✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)
मुंबई(दि.19जानेवारी):- नांदेड जिल्ह्यातील बिलोली च्या साठेनगर मधील मातंग समाजाच्या दिव्यांग मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.त्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून सहा महिन्यात आरोपींना फाशी द्यावी या साठी राज्याच्या गृहामंत्र्यांना पत्र पाठविणार असल्याचे सांगत बळीत मुलीच्या कुटुंबियांना रिपब्लिकन पक्षातर्फे 50 हजाराची सांत्वनपर मदत रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी दिली.
ना. रामदास आठवले यांनी आज बिलोली येथील साठे नगरात बळीत मुलीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन रिपाइं तर्फे आर्थिक मदत केली.या परिवाराला ऍट्रोसिटी कायद्यानुसार सरकारतर्फे 8 लाख रुपयांची मदत मिळणार असून त्याचा पहिला हफ्ता 4 लाख रुपये शासनातर्फे नुकतेच या परिवाराला देण्यात आले आहेत. यावेळी रिपाइं चे आमदार राजेश पवार; रिपाइं उपाध्यक्ष विजय सोनवणे; मिलिंद शिरढोणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पीडित बळीत दिव्यांग मुलीच्या कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घर मिळवुन देण्याचे आश्वासन ना रामदास आठवले यांनी यावेळी दिले. या प्रकरणात सुरुवातीला पकडलेला आरोपी हा गैर समाजातून दलित समाजाचा पकडला होता.मात्र आता खऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली.
मातंग समाजाच्या दिव्यांग मुलीची बलात्कार करून हत्या करण्याचा गुन्हा हा मानवतेला काळिमा फासणारा आहे. नितीमत्तेला हादरा देणारी ही माणुसकीला कलंक फासणारी घटना असल्याचे सांगत या गुन्ह्यातील गुन्हेगारांना फाशीची कठोर शिक्षाच झाली पाहिजे असे मत ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले.