शेती आणि शेतकरी या विषयाला प्राधान्य मिळवून देणारे,हरित क्रांतीचे प्रणेते – वसंतराव नाईक

33

१ जुलै महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.१ जुलैपासून सुरू होणारा हा आठवडा आणि ७ जुलैला संपणार आहे.बऱ्याच ठिकाणी हा आठवडा कृषी सप्ताह म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे.राज्याची आर्थिक व्यवस्था मुख्यतः कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे.कृषी करणाऱ्या शेतकऱ्यांमुळेच आपल्याला अन्न मिळते.त्यामुळे महाराष्ट्रात कृषी दिनाचे खुप महत्व आहे.हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने १ जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा होता.

कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले होते.वसंतराव नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली.वसंतराव नाईक हे हाडाचे शेतकरी होते.’शेती आणि शेतकरी’ हे त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते.शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.तसेच त्यांनी राज्यात कृषी विद्यापीठा’ची स्थापना केली.शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली.१९७२ च्या दुष्काळाचे संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारले आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला.राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो.मात्र सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत नाही.

✒️लेखक:-राजेंद्र लाड(आष्टी,जि.बीड)मो:-९४२३१७०८८५