अजरामर कवियत्री बहिणाबाई चौधरी

30

मराठी साहित्यातील अजरामर कवियत्री बहिणाबाई चौधरी यांची आज जयंती. बहिणाबाई चौधरी यांचा जन्म २४ ऑगस्ट १८८० रोजी जळगाव जवळील असोदे या गावी झाला. त्या वेळच्या परंपरेनुसार वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. दुर्दैवाने त्यांना तरुणपणीच वैधव्य आले. सुरवातीचे एकत्र कुटुंब विभक्त झाल्यावर आणि नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांचे जीवन हलाखीत गेले. पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपली कन्या काशी आणि पुत्र सोपानदेव व ओंकार यांच्यावर चांगले संस्कार केले. बहिणाबाई या कधीही शाळेत गेल्या नाहीत. त्यांना लिहिता वाचता येत नव्हते त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्या निरिक्षर होत्या तथापि त्यांना कवितेची निसर्गदत्त देणगी लाभली होती.

घरातील आणि शेतातील कामे करता करता त्यांना काव्य सुचले आणि ते काव्य मराठी साहित्य विश्वात अजरामर ठरले. बहिणाबाई शेतात गेल्या की शेतीवर उत्स्फूर्त कविता म्हणत. घरकाम करतानाही त्यांना कविता सुचत. घरकाम करता करता त्या कविता त्या गुणगुणत तसेच जात्यावर दळताना विविध प्रकारच्या ओव्या म्हणत. त्यांनी अशा हजारो कविता केल्या आहेत मात्र आज त्या सर्व उपलब्ध नाहीत. बहिणाबाईंचे चिरंजीव सोपानदेव चौधरी हे शाळेत जाऊ लागल्यावर ते बहिणाबाईंच्या कविता आपल्या वहीत लिहून घेऊ लागले. याकामी त्यांना त्यांचे एक मावसभाऊ पितांबर चौधरी हे मदत करत. बहिणाबाई काम करताना जेंव्हा कविता म्हणत तेंव्हा सोपानदेव त्या कविता आपल्या वहीत लिहून घेत असत. त्यांचे चिरंजीव सोपानदेव चौधरी हे ही पुढे महाराष्ट्रातील नामवंत कवी म्हणून नावारूपास आले.

बहिणाबाईंचे चिरंजीव सोपानदेव व मावसभाऊ पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली कविता, गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. बहिणाबाईंच्या मृत्युनंतर सोपानदेव यांनी हे हस्तलिखित आचार्य अत्रे यांना दाखवले. आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या त्या सर्व कविता वाचल्या आणि अत्रे उदगारले “अहो हे तर बावनकशी सोने आहे! हे महाराष्ट्रापासून लवपुन ठेवणे हा गुन्हा आहे!” आचार्य अत्र्यांनी ते सर्व साहित्य स्वतःकडे घेतले आणि ते प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. १९५२ साली अत्र्यांनी स्वतः लिहिलेल्या प्रस्तावनेसह बहिणाबाईंच्या ३५ कविता असलेला काव्य संग्रह प्रसिध्द केला. आचार्य अत्र्यांमुळेच या महान कवीयत्रीचा महाराष्ट्राला परिचय झाला. पुढे बहिणाबाईंच्या अनेक कविता प्रसिद्ध झाल्या. लोकप्रिय झाल्या. संपूर्ण महाराष्ट्राला बहिणाबाईंच्या काव्य प्रतिमेने भुरळ घातली. प्रत्येकाला ती आपली कविता वाटली. बहिणाबाईंच्या सर्व कविता त्यांच्या मातृभाषेत म्हणजे वऱ्हाडी – खानदेशी – अहिराणी भाषेत आहे. त्यांच्या कवितांचे विषय सासर-माहेर, संसार, शेतीची कामे, निसर्ग, पशुपक्षी, मराठी सण – उत्सव, भाऊ, बहीण, आई वडील असे होते. या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती.

हीच आत्मीयता त्यांच्या कवितेतून झळकत होती. तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरिक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुख दुःखाकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्वज्ञान ही त्यांच्या काव्य प्रतिभेची वैशिष्ट्ये होती. शालेय अभ्यासक्रमात त्यांच्या अनेक कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. अरे संसार संसार – जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके तेंव्हा मियते ( मिळते ) भाकर…. खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने जीव झाडाले टांगला…. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकला हाकला तरी येतं पिकांवर… धरत्रीले दंडवत…. यासारख्या त्यांच्या कितीतरी कविता शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. या कविता न अभ्यासलेला एकही व्यक्ती महाराष्ट्रात सापडणार नाही. शाळेत जाणाऱ्या सर्व मुलांच्या या कविता तोंडपाठ आहेत. महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांनी या कवितांचे पारायण केले आहे. महाविद्यालयातही त्यांचा कविता अभ्यासण्यासाठी आहेत. बहिणाबाईंच्या कवितेने महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांना भुरळ घातली आहे.

महाराष्ट्राच्या साहित्य विश्वात बहिणाबाई चौधरी हे नाव आणि त्यांच्या कविता अजरामर आहेत. मराठी साहित्य विश्वातील त्यांचे स्थान ध्रुव ताऱ्यासारखे अढळ आहे म्हणूनच महाराष्ट्र शासनाने जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे ठेवले आहे. जी व्यक्ती कधीही शाळेत गेली नाही त्या व्यक्तीचे नाव विद्यापीठाला दिले जाते यातूनच बहिणाबाईंचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. आपल्या काव्य प्रतिभेने मराठी साहित्याला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या या महान कवीयत्रीचे ३ डिसेंबर १९५१ रोजी निधन झाले. आज त्यांची १४१ वि जयंती आहे. जयंतीदिनी बहिणाबाई चौधरी यांना विनम्र अभिवादन!

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५