राज्यात आतापर्यंत १०० पोलिसांचा करोनामुळे मृत्यू

30

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.30जुलै):-राज्यातील पोलीस दलासाठी धक्कादायक बातमी आहे. करोनाच्या संसर्गामुळं राज्यात आतापर्यंत १०० पोलिसांचा करोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील करोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं पोलिसांवरील जबाबदारी प्रचंड वाढली आहे. करोनाचा संसर्ग आटोक्यात येण्यासाठी लॉकडाऊन यशस्वीपणे राबवणं गरजेचं आहे. त्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून पोलीस आघाडीवर राहून कर्तव्य बजावत आहेत. लॉकडाऊनचे नियम नागरिकांकडून मोडले जाऊ नयेत म्हणून डोळ्यात तेल घालून काळजी घेत आहेत.
जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तैनात असलेल्या पोलिसांनाही करोनाचा मोठा फटका बसला आहे. राज्यात आतापर्यंत ९,०९६ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. यात ९३७ अधिकारी तर ८१५९ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील ७२२ अधिकाऱ्यांसह एकूण ७०८४ पोलीस करोनामुक्त झाले आहेत. तर, आतापर्यंत १०० पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यात आठ अधिकारी आणि ९२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यातील ठिकठिकाणच्या रुग्णालयांमध्ये एकूण १९१२ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. त्यात २०७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.