संघटन कौशल्याच्या बळावर केंद्रात पुन्हा ‘भाजप’च येणार- हेमंत पाटील

31

🔸विरोधकांच्या कुठल्याही चेहऱ्याचा ‘मोदी लाटेवर’प्रभाव पडणार नाही

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.9सप्टेंबर):-चांगली कामे, संघटन कौशल्य आणि प्रभावी नेतृत्वाच्या बळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा केंद्रातील सत्तेवर आरूढ होवून भाजप नवा इतिहास घडवेल, असा विश्वास इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केला. देशभरातील जवळपास सर्वच बूथवर पक्ष विचारधारेने प्रभावित झालेले आणि स्वतःला पक्ष कार्यात झोकून देणारे सक्रिय कार्यकर्ते आहेत. ‘पन्ना प्रमुखां’पासूनची व्यवस्था भाजपने कार्यान्वित केली आहे. प्रत्येक मतदार संघातील पकड, लोकांची होणारी कामे आणि सर्वसामान्यांना विनाविलंब मिळणारा न्याय ही भाजपची जमेची बाजू आहे.कुठल्याही योजनेचा निधी आता तळागाळातील लोकांपर्यंत पोहचतो.

थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात निधी जमा होत असल्याने भष्ट्राचाराला आळा बसला आहे. सर्व चांगले काम सुरू असतांना विरोधकांनी कितीही वल्गना केल्या, कितीही व्युहरचना आखल्या तरी त्याचा काही एक फायदा होणार नसल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. बिहारमध्ये भाजपची साथ सोडून विरोधकांच्या गोटात सामिल झालेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतीची दिल्ली वारी करीत विरोधी पक्षाच्या नेत्यांशी भेटीगाठी केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न नितीश कुमार करीत आहेत. त्यांनी शरद पवार, सीताराम येचूरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेत विरोधी एकतेची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला. पंरतु, त्यांचे हे प्रयत्न पुढील १० वर्षांसाठी फळाला येणार नसल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाचा प्रभावही पडणार नसल्याचे ते म्हणाले.

२०२४ मध्ये आणि पुढील सर्वात्रिक निवडणूकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘जादुई करिष्मा’ कायम राहील, असा दावा त्यांनी केला आहे. काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू केलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेचा देखील प्रभाव पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसने अगोदर आपले घर सांभाळण्याची गरज आता निर्माण झाली आहे.एक-एक करून सर्वच काँग्रेस नेते पक्षाला रामराम करीत असल्याने काँग्रेसला आत्मचिंतनाची आवश्यकता आहे. सध्याच्या स्थितीत मोदींच्या प्रतिमेला साजेसे असे एकही देशव्यापी नेतृत्व नाही. त्यामुळे देशाच्या विकासात विरोधकांनी केवळ ‘विरोधाला विरोध’ करण्याऐवजी चांगल्या धोरणांचे स्वागत केले पाहिजे, असे पाटील म्हणाले.