चंद्रपूर जिल्ह्यात 31 जुलै पर्यंत जमावबंदी कायम-जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार

27

🔸कोरोनावर मात करण्यासाठी घराबाहेर न पडण्याचे आवाह

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि. 30जून): जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या काही बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज आदेश काढले आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी संपूर्ण जिल्ह्यात कलम 144 लागू असणार आहे. त्यामूळे 5 पेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित येण्यास मज्जाव आहे.कोरोना आजारात सातत्याने वाढ होत असून 95 पर्यंत कोरोना रूग्ण झाले आहेत.त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.

सार्वजनिक स्थळी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमा होऊ नये. परंतु तिथे पाचपेक्षा कमी व्यक्ती एकत्र येत असेल त्यावेळी त्यांचे कमीत कमी 6 फूट सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहील.सार्वजनिक ठिकाणी, स्थळी पान,तंबाखू,धूम्रपान करणे इत्यादी प्रतिबंध राहील.

धार्मिक स्वरूपाचे समुपदेशन धर्मपरिषद धार्मिक गर्दीचे आयोजन करू नये.कोरोना विषाणूच्या अनुषंगाने कोणत्याही नागरिकांनी समाजात जनमानसात अफवा अपप्रचार व भीती व्हाट्सअप फेसबूक,ट्विटर, वृत्तपत्र, सोशल मीडिया व होर्डिंग इत्यादी वर प्रसारित करू नये तसेच अधिकृत माध्यमाद्वारे माहिती न घेता दिशाभूल करणारी माहिती प्रसारमाध्यमांवर प्रसारित करू नये.

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने घोषित करण्यात आलेल्या क्वारटाईन स्थळांच्या 100 मीटर परिसरातर्गत एकत्रित येण्यास व हालचाल करण्यास निर्बंध घालण्यात येत आहे.

खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे मिरवणूक,रॅली, सामूहिक कार्यक्रम ,समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव ,उरूस ,जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा व इतर सर्व स्पर्धा, आंदोलने इ.यांना मनाई राहील.

खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारची कृत्ये, कार्यशाळा ,प्रशिक्षण वर्ग,देशांतर्गत व परदेशी सहल यांचे आयोजन करण्यासाठी मनाई राहील.शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, सुपरमार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब,पब, क्रीडांगणे, मैदाने,जलतरण, तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा ,संग्रहालये ,गुटखा तंबाखू, पान विक्री इत्यादी बंद राहील.

निवासाची सोय असलेले सर्व हॉटेल,लॉज,खाजगी विश्रामगृह बंद राहतील.सामाजिक अंतर ठेवून दैनंदिन बाजार भरवता येईल परंतु आठवडी बाजार भरविता येणार नाही.

प्रवास :

आंतरराज्यीय व आंतरजिल्हा विनापरवाना प्रवासी वाहतुकीकरिता बंद असेल.परराज्यात,राज्यातर्गत( चंद्रपूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात) प्रवासाकरिता http://covid19.mhpolice.in यावर ऑनलाईन अर्ज करावा.

चंद्रपूर जिल्हा बाहेरून सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना आरोग्य विभाग यांचेकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार 14 दिवस होम क्वारन्टाईन किंवा संस्थात्मक विलगीकरण करण्यात येईल होम क्वारन्टाईन किंवा संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेली व्यक्ती इतरत्र फिरताना आढळल्यास रुपये 2 हजार दंड व मास्कचा वापर न केल्यास रुपये 200 इतका दंड आकारण्यात येईल व संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता चे कलम 188, 269,270 ,271 नुसार कार्यवाही करण्यात येईल.

65 वर्षावरील व्यक्ती, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले (कोमोरबेडिटीस) व्यक्ती व 10 वर्षाचे आतील बालके गर्भवती महिला यांनी अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी व वैद्यकीय उद्देशा शिवाय घराबाहेर निघू नयेत.अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी/ अधिकारी व संबंधित व्यक्ती यांचे व्यतिरिक्त इतर व्यक्तींच्या हालचालीस रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत प्रतिबंध राहील.

जीवनावश्यक असलेल्या पुढील बाबी कार्यरत राहतील:

अत्यावश्यक किराणा सामान, दुग्ध,दुग्धोत्पादने, फळे व भाजीपाला, पार्सल स्वरूपात काउंटर तसेच इतर मार्गांनी विक्री,वितरण व वाहतूक करण्यास परवानगी राहील.

जीवनावश्यक खाद्यपदार्थ किराणा, दूध, दुग्धजन्य पदार्थ विक्री व वाहतूक, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस मासे बेकरी, पशुखाद्य यांची किरकोळ विक्री सकाळी 9 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहील. परंतु, दुकान आस्थापना यामध्ये एकाच वेळी पाच पेक्षा जास्त ग्राहक उपस्थित राहणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. त्याचप्रमाणे दुकान, आस्थापना समोर आणि फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.

खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस ,मासे यांची वाहतुक व साठवण.अत्यावश्यक वस्तूंची पुरवठासाखळी आणि वाहतूक. पार्सल स्वरूपात सुविधा उपलब्ध करून देण्याचे अटीवर उपहारगृहे, खाद्यगृहे घरगुती खानावळ स्वीट मार्केट, फरसाण सेंटर व चहा नाष्टा सेंटर सुरू राहतील तथापि प्रत्यक्ष दुकानात ग्राहकांसाठी बैठक व्यवस्थेस मनाई असेल.

पावसाळी ऋतू संबंधित साहित्य जसे छत्री, रेनकोट, प्लॅस्टिक शीट, कव्हर यांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात येत आहे.त्यामुळे सदर साहित्याची विक्री व वितरणाबाबत वेळ सकाळी 9 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहील.

प्रसारमाध्यमांचे सर्व प्रकारचे दैनिक, नियतकालिके, टीव्ही न्यूज चैनल इ.कार्यालय.किमान मनुष्यबळाचा सह बँक एटीएम, कॅश लॉजिस्टिक आणि कॅश ट्रांजेक्शन व अन्य संबंधित सेवा,मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे, रुग्णालये, औषधालय, चष्म्याची दुकाने, औषधांची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक, पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑइल एजन्सी यांचे वितरण, विक्री, साठवणूक आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक सुरू राहतील.

शेतीविषयक उत्पादन/ सुविधा /आस्थापना संबंधाने पुढील बाकी कार्यरत राहतील:

सर्व प्रकारचे शीतगृहे,वखार ,गोदामा संबंधित सेवा,घाऊक वितरणासाठी आणि सदर बाबींशी संबंधित पुरवठा साखळी,कृषी उत्पादन व किमान आधारभूत किंमत यांच्याशी संबंधित कार्य करणारी कृषी उत्पन्न बाजार समिती व राज्य शासनातर्फे अधिकृत असलेले मंडी, बाजार विशेषतः कापूस, तुर व धान खरेदी,विक्री आस्थापना,दुकाने सुरू राहतील.

शेतकरी व शेतमजूर यांचेकडून करण्यात येणारी शेतीविषयक कामे मासेमारी व मत्स्य व्यवसाय संबंधित सर्व कामे व शेती विषयक अवजारे,यंत्र विक्री व दुरुस्ती संबंधित मान्यताप्राप्त दुकाने,आस्थापना (किमान मनुष्यबळासह),शेती संबंधित यंत्रे,अवजारे चालविण्यासाठी आवश्यक असणारा मजूरवर्ग,केंद्र,शेतमाल आणि अन्य वस्तूंची आयात निर्यात आणि वाहतूक, राज्यांतर्गत व आंतरराज्य कृषी फलोत्पादन संबंधित अवजारे, यंत्रे जसे पेरणी,कापणी यांची वाहतूक.खते कीटकनाशके व बियाणे यांच्याशी निगडित उत्पादन व पॅकेजिंग आणि किरकोळ विक्री संबंधित उद्योग/ आस्थापना /दुकाने संपूर्ण जिल्ह्याकरिता सोमवार ते रविवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहतील.

लग्न समारंभाकरिता पुढीलप्रमाणे परवानगी राहतील:

लग्न समारंभ (50 लोकांच्या उपस्थितीत) सामाजिक अंतर राखून करण्यास परवानगी असेल. परंतु, सदर परवानगीही उपविभागीय अधिकारी/ तहसिलदार यांचेकडून प्राप्त करणे बंधनकारक राहील. विवाह करिता 50 लोकांच्या कमाल मर्यादित उपस्थितीत ज्यामध्ये प्रत्येकी पाच व्यक्तींचे बँड पथक सुगम संगीत कलावंत यांची उपस्थिती ठेवून खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात पार पाडण्यास परवानगी असणार आहे.

तसेच,अंत्यविधीकरिता सामाजिक अंतर राखून 50 लोकांचे उपस्थितीस परवानगी राहील.

प्रवास व प्रवासी वाहतूकी संबंधाने पुढील बाबी कार्यरत राहतील:

जिल्हांतर्गत प्रवासाकरिता बस सेवा व 50 टक्के प्रवासी क्षमतेचा सामाजिक अंतर राखून निर्जंतुकीकरण उपाय राबवून सुरू राहतील.

जिल्हा अंतर्गत प्रवास करण्यास (दुचाकी,चारचाकी वाहनाने) नागरिकांस कोणत्याही परवानगीची आवश्यकता राहणार नाही. परंतु, चारचाकी वाहनाच्या बाबतीत वाहन चालकासह केवळ दोन प्रवासी वैद्य राहील आणि वाहनांमध्ये सॅनीटायजर ठेवून प्रवास करणाऱ्या व्यक्तीस मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच दुचाकी करिता केवळ दुचाकीचालक यांनाच वाहन चालविण्यास परवानगी असणार आहे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्राकरिता प्रवासी वाहतूक करिता रिक्षा,ऑटोरिक्षा चालक व दोन प्रवाशांसह रिक्षा ऑटोरिक्षाची वाहतूक सुरू राहील.

परंतु रिक्षा, ऑटोरिक्षा मध्ये सॅनीटायजर ठेवणे व मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल सदर वाहतूक ही ग्रामीण क्षेत्राकरिता लागू राहणार नाही.दुचाकी, चारचाकी, रिक्षा, ऑटोरिक्षा याद्वारे सायंकाळी 9 ते सकाळी 5 या कालावधीत प्रवास करता येणार नाही.

शासकीय व खाजगी कार्यालय संबंधाने पुढील बाबी कार्यरत राहतील:

जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय महामंडळ कार्यालय शंभर टक्के कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती सुरू राहतील.

शैक्षणिक संस्था,शाळा,कॉलेजमधील कार्यालय, कर्मचारी यांची अध्यापना व्यतिरिक्त कामाकरिता जसे ई-लर्निंग कन्टेन्ट, उत्तरपत्रिकांची तपासणी,निकालपत्र संबंधित कार्यवाही करण्याकरिता उपस्थितीस परवानगी असणार आहे.

उद्योग संबंधाने पुढील बाबी कार्यरत राहतील:

सर्व प्रकारचे शहरी व ग्रामीण भागातील औद्योगिक आस्थापना,वसाहती, युनिट सुरू राहतील.परंतु कोविड-19 संबंधाने राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

बांधकाम संबंधी पुढील बाबी कार्यरत राहतील:

शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्रकारची बांधकामे सुरू राहतील.परंतु बांधकाम स्थळी कामगार उपस्थित राहील व कोणत्याही कामगारांस बाहेरून आणण्यास परवानगी नसेल परंतु कोविड-19 संबंधाने राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

सलून,स्पा,बार्बर शॉप, ब्युटी पार्लर, केस कर्तनालय सुरु राहतील:

सलून,स्पा, केस कर्तनालय या आस्थापना सोमवार ते रविवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहतील. यामध्ये केवळ हेअरकट, डाईंग हेअर, थ्रेडींग करण्यास परवानगी असेल विशेषता त्वचेसंबंधी कोणत्याही बाबीस परवानगी असणार नाही. यासंबंधी पत्रक दुकानाचे दर्शनी भागावर प्रसिद्ध करावेत.

सदरील आदेशांचे पालन न करणारे, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, 269, 270,271 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल सदरचा आदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिनांक 1 जूलै ते 31 जूलै या कालावधीत करीता लागू राहील तसेच प्रतिबंधित क्षेत्राकरिता (कंटेनमेंट झोन) लागू राहणार नाही