नियंत्रण कक्ष तक्रार केंद्र न राहता समाधान केंद्र बनावे : आमदार प्रतिभाताई धानोरकर

36

🔹आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते तालुका नियंत्रण कक्षेचे उदघाटन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.18मार्च):- नागरिकांच्या छोट्या छोट्या समस्या असतात. त्याकरिता त्यांना सरकारी कार्यालयात वेळ व पैसा खर्च करावा लागत असतो. त्याकरिता तालुक्यातील समस्या निकाली काढण्याकरिता आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पुढाकारातून वरोरा तालुका नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. हे केंद्र फक्त तक्रार केंद्र न राहता समाधान केंद्र बनावे असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.यावेळी उपविभागीय अधिकारी शिंदे, भूमी अभिलेख उपअधीक्षक मुकेश सेलोकर, अभियंते कामडी, नायब तहसीलदार मधुकर काले यांची उपस्थिती होती.

वरोरा विधानसभेत मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग आहे. येथील अनेक गावातील ग्रामस्थांना दूरवरून तालुक्याच्या ठिकाणी यावे लागत होते. छोट्या कामाकरिता त्यांना दिवस घालवावा लागत होता. त्यामुळे त्यांना वेळ व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात सहन करावे लागत होते. हे टाळण्याकरिता आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत हे केंद्र स्थापन केले.
हा नियंत्रण कक्ष १२ महिने आणि २४ तास तहसील कार्यालयाच्या एका दालनात सुरु करण्यात आला आहे. नागरिकांना प्रशासनाला कोणतीही माहिती द्यायची असेल किंवा कोणत्याही विभागाबाबत तक्रार असेल तर त्यांना तालुका नियंत्रण कक्षात ०७१७६२८२११० या क्रमांकावरून संपर्क केल्यास त्या तक्रारीचे निराकरण प्रशासनामार्फत केले जाणार आहे .या लोकहितकारी केंद्राचा लाभ तालुक्यातील शेवटच्या घटकाला प्रश्न सोडविण्याकरिता होतील असा विश्वास आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केला.