मोर्शी तालुक्यातील संत्रा गळतीमुळे झालेल्या नुकसानीची जिल्हा समितीने केली पाहणी !

44

🔸संशोधकांनी केले संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन !

🔹संत्रा उत्पादनात ५० टक्के घट आल्यामुळे शासनाला सकारात्मक अहवाल पाठविण्याची मागणी !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.22सप्टेंबर):-तालुक्यामध्ये संत्रा गळतीमुळे झालेल्या नुकसानाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी व त्याची कारणे शोधून उपाययोजना करण्यासाठी संत्रा आंबिया व मृग बहार फळगळ संदर्भात प्रतिनिधीक सर्वेक्षण समिती प्रमुख उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, डॉ अनिल ठाकरे, डॉ प्रफुल महल्ले, यांच्या उपस्थितीत समिती सदस्यांतर्फे मोर्शी तालुक्यातील संत्रा बागांची पाहणी करून सर्वेक्षण करण्यात आले.

मोर्शी तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून मोर्शी तालुक्यामध्ये आंबिया बहराची फळगळ मोठ्या प्रमाणात झाली असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरू हवालदिल झाला आहे त्यामुळे शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करून दिलासा द्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विविध तक्रारी करून संत्रा फळ गळतीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती त्यांच्या मागणीची दखल घेऊन आज मोर्शी तालुक्यामध्ये संत्रा गळतीमुळे झालेल्या नुकसानाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी व त्याची कारणे शोधून उपाययोजना करण्यासाठी संत्रा आंबिया व मृग बहार फळगळ संदर्भात प्रतिनिधीक सर्वेक्षण समिती प्रमुख उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्या उपस्थितीत मोर्शी तालुक्यातील संत्रा बागांची पाहणी करून सर्वेक्षण करण्यात आले.

मोर्शी तालुक्यात आंबिया व मृग या दोन्ही बहारात अज्ञात रोगाचे आक्रमण, संत्रा गळती, पावसाचा खंड, अतिवृष्टी, वाढलेले तापमान इत्यादी कारणामुळे आंबिया बहारात फळगळ, मृग बहारात बहार न फुटणे व फुटलेल्या बहाराची गळ होणे अशा विविध अडचणी निर्माण झाल्यामुळे सदर फळगळीमुळे संत्रा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण झालेली आहे.यावेळी जिल्हास्तरीय समितीने मोर्शी उपविभागातील मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतक-यांची आंबिया व मृग बहारासाठी दापोरी, हिवरखेड, लाखारा उमरखेड, येथील संत्रा बागांची रेण्डमली तपासणी करून फळगळ नियंत्रणात्मक उपाय योजनांबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करून फळगळीमुळे संत्रा उत्पादनात ४० ते ५० टक्के पेक्षा जास्त घट झाली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी संशोधकांच्या व जिल्हा स्तरीय समितीच्या निदर्शनास आणून दिले.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मदत देणे करीता संपुर्ण सर्वेक्षण करण्याची गरज असल्याचे सांगून याबाबत शासनाकडे तात्काळ ५० टक्के पेक्षा जास्त घट झाल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा सकारात्मक अहवाल पाठविण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ, शिवाजी कृषि महाविद्यालय व शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय यांचेशी समन्वय साधून तात्काळ सविस्तर अहवाल सादर करण्याची विनंती प्रतिनिधीक सर्वेक्षण समितीला केली.

यावेळी संशोधकांनी मोर्शी तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करून संत्रा बागांवर योग्य उपाय योजना करण्यासंदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करून मोर्शी तालुक्यातील संत्रा गळतीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उप विभागीय कृषी अधिकारी डॉ राहुल सातपुते, वरिष्ठ किटकशास्त्र डॉ अनिल ठाकरे , डॉ प्रफुल महल्ले, मंडळ कृषी अधिकारी पांडुरंग मस्के, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, संत्रा उत्पादक शेतकरी विजय विघे, अतुल काकडे, मंगेश होले, रुपेश जयस्वाल, कृषी सहाय्यक किशोर राऊत, मनीष काळे, यांच्यासह मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.