नाशिक ओझर विमानतळावरून विमानसेवेचा शुभारंभ

31

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नाशिक(दि.21नोव्हेंबर):-येथून शनिवार पासून सुरु झालेल्या बंगरूळ व हैदराबाद विमान सेवेमुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे. तसेच देशातील महत्त्वाची शहरे या विमानसेवेमुळे जोडली जाणार असल्याने उद्योग व पर्यटनाच्या वाढीसाठी बंगरुळ व हैदराबाद सुरू झालेली विमानसेवा खूप उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

ओझर विमानतळावरून आजपासून सुरू झालेल्या स्पाईस जेट विमानसेवेच्या उदघाटन प्रसंगी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, प्रांताधिकारी संदीप आहेर, मिग कॉम्प्लेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीएच. वी. शेषगिरी राव, एचएएलचे जनरल मॅनेजर दीपक सिंगल, साकेत चतुर्वेदी आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, आजपासून विमानसेवेच्या माध्यमातून बंगरूळ व हैदराबाद ही शहरे नाशिक जिल्ह्याला जोडली गेली आहेत, या गोष्टीचा आनंद होत आहे. याचप्रमाणे यापुढेही दिल्ली, अहमदाबाद तसेच इतरही प्रमुख शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा नाशिक येथून सुरू होणार आहेत. उद्योजकांना त्यांच्या उद्योगांच्या वाढीसाठी वाहतुकीच्या सोयी सुविधा असणे आवश्यक असते. याअनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील उद्योजक दुसऱ्या राज्यात जाऊन परराज्यातील तसेच परदेशातील उद्योजकांना देखील आपल्या जिल्ह्यात त्यांचे उद्योग व्यवसाय वाढून रोजगार निर्मीती होण्यास देखील मदत होणार आहे.

विमानसेवांमुळे जिल्ह्यातील उद्योग व पर्यटन व्यवसाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले जाऊन त्यांची वाढ होण्यासाठी चालना मिळणार आहे. मुंबईला जाण्यासाठी चौपदरी रस्ता व उड्डाणपुल असल्याने नाशिकहून मुंबईला काही तासातच पोहचता येत असल्याने नाशिक मुंबई प्रवास करणारे प्रवासी याठीकाणी कमी आहेत. आजपासून सुरू झालेली ही विमानसेवा सातत्याने सुरू राहणे आवश्यक आहे, असे मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

पुढे बोलतांना मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, नाशिक येथे उद्योग, शिक्षण, पर्यटनासाठी लोकांना विमानसेवेमुळे येणे सहज शक्य होणार आहे. याचसोबत नाशिक येथील शेती उत्पादनाला देखील देश विदेशपातळीवर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या विमानतळाचा लाभ सर्वांना होणार असल्याने येत्या काही वर्षातच इतर विमानतळांप्रमाणेच नाशिकहून देशात व परदेशात जाण्यासाठी विमानसेवा सुरू होतील. आणि या विमान सेवांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होणार आहे, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

दिवाळीचा सण व थंडीचे हवामान या वातावरणाचा विपरीत परिणाम म्हणून कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असून काही ठिकाणी रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी याकाळात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या अनुषंगानेच कोरोनाचा वाढणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्याचा विपरीत परिणाम या विमान सेवांवर होणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

आपल्या जिल्ह्यातून विमानसेवा सुरू होण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. नाशिकमधून सुरू झालेल्या सर्व विमानसेवांचा समावेश उडाण योजनेअंतर्ग करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असाही विश्वास मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.