्यक असते.दर दिवशी नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होऊन आपल्याला अंतर्बाह्य आराम मिळतो.योगातील विविध आसनांमधून मानसिक आणि शारीरिक संतुलन राखले जाते.यातून चांगुलपणाची भावना निर्माण होते.

योगाभ्यासातून बौद्धिक पातळी सुधारते आणि आपण आपल्या भावना स्थिर ठेवून एकाग्र होऊ शकतो.योगाभ्यासातून स्व-अनुशासन साधले जाते.योगाभ्यासाचे हे फायदे लक्षात घेऊन २१ जून २०१५ साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.याआधी डिसेंबर २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय मानवतावादी ध्यान आणि योग गुरू श्री.श्री.रविशंकर आणि इतर योग गुरूंनी पुर्तगाली योग परिसंघाच्या प्रतिनिधी मंडळाचे समर्थन केले आणि संपूर्ण दुनियेत २१ जून हा योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी केली.यानंतर ” योग विश्व शांतीसाठी एक विज्ञान ” नावाचे संमेलन ४ – ५ डिसेंबर २०११ मध्ये भरविण्यात आले.जगत गुरु अमृत सूर्यानंद यांच्या म्हणण्यानुसार,विश्व योग दिनाचा विचार त्यापूर्वी दहा वर्षांपासून डोक्यात होता.पण संपूर्ण भारतातून इतक्या मोठ्या संख्येने या विचाराचे समर्थन करणे हे प्रथमच होत होते.

त्या दिवशी श्री.श्री.रविशंकर यांच्या नेतृत्वाखाली विश्व योग दिवस २१ जून रोजी संयुक्त राष्ट्र आणि यूनेस्कोद्वारा घोषित करण्यासाठी स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.कित्येक मोठमोठे योगविद्येत पारंगत असलेले योगी याला उपस्थित होते.
या उपक्रमाचे सूतोवाच भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील आपल्या भाषणात केले होते ज्यात त्यांनी म्हटले होते,“ योग ” ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे.योग हे मेंदू आणि शरीराच्या एकतेचं प्रतीक आहे.मनुष्य आणि प्रकृती यांच्यात सामंजस्य आहे;योग हा विचार,संयम आणि पूर्णत्व प्रदान करणारा आहे.त्याचप्रमाणे प्रकृतीस्वास्थ्यासाठी आणि विश्वाच्या भल्यासाठी एक समग्र दृष्टिकोण प्रदान करणारा आहे.
योगाभ्यासाचा आग्रह हा फक्त व्यायामापुरता नाही तर स्वतःच्या आत एक एकात्मतेची भावना जागवण्यासाठी आहे.आपल्या बदलत्या जीवनशैलीमध्ये योग हा चेतना बनून,आपल्या परिस्थितीतील बदलाशी जुळवून घ्यायला आपल्याला मदत करू शकतो.

यानंतर २१ जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिवस ” म्हणून घोषित करण्यात आला.११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रातील १७७ सभासदांद्वारे २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता मिळाली.प्रधानमंत्री मोदी यांचा हा प्रस्ताव ९० दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने पारित करण्यात आला.हा संयुक्त राष्ट्रातील सर्वात कमी काळात पारित झालेला ठराव ठरला.लोकांच्या स्वास्थ्य आणि कल्याणासाठी संपूर्ण विश्वातील लोकांसाठी एक पूर्णतावादी दृष्टिकोण उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आमसभेद्वारे ‘ वैश्विक स्वास्थ्य आणि विदेशनीती ’ अंतर्गत हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला.
या उपक्रमाला कित्येक वैश्विक नेत्यांनी सुद्धा समर्थन दिले.सगळ्यात आधी नेपाळचे प्रधानमंत्री सुशील कोइराला यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रस्तावाचे समर्थन केले.संयुक्त राज्य अमेरिकेसकट १७७ हून अधिक देशांनी या प्रस्तावाला मान्यता दिली.आजवर आलेल्या कोणत्याही संयुक्त महासभेच्या प्रस्तावातील सहप्रायोजकांपेक्षा यातील सहप्रायोजकांची संख्या सर्वाधिक होती.११ डिसेंबर २०१४ ला १९३ सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेने बहुमताने ‘ योग आंतरराष्ट्रीय दिवस ’ २१ जूनला साजरा करण्याची परवानगी दिली.

भारतात २१ जून २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला गेला.योग दिवसाचा मुख्य कार्यक्रम दिल्लीच्या राजपथावर झाला ज्यात खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला होता.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजपथावर जवळजवळ ३६००० लोकांबरोबर योगासने केली.२१ जून हाच योग दिवस का?आंतरराष्ट्रीय योग दिवस हा २१ जूनला साजरा करण्यामागे वैज्ञानिक आणि पारंपरिक अशी दोन्हीही कारणे आहेत. खगोलशास्‍त्र असे सांगते की सूर्याच्या दोन स्थिती असतात.उत्तरायण आणि दक्षिणायन.जून महिन्याच्या २१ तारखेला सूर्य आपली स्थिती बदलतो म्हणजेच उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते.हा एक नैसर्गिक बदल आहे.जेव्हा सूर्याचे दक्षिणायन सुरू होते.तेव्हा सूर्याचा प्रकाश आणि उष्णता कमी होते.यामुळे वातावरणात बदल होऊ लागतो.याने अनेक रोगांचे आणि आजारांचे उगमस्थान असलेले जीवजंतू,सूक्ष्मजीव आपलं काम करायला सुरुवात करतात आणि माणसं आजारी पडण्याचे प्रमाण वाढायला सुरुवात होते.योगासनांचा आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो.यामुळे आपल्या शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी योगाभ्यास गरजेचा आहे.याच कारणाने या वातावरणीय बदलाचा पहिला दिवस हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडण्यात आला.आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जूनला साजरा केला जातो.

तसेच हा दिवस वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो आणि योगासने ही माणसाला दीर्घायुष्याचा लाभ मिळवून देऊ शकतात अशी धारणा आणि विश्वास असल्याने हा दिवस योग दिवस म्हणून निवडला गेला.औषधे ही केवळ असलेल्या रोगांना नष्ट करतात.त्यातही आयुर्वेद हाच रोगांना हळूहळू समूळ नष्ट करतो.मात्र इतर सर्व प्रकारच्या,आजार लवकर बरा व्हावा म्हणून दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे एक ठिकाणचा आजार दाबला जाऊन शरीरात इतरत्र त्या औषधांचे दुष्परिणाम दिसू लागतात.म्हणूनच या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून योगाला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळायला हवे आणि ते मिळावे यासाठी आजचा हा योग दिवस.चला तर मग….निरोगी आयुष्यासाठी योग आचरणात आणूयात…!!

✒️राजेंद्र लाड (शिक्षक)आष्टी,जि.बीड(मो.९४२३१७०८८५)
मो.८६६८४७९१९२