कोरोना नंतर शाळा सुरू होताना शिक्षकांपुढील आव्हाने!

    53

    माझ्या प्रिय शिक्षक बंधू-भगिनींनो मागील तब्बल पंधरा महिन्यापासून शाळा बंद आहेत. कारण covid-19 या महामारीचा जागतिक स्तरावर झालेला विस्फोट. सर्व जगभरात या साथ रोगाने थैमान घातले असून सर्व जण आपापल्या परीने यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतच आहोत.कोरोनाने कधीही न थांबणारी लोकल ट्रेन, मोठमोठ्या कंपन्या, शासकीय कार्यालये, रेल्वेसेवा, विमानसेवा, शाळा महाविद्यालये, सिनेमागृहे, विविध जागतिक क्रीडा स्पर्धा या सर्वांना प्रभावित केले आहे. जिकडे तिकडे जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरू आहे. शास्त्रज्ञांच्या संशोधनाला मिळालेल्या यशानंतर मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसी निघालेल्या आहेत. त्याचा जगभरात मोठ्या उत्साहाने स्वीकारही होतो आहे. 18 वर्षे वयोगटावरील सर्वांना लस उपलब्ध झाली असून मोठ्या प्रमाणात लसीकरण चालू आहे. मात्र अजूनही आपली 18 वर्षाखालील बालके लसीपासून वंचित आहेत. शास्त्रज्ञांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसात 18 वर्षाखालील बालकांचे लसीकरण नक्कीच सुरु होईल.

    यात तिळमात्र शंका नाही. कोरोना काळात शाळा बंद असल्याने आज पर्यंतच्या इतिहासातील अशी ही पहिलीच वेळ आहे जिथे एवढ्या मोठ्या कालावधीसाठी मुलांनी फक्त आपल्या आई वडील व कुटुंबियांसोबत एकत्र घालवलेला कालावधी प्रकर्षाने विचारात घेण्यासारखा आहे. कोरोना महामारी मुळे सर्व जनजीवन विस्कळीत असताना अनेक बालकांना त्यांच्या भविष्यातील सुंदर स्वप्नांना बाजूला ठेवून आपल्या कुटुंबियांसोबत पायी किंवा वाहनाने जसे जमेल तसे स्थलांतर करावे लागले. त्यात त्यांच्या भविष्यातील स्वप्नांना मोठ्या प्रमाणात तडा गेला. कोरोना महामारीने आपला परिणाम सर्वदूर दाखवायला सुरुवात केली. आणि हा हा म्हणता तब्बल 15 महिने झाले तरी आजतागायत कोरोनावर मात करणे शक्य झाले नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार बुडाले, कारखाने बंद पडले, व्यापार ठप्प झाला त्याचा प्रत्यक्ष परिणाम मानव जीवनावर झाला. मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी निर्माण झाली. बरीच जनता उपासमारीला बळी पडली. आरोग्य सुविधांच्या अभावाने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. लाखो लोकांना मृत्यूने जवळ केले.

    ही सगळी घडी बसायला किमान पुढील तीन-चार वर्षे तरी नक्कीच लागतील. वरील सर्व बाबींकडे आपल्या सर्वांचे सहज लक्ष जाईल ही. पण आपली खरी हानी झाली आहे ती म्हणजे आपल्या बालकांचे भविष्य. कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बंद झाल्याने मुलांचे शिक्षण थांबले. नव्हे चक्क खंडितच झाले. आज पर्यंत एवढा मोठा खंड शिक्षणात कधीही पडला नाही. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.या प्रक्रियेची परिणामकारकता दिसून येण्यासाठी विविध अनुभवांची आवश्यकता असते. तसे अनुभव कोरोना काळात क्वचितच मुलांना अनुभवायला मिळाले.आपण सर्वांनी तसेच शासनाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यात बर्‍या पैकी किमान विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात ठेवता आले. त्यात अनेक समस्या आपल्यासमोर उभ्या राहिल्या. ऑनलाइन शिक्षण, स्वाध्याय, गोष्टींचा शनिवार या व अशा अनेक उपक्रमांतून आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहेच. पण जोपर्यंत शिक्षक – विद्यार्थी , विद्यार्थी – विद्यार्थी , विद्यार्थी- पालक यांच्यामध्ये आंतरक्रिया होत नाही तोपर्यंत शिक्षण प्रक्रियेला गती येणार नाही. म्हणूनच , प्रत्यक्ष शाळा उघडणे व शिक्षक – विद्यार्थी यांच्यात आंतरक्रिया घडणे अतिशय आवश्यक आहे.

    लवकरच आपल्या प्राथमिक शाळा सुरू होतील व आपल्या हातून ज्ञानदानाचे पवित्र कार्य पूर्ववत सुरु होईल. हे होत असताना आपल्या सर्वांसमोर काही आव्हाने उभी राहणार आहेत. त्या आव्हानांना आपणांस सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये प्रामुख्याने_

    *मुलांमधील शारीरिक मानसिक तणाव*
    मोठ्या कालावधीसाठी कोरोनामुळे टाळेबंदी असल्याने मुलांना घरातील बंद खोलीतच दिवस काढावे लागले. यामुळे मुलांच्या शारीरिक वाढीवर मोठा परिणाम झाला आहे. काहींमध्ये व्यायामाचा अभाव व सतत काही तरी खात राहिल्याने स्थूलता, लठ्ठपणा यासारखे शारीरिक विकार दिसून येत आहेत. सतत टीव्ही व मोबाईलच्या वापरामुळे मुलांना त्यांचे व्यसन लागल्यासारखे झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मनाविरुद्ध एखादी क्रिया घडल्यास मुले चिडचिड करताना दिसून येत आहेत. मुले सतत घरातच राहिल्याने मानसिक ताण, तणाव वाढत आहे. वडिलधार्‍यांची कामे ऐकताना मुलांमध्ये कंटाळा वाढला आहे. ऑनलाइन अभ्यासाच्या नावावर मुले मोठ्या प्रमाणात मोबाईलशी जोडली गेल्यामुळे त्यांच्यात अभ्यासाव्यतिरिक्त विविध प्रकारच्या मोबाईल गेम्स जसे:- फ्री फायर,पब्जी यासारखे आत्मघात करणारे खेळ मोठ्या प्रमाणात मुले खेळताना दिसून येत आहेत.

    त्यातून मुलांमध्ये रागीटपणा,स्वार्थीवृत्ती, गुन्हेगारी चिडचिडेपणा यांसारख्या भावनांना खतपाणी मिळत आहे. तसेच तहान भूक हरपून निव्वळ मोबाईल खेळण्याच्या नादात मुलांचे शारीरिक स्वास्थ्य मोठ्या प्रमाणात बिघडताना दिसून येत आहे. अशा वातावरणातून मुले जेव्हा शाळेत येतील, तेव्हा थेट अध्ययन-अध्यापन प्रक्रियेकडे न वळता मुलांना मुक्तपणे शालेय वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी विविध मैदानी खेळ तसेच वृक्षारोपण, रंगकाम, बडबड गीते ,कागद काम अशा पूरक कृतींचा प्रामुख्याने शाळेत सराव व्हायला हवा. काही कालावधीनंतर अध्ययन- अध्यापनास सुरुवात करावी.

    *आरोग्य तपासणी ची गरज*
    बरीच बालके वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांनी किंवा विकारांनी ग्रस्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा शाळा सुरू होताच सर्व विद्यार्थ्यांची तात्काळ शालेय आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. यामध्ये शिक्षकांनी बारकाईने प्रत्येक विद्यार्थ्यांचे निरीक्षण करून कान, नाक, डोळे यांच्याशी निगडित विविध चाचण्या घेऊन दोष शोधावे. मोठ्या प्रमाणात टीवी मोबाईलचा वापर केल्यामुळे मुलांमध्ये अंशत: अंधत्व, दृष्टिदोष, डोळ्यातून पाणी येणे, अस्पष्ट दिसणे अशा समस्या वाढू शकतात. या समस्या दूर होण्यासाठी त्यावर तात्काळ उपाय होणे आवश्यक आहेत. यामुळे मुले आनंदाने अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सहभागी होतील.

    *बालमजुरी*
    शाळा बंद असल्याने सामान्य तथा मध्यमवर्गीय कुटुंबातील अनेक मुले मोठ्या प्रमाणात बालमजुरीमध्ये गुंतलेले आहेत. कारण पालकांच्या व्यवसायात मदत म्हणून किंवा घरी उपासमारीला बळी पडू नये या कारणाने दहा ते चौदा वयोगटातील बरीच मुले बालमजूरीकडे वळलेली आहेत. खेड्यातील मुले शेती, शेळी पालन, गुरे चारणे, मासेमारी करणे, भाजीपाला विक्री, फळ विक्री अशा छोट्या छोट्या व्यवसायांमध्ये गुंतलेले आहेत. शाळा बंद असल्याने व रोज नगदी पैसे मिळत असल्याने या मुलांमध्ये शिक्षणाबद्दल उदासीनता आलेली आहे. तसेच पालकांनाही चार पैसे मिळत असल्याने व *शिकून कुठे नोकरी लागणार आहे* अशा नकारात्मक विचाराने बऱ्याच मुलांचे पुढील शिक्षण खंडित होण्याची शक्यता आहे.अशा वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षणप्रेमी व्यक्ती, शिक्षक यांनी जाणीवपूर्वक अशा पालकांचे समुपदेशन करून शिक्षणापासून दुरावलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे.

    *बालविवाह*
    शिक्षण खंडित झाल्यामुळे मोठा परिणाम मुलींच्या शिक्षणावर झालेला आहे. मागील अनेक वर्षांच्या अथक परिश्रमातून, शासनाच्या विविध गळती रोखण्यासाठीच्या कन्या योजनांमुळे, शिक्षकांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे मुलींच्या शिक्षणात बऱ्यापैकी सुधारणा होत असताना कोरोना महामारीचे कारण पुढे करत खेड्यातील पालकांनी आपल्या कोवळ्या वयातील मुलींचे लग्न लावण्यास सुरुवात केली आहे. ज्या मुलींनी भविष्यात खूप शिकून अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले त्यांचे स्वप्न हवेतच विरले. लग्न कमी खर्चात व मोजक्या लोकांमध्ये होत असल्याने एकाचे पाहून दुसऱ्याने आपल्या वरील जबाबदारी झटकून टाकली व मोठ्या कर्जातून मुक्त झाल्याचा आनंद व्यक्त केला. पालक आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले खरे पण, ज्या मुलींचे बालविवाह झाले त्या बिचार्‍या आयुष्यभराच्या जायबंदी झाल्या. कारण बालविवाहातून जन्माला येणारे मूल कुपोषित जन्माला येण्याचे प्रमाण खूप आहे. तसेच आईच्या जीवितास मोठ्या प्रमाणात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशा वेळी गावातील लोकांना बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम समजावणे तसेच जनजागृती करणे हे ही मोठे आव्हान आपल्या सर्वांपुढे आहे त्यात आपण शिक्षकांनी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. शेवटी पालकांचा निर्णय हा अंतिम असतो. पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.

    बरीच मुले-मुली शेतीच्या किंवा घरच्या कामात आई-वडिलांचा आधार बनले आहेत. अशा मुलांच्या पालकांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या पाल्याची शिक्षणाबद्दलची अभिरुची पालकांना समजावून सांगणे हे आपले काम आहे.आपणही कोरोनामुळे आपले कार्य नियमितपणे करू शकलो नाही. तेव्हा कोरोना नंतर शाळा सुरू होताना आपल्या शैक्षणिक कार्याला अधिक गतिमान बनवूया जेणेकरून समाजामध्ये आपल्या अस्तित्वाची जाणीव होईल व समाजात शिक्षकांबद्दल असणारे गैरसमज दूर होतील. अशा अनेक आव्हानांना आपणांस सामोरे जायचे आहे. त्यासाठी सर्वांनी सज्ज होऊया व ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात जास्तीत जास्त योगदान देऊन आपली भावी पिढी भयमुक्त, सशक्त, विद्वान बनवूया.
    धन्यवाद!

    ✒️लेखक:-जगदिश सु. जाधव (प्र.मुख्याध्यापक)
    जि.प. उच्च प्राथ.शाळा, जगापुर पं.स.पुसद जि.यवतमाळ