आनोरे गावात महात्मा फुलेंच्या स्मृतीदिनानिमित्त वैचारिक प्रबोधन !…

    97

    ▪️ महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घ्या – सुमित्र आहिरे

    ▪️महात्मा फुले यांचे जीवन कार्य म्हणजे अखंड ऊर्जेचा स्रोत – पी.डी.पाटील

    ▪️शिवजयंतीचे जनक तात्यासाहेब महात्मा फुलेच – लक्ष्मणराव पाटील 

    ✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

    धरणगांव(दि.6डिसेंबर):-२०२१ रविवार रोजी महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला आनोरे गावात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैचारिक प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले. या प्रबोधनपर व्याख्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरी तुकाराम महाजन यांनी केले.सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांना ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. वैचारिक प्रबोधनाचे प्रमुख वक्त्यांचा परिचय पिंप्री चे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सतीश शिंदे सर यांनी करून दिला.

    प्रथमतः वक्ते पी.डी. पाटील यांनी तात्यासाहेबांचा जीवनपट सांगून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचे जीवन कार्य अतिशय प्रेरणादायी आहे, तात्यासाहेबांचे चरित्र वाचनाने अखंड ऊर्जेचा स्रोत मिळतो असे प्रतिपादन केले. दुसरे वक्ते लक्ष्मणराव पाटील यांनी तात्यासाहेब नसते तर? या विषया संदर्भात वेगवेगळे उदाहरण दाखले देऊन तात्यासाहेबांच कार्य विशद केले. शिवराय व भिमराय यातील दुवा म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले होय, असे प्रतिपादन केले.व्याख्यान पुष्पाचे प्रमुख मार्गदर्शक माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र आहिरे यांनी महात्मा फुले यांचे शैक्षणिक, सामाजिक कार्य व सत्यशोधक समाज यावर विस्तृत असे मार्गदर्शन केले. स्वातंत्र्य – समता – न्याय – बंधुता ही मूल्ये जोपासली पाहिजे, हीच खरी तात्यासाहेबांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन सुमित्र आहिरे यांनी केले.

    या वैचारिक प्रबोधन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै.बी.जे. महाजन विद्यालयाचे उपाध्यक्ष रमेश खंडू महाजन होते. या वैचारिक प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक वक्ते सुमित्र आहिरे साहेब, पी.डी.पाटील सर, लक्ष्मणराव पाटील सर होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून आनोरे गावाचे सरपंच स्वप्नील महाजन, डॉ. राजाराम चत्रु महाजन, मिलिंद भालचंद्र पाटील, मधुकर नामदेव देशमुख, सुरेश निंबा पाटील, कल्पना कापडणे, ओबीसी मोर्चा चे राज्य कार्यकारणी सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ, माळी समाजाचे सल्लागार पंच हेमंत माळी सर, प्रोटॉन शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष सतीश शिंदे सर, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे उपस्थित होते.

    या प्रबोधनपर व्याख्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरी महाजन यांनी तर आभार प्रदर्शन माजी सरपंच रमेश खंडू महाजन यांनी केले.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनोरे गावाचे सरपंच स्वप्नील महाजन, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व अनोरे गावाचे तरूण युवक, जेष्ठ ग्रामस्थ, सर्व मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.