साहित्यात जीवनाचे गंभीर तत्त्वज्ञान! [मिर्झा गालिब पुण्यस्मरण विशेष.]

53

 

_मिर्झा अब्दुल्ला खान ‘गालिब’ हे एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज पढणारे, रोजा ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. मिर्झा गालिबजी हे थोरल्या बाजीरावांची पत्‍नी मस्तानी हिच्या वंशात जन्माला आले होते. त्यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. त्यांची ज्ञानवर्धक माहिती ‘बापू’- श्रीकृष्णदास निरंकारीजींच्या शब्दांत… संपादक._

जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिबजींनी त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८ हजारच्या वर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच हजार-बाराशे शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले. त्यांनी कधी कोणताही उद्योग-धंदा केला नाही. मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या सहकार्याने ते राहत. त्यांना स्वतःला प्रसिद्धी मिळविण्याची गरज वाटली नाही. उत्तर मोगल काळातील राजांच्या, उमरावांच्या दरबारी जाणेही त्यांना आवडत नसे. ते म्हणाले होते, “माझ्या कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहतील.” ते तंतोतंत सत्यात उतरले आहे. त्यांच्याच शब्दांत-
“हैं और भी दुनियामें सुखन-वर बहुत अच्छे;
कहते हैं कि गालिब का अंदाज-ए-बयाँ और।”
मिर्झा गालिब हे एक प्रख्यात उर्दू कवी होते. त्यांचे पूर्णनाव मिर्झा अब्दुल्ला खान व टोपणनाव ‘गालिब’ असे होते. गालिबजींचा जन्म आग्रा येथे दि.२७ डिसेंबर १७९७ रोजी झाला. त्यांचे वडील मिर्झा अब्दुल्ला बेग खान हे लष्करात अधिकारी होते. ते गालिब पाच वर्षांचे असतानाच एका लढाईत मारले गेले. त्यानंतर त्यांचा सांभाळ आग्र्यास त्याच्या आजोबांनी केला. तेथे ते ऐषो-आरामात वाढले. तत्कालीन पद्धतीनुसार त्यांचे अरबी व फारसीचे शिक्षण झाले. ते मुळातच बुद्धिमान आणि प्रतिभासंपन्न होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा उमराव बेगमशी विवाह झाला आणि सतराव्या वर्षी ते दिल्लीत स्थायिक झाले. सन १८२८च्या सुमारास ते वर्षासनाच्या खटल्यानिमित्त कलकत्त्यास गेले. तेथे ते सुमारे दोन वर्षे होते, तथापि या खटल्याचा निकाल त्यांच्या विरुद्ध गेल्याने ते दिल्लीस परतले. या खटल्यात त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे त्यांना फार मनस्ताप झाला. कर्जही बरेच झाले, मात्र त्यांनी वर्षासनास आपले प्रयत्न मोठ्या चिकाटीने चालूच ठेवले. त्यांचे बहुतांश आयुष्य दिल्लीतच व्यतीत झाले. मिळणारे तुटपुंजे वर्षासन तसेच अयोध्येच्या नबाबाकडून आणि दिल्ली दरबारातून मिळणाऱ्या थोड्याफार वेतनावरच राहावे लागले. अतिशय तंगीत ते आपला निर्वाह करू लागले. उत्पन्नाच्या मानाने त्यांचा खर्च बराच होता. त्यातल्या त्यात त्यांना दारूचेही व्यसन होते. त्यामुळे ते अतिशय कर्जबाजारी बनले. त्यांना जुगाराचाही नाद असल्याने तुरुंगातही जावे लागले होते. या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाल्याचे त्यांच्या काव्यातून आणि पत्रव्यवहारातून दिसून येते. त्यांना सात मुले झाली, पण ती अल्पवयात वारली. त्यांचे कौटुंबिक जीवनही फारसे सुखी नसावे, असे दिसते. सन १८५७च्या उठावाच्या वेळी ते दिल्लीतच होते. दस्तंबू या रोजनिशीवजा फारसी गद्यग्रंथात त्यांनी या उठावाची हकिगत लिहून ठेवली आहे. दि.११ मे १८५७ ते ३१ जुलै १८५८ पर्यंतच्या घटना या रोजनिशीत आल्या आहेत. त्यात त्यांनी केवळ आपद्‌धर्म म्हणून इंग्रजांची स्तुती आणि उठाव करणाऱ्यांची निंदा केली आहे. तथापि त्यांनी आपल्या मित्रांना लिहिलेल्या पत्रांतील त्यांची मते याहून सर्वस्वी वेगळी व विरोधीही आहेत. एक शेर-
“दिल-ए-नादाँ तुझे हुँआ क्या?
आखि़र इस दर्द की दवा क्या है?
नुक्ताचीं है ग़म-ए-दिल उस को सुनाये न बने!”
त्यांच्या समग्र फारसी कवितांचा कुल्लियात-इ-गालिब हा संग्रह प्रसिद्ध असून त्यात कसीदा, गझल, मस्नवी आदी प्रकारांतील रचनांचा समावेश आहे. त्यांच्या उर्दू रचनेचा दीवान-इ-गालिब हा संग्रह इतका गाजला, की त्यांच्या हयातीतच त्याच्या चार आवृत्त्या निघाल्या. फारसी धर्तीच्या रचनेमुळे यातील त्यांची काही रचना दुर्बोध झाली आहे, तथापि जी सोपी आहे ती अतिशय कलात्मक व प्रसन्न आहे. आपला आशय ते सखोल अनुभूतीतून व अभिनव पद्धतीने व्यक्त करतात. या दोन काव्य संग्रहांव्यतिरिक्त त्यांचे काही फारसी व उर्दू गद्यग्रंथही आहेत. फारसी गद्यग्रंथांत मिहर-इ-नीमरोज हा तैमूर वंशाचा हुमायूनपर्यंतचा इतिहास, पहिला खंड, कुल्लियात-इ-नस्र हा गद्यलेखांचा संग्रह, दस्तंबू हा १८५७च्या उठावाची हकीगत, पंज-गंज-इ-आहंग हा फारसी व्याकरण व शैलीवरील प्रबंध, कातिअ-इ-बुर्हान हा बुर्हान-इ-कातिअ या फारसी शब्दकोशावरील टीका यांचा समावेश होतो. त्यांच्या उर्दू गद्यग्रंथांत ऊद-इ-हिंदी आणि उर्दू-इ-मुंअल्ला या दोन पत्रसंग्रहांचा अंतर्भाव आहे. त्यांच्या या सर्वच फारसी-उर्दू ग्रंथांच्या अनेकांनी पुढे विविध आवृत्त्या प्रकाशित केल्या.
“काबां किस नूर से जाओगे गालिब?
शर्म तुमको मगर नहीं आती!”
गालिबजींनी आपल्या मित्रांना व अनुयायांना वेळोवेळी लिहिलेली उर्दू पत्रे वाङ्‌मयीनदृष्ट्या श्रेष्ठ असून त्यांची भाषाशैली वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळेच ते आधुनिक उर्दू गद्याचे प्रवर्तक मानले जातात. त्यांच्या या पत्रांतून तत्कालीन मुस्लिम समाजाच्या विविधांगावर तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरही चांगला प्रकाश पडतो. त्यांच्या या पत्रांची गणना उर्दूतील अभिजात साहित्यात केली जाते. फारसी व उर्दू यांच्या संश्लेषणातून गालिबजींनी आपली उर्दू कविता लिहिली. सखोल अनुभूती व तात्त्विक चिंतन यांचा कलात्मक आविष्कार त्यांच्या काव्यात आढळतो. धार्मिक व सांप्रदायिक भेदभावांना त्यांच्या विचारात स्थान नाही. त्यांच्या मते केवळ एकाच परमेश्वराची शुद्ध उपासना करणाऱ्याच्या ठिकाणी धार्मिक भेदभावाच्या भावनेचा लोप होतो. प्रत्येक धर्मी व उपासकास तो एकच परमेश्वर नेतो. अपार सहानुभूती व मानवतेचे असीम प्रेम यांचे ते उपासक होते. त्यांचा मित्रपरिवार व अनुयायीवर्ग फार मोठा होता व त्यांत विविध धर्मांचे लोक होते. त्यांचे काव्य कळावयास कठीण असले, तरी त्यात एकदम हृदयाला जाऊन भिडण्याचे सामर्थ्य आहे. तुर्की परंपरेस अनुसरून त्यांच्या ठिकाणी पावित्र्याची चाड, पराकाष्ठेचा अभिमान, गुढवाद, ऐहिक जीवनातील सुखदुःखे, परंपरागत सामाजिक रूढी, उदारमतवाद तसेच नैराश्य व आशावाद यांचे चमत्कारिक मिश्रण झालेले दिसून येते. गालिबजींची फारसी गद्य-पद्य रचना उत्कृष्ट असूनही आजवर ती उपेक्षितच राहिली आहे. समीक्षाकांचे तिच्याकडे म्हणावे तसे लक्ष वेधले नाही आणि त्यामुळेच तिचे यथायोग्य मूल्यमापनही होऊ शकले नाही. बघा-
“ये नथी हमारी किस्मत कि विसाल-ए-यार होता;
हजारो ख्वाईशें ऐसी के हर ख्वाईश पे दम निकलें।”
वयाच्या अकराव्या-बाराव्या वर्षापासूनच ते कविता रचू लागले आणि पंचविसाव्या वर्षापासून त्यांनी उर्दूत काव्यरचना केली. त्यांच्या सुरुवातीच्या रचनेवर फारसी कवी बेदिल यांचा प्रभाव होता. बेदिलचे ऋण त्यांनी आपल्या काव्यात मोकळ्या मनाने मांडले आहे. नंतरच्या त्यांच्या रचनेवर मात्र कोणाही कवींचा प्रभाव नसून ती संपूर्णपणे स्वतंत्र आहे. वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षापर्यंत मात्र त्यांनी उर्दूऐवजी फारसीत रचना केली. त्यांचे फारसीवर विशेष प्रेम होते. आपली उत्कृष्ट रचना उर्दूऐवजी फारसीतच आहे, असे ते म्हणत. परंतु त्यांची विशेष ख्याती मात्र उर्दू काव्यामुळेच झाली. सन १८५०पासून पुढे बहादूरशाह जफर या मोगल बादशहाच्या सांगण्यावरून ते परत उर्दूत रचना करू लागले. या काळातील त्यांची उर्दू रचना दर्जेदार व परिपक्व आहे. त्यांना दिल्ली दरबारातून ‘नज्मुद्दौला दबीरुल्‌मुल्क निजामगंज’ हा मानाचा किताब मिळाला होता. हाली, रख्शाँ, जकी, मजरुह, मुन्शी हरगोपाल तुफ्ता, मुन्शी बिहारीलाल मुश्ताक आदी त्यांचे प्रमुख अनुयायी होते. हाली हा त्यांचा आद्य चरित्रकार व अनुयायी होता. त्याने सन १८९७ साली उर्दूत यादगार-इ-गालिब हे गालिबजींचे आठवणीवजा चरित्र लिहिले, ते विशेष प्रसिद्ध आहे. मिर्झा गालिबजी यांचे दिल्ली येथे दि.१५ फेब्रुवारी १८६९ रोजी निधन झाले. तेथे त्यांची कबर आहे.
!! स्मृतिदिनी त्यांना व त्यांच्या शेरोशायरींच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन !!

– संत चरणधूळ –
‘बापू’- श्रीकृष्णदास निरंकारी.
द्वारा- वंद. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक,
मु. रामनगर, गडचिरोली, जि. गडचिरोली.
फक्त व्हाॅ. नं. ९४२३७१४८८३.