तीन लाखासाठी मोडला विवाह

    51

    ✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    अमरावती(दि.9ऑगस्ट):-विवाह जुळवून साखरपुडा आटोपल्यानंतरही केवळ तीन लाख रूपये हुंडा मिळत नसल्याने भावी नवरदेवाने लग्न मोडल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मुलींच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्याने वराविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    यासंदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार, वरूड तालुक्यातील शेंदूरजना घाट येथील शुभम दीपक बागडे या युवकाचा जरूड गावातील एक सामान्य कुटुंबातील मुलीसोबत विवाह जुळला होता. ३ जुलैला त्यांचा जरूड येथे मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर पार पाडत साखरपुडादेखील झाला. साखरपुडा आटोपल्यानंतर शुभम बागडे व त्याच्या पाच नातेवाईकांनी मुलीच्या वडिलांना लग्नासाठी तीन लाख रूपयाच्या हुंड्याची मागणी केली. परंतु करोनामुळे आलेले आर्थिक संकटामुळे तीन लाख देणे शक्य नसल्याचे त्यांनी संगितले. मुलीच्या वडीलांनी हुंडा देण्यास नकार दिल्याने त्यांनी लग्न मोडण्यात येत असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी साक्षगंधात मुलीच्या वडिलांनी दिलेली सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफदेखील परत करण्यास नकार दिला. त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.