प्रजासत्ताक दिन चिरायू झाला पाहिजे ?

85

भारत देश २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. आज भारतीय नागरिक प्रजेची सत्ता आहे हे गर्वाने सांगु शकेल काय?. राजे महाराजे,भांडवलदार,सावकार यांचे संस्थान संपून जनतेने जनते मधून जनप्रतिनिधी निवडून जनतेच्या भल्यासाठी काम करणारी यंत्रणा म्हणजे प्रजासत्ता अशी घटनाकारांनी सांगितले होते.जनतेला खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करणार नाही अशी यंत्रणा म्हणजे लोकशाहीचे चार खांब न्यायपालिका Judiciary, कार्यपालिक कार्यकारी मंडळ Executive, लोकसभा, विधानसभा Legislature आणि प्रसार माध्यमे Media, हया आज तरी पूर्णपणे कोसळलेल्या दिसतात.

प्रधानसेवक म्हणून घेणाऱ्या आदरणीय नरेंद्र मोदी यांनी आज पर्यत एकही जाहीर पत्रकार परिषद घेतली नाही. सहा वर्षांपूर्वी चा इतिहास पहा प्रधानमंत्री देशातील मान्यताप्राप्त वृत्तपत्रांच्या संपादकां सोबत पत्रकार परिषद घेऊन आज पर्यत काय काय केले आणि कोणत्या योजना राबविणार यांची जाहीरपणे माहिती देतो कारण तो प्रजेतुन निवडून दिलेला लोकप्रतिनिधी असतो. जे सत्य परिस्थिती आहे ते वेळोवेळी प्रजेला सांगण्याचे त्यांचे कर्तव्ये असते. गेल्या सहा वर्षांत भारतीय नागरिकाने नव्हे तर जगातील नागरिकानी या जाहीर पत्रकार परिषदेचा अनुभव घेतला असेलच. कारण तमाम भारतीयांना अच्छे दिन आने वाले है.हे सांगण्यासाठी अख्खी चॅनल, पिंट मिडियाने जीवाचे रान करून सांगितले होते.अनेक गंभीर प्रश्न चुटकी सारखे सोडवू फक्त आमच्या हाती सत्ता द्या.आणि आयुष्य भर विचार करीत राहाल. हे आपण वाचलं आणि ऐकले असेलच कारण हा आपला भारत देश प्रजासत्ताक आहे.

प्रजेने निवडून दिलेले लोक म्हणजे लोकांनी लोकांच्या कामासाठी लोकामधून निवडून दिलेले लोक म्हणजे चाय वाले,दूधवाले,पूजा अर्चा करणारे लोक समाजसेवक, देशसेवक,प्रधानसेवक,यांचे विचार आणि आचरण आपण गेल्या सहा वर्षांत शंभर टक्के पाहिले आहे. त्यांचे चिंतन सर्व भारतवाशीयानी केले पाहिजे.तरच तो दिवस म्हणजे २६ जानेवारी १९५० प्रजासत्ताक दिन चिरायू झाला पाहिजे असे म्हणता येईल. आता राज्य आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांची शासन करण्याची पद्धत पहिली तर खरच प्रजासत्ताक चिरायु झाला.असे गर्वाने सांगता येईल काय ?.
२६ जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे.तो राष्ट्रीय सण आहे.त्याबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान असला पाहिजे.म्हणूनच भारतातील प्रत्येक वाडी-वस्ती, गाव, विभाग, मोहल्ला, तालुका, जिल्हा, शहर,राज्य, आणि राष्ट्रात सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते. २६ जानेवारी १९५० रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला.म्हणजे काय झाले?. तर त्या दिवसापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या व देशाला अर्पण केलेल्या संविधाना नुसार देशाचा राज्य कारभार सुरु झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अहोरात्र बौद्धिक मेहनत करून घटना लिहली. त्यासाठी २,९६,७२९ रुपये एकूण खर्च आला दररोजचा जमा खर्च त्यांनी लिहून ठेवला.

भारतीय संविधान २५ नोव्हेंबर १९४९ सादर करण्यात आले.आणि त्या संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरु झाली. त्यालाच प्रजासत्ताक दिन म्हणतात. हा दिन कोणामुळे सुरु झाला?. भारतीय संविधानामुळे. भारतीय संविधान कोणामुळे निर्माण झाले?. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे. मग ज्यांनी संविधान लिहिले त्यांचे स्मरण प्रजासत्ताक दिनी या देशाला झालेच पाहिजे की नाही?. त्यांना संपूर्ण देशाने वंदन आणि अभिवादन केलेच पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. प्रजासत्ताक दिनी जो संविधानाला मान, तोच मान संविधान निर्मात्याला, जन्मदात्याला, घटनेच्या शिल्पकाराला दिलाच पाहिजे. म्हणून भारतातील प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक राजकीय पक्षांनी व नेत्यांनी, प्रत्येक संस्था-संघटनांनी, शाळा-कॉलेजानी आणी मंडळांनी संविधानाच्या शिल्पकाराला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदराने आणि अभिमानाने अभिवादन केलेच पाहिजे. जेथे जेथे राष्ट्राध्वजारोहण करून प्रजासत्ताकदिन साजरा केला जातो तेथे तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन करूनच प्रजासत्ताक दिन साजरा करा,डॉ. बाबासाहेबांबद्दल शासनाला नेहमीच उशिराच जाग येते. म्हणून आपण जागे राहूया आणि शासनाला जागे करूया.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचे संविधान लिहून पूर्ण केले व देशाला अर्पण केले. ज्या दिवशी संविधान देशाला अर्पण करण्यात आले तो २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ आणि ज्या दिवसापसुन संविधांची अंमलबजावणी सुरु झाली तो २६ जानेवारी हा ‘प्रजासत्ताक दिन ‘. २००८ पासून महाराष्ट्र शासनाने जीआर काढून २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात सुरुवात केली. तेव्हापासून संपूर्ण राज्यात २६ नोव्हेंबर रोजी शासकीय स्तरावर संविधान दिन साजरा करण्यात येतो. आता शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा करावा. असा जीआर काढावा लागतो.म्हणजेच या देशात खरेच प्रजासत्ताक चिरायु झाला.असे सांगत येईल काय?.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठेपण कालभी आजभी आणि येणाऱ्या काळात भी देशातील जातीयवाद्यांना खुपते राहणार आहे. म्हणून तर ते नेहमी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अनुल्लेख टाळतात. अनेक गोष्टींचा खोटा इतिहास सांगतात. डॉ. बाबासाहेबांबद्दल त्यांना खरा इतिहास सांगता येईना.कारण डॉ. बाबासाहेबांनी खरा इतिहास लिहून ठेवला व नवीन इतिहास रचला. त्याचे जतन करण्यासाठी जनता जागृत आहे.म्हणून तर ते डॉ. बाबासाहेबांचा अनुल्लेख टाळतात किंवा ज्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठेपण, महत्व आणि कर्तत्व सिद्ध करण्याचा दिन आहे, त्याच दिवशी हे जातीयवादी कपट कारस्थानाणे नवीन सन किंवा नवीन धार्मिक प्रथा सुरु करतात. हेतु हाच की त्यादिवशी डॉ. बाबासाहेबांच्या मोठेपणाकडे किंवा कर्तुत्वाकडे लोकांचे लक्ष जाऊ नये किंवा लोकांना कळू नये.उदाहरण द्यायचे झाले तर २६ जानेवारीचे देवूया. गेल्या ८ ते ९ वर्षापासून २६ जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताकदिनी “सत्य नारायणा” च्या महापूजा घालण्यात येवू लागल्या आहेत. या पूजांचे एवडे अवडंबर माजले आहे कि, प्रत्येक गल्लीत हि पूजा होवू लागली आहे.यापूर्वी २६ जानेवारी रोजी का सत्यनारायणाची पूजा घातली जात नव्हती? आणि आताच ती का घालण्यात येते? कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्व त्यांना वाढू द्यायचे नाही किंवा कमी करायचे आहे.

सत्यनारायणाच्या पूजेचा आदेश दिला कोणी? व कुठून आला ? तर तो थेट नागपूरच्या हेडक्वार्टर हून आला. कुणाला कळाले नाही. कुठेही गाजावाजा नाही. पण अंमलबजावणी मात्र सर्वत्र होत आहे. प्रशासकीय इमारतीत प्रशासकीय अधिकारी वर्ग कामगार कर्मचारी सत्यनारायण महापुजा घालत आहेत.त्यामुळेच प्रजासत्ताक दिनी सत्यनारायण पूजेचे महत्व वाढत आहे, वाढवीत आहेत. म्हणून प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा केला पाहिजे. राष्ट्रध्वज हातात घेवून डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमांच्या मिरवणुका काढल्या पाहिजेत. जातीयवाद्यांना डॉ. बाबासाहेबांचा खोटा इतिहास सांगता येत नाही. म्हणून ते डॉ. बाबासाहेबांचे महत्व कमी करू लागले आहेत. डॉ.बाबासाहेबांनी संविधान लिहिलेच नाही असे त्यांना सांगता येत नाही. म्हणून ते आता संगु लागले आहेत कि, भारताचे संविधान हे काही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्याने लिहिले नाही. सात जणांच्य घटना समितीने लिहिले आहे. तेंव्हा आंबेडकरवाद्यांनी त्याच वेळी, तिथल्या तिथेच एका क्षणाचाही विलंब न लावता ठणकावून ठाम पणे सांगितले पाहिजे की, होय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्यानेच भारतीय संविधान लिहिले आहे. तेच संविधानाचे शिल्पकार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डी. पी. खेतान, कृष्णास्वामी अय्यर, बी. एल. मित्तल, के. एम. मुन्शी व सय्यद अहमद अब्दुल्ला हे सात विद्वान घटना मसुदा समितीचे सदस्य होते. घटना मसुदा समिती व घटना समिती या वेगवेगळ्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तर डॉ. राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. मूळ घटना समिती १९४६ साली (स्वतंत्र्यपूर्व) स्थापन करण्यात आली. त्यात एकूण ३८९ सदस्य होते तर स्वतंत्र्यानंतर १९४७ साली (स्वतंत्र्योत्तर) फाळणीनंतर स्थापन करण्यात आलेल्या घटना समितीत २९९ सदस्य होते. असे असले तरी घटना बनविण्याची अत्यंत महत्वाची पण तितकीच कठीण जबाबदारी घटना मसुदा समितीवर होती. सात विद्वानांच्या घटना मसुदा समितीतील दोघेजण परदेशात गेले. अन्य दोघे सतत आजारी असल्यामुळे बैठकांना येत नव्हते. एकचे निधन झाले व एकजण स्वत:च्या कार्यात व्यस्त होता. उरले फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर.त्यांनीच एकट्याने रात्रंदिवस राबून स्वत:च्या आजाराची पर्वा न करता भारताचे संविधान लिहिले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच संविधानाचे एकमेव शिल्पकार आहेत. म्हणून आपण कुठे ही आणि केव्हा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करताना, “भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर” असाच उल्लेख केला पाहिजे. कारण डि.लिट. कोणी ही मिळवू शकतो किंवा भारतरत्न किताब कोणाला ही मिळू शकतो. मात्र संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरच.अन्य कोणालाही होता येणार नाही. म्हणून प्रजासत्ताक दिन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करूनच साजरा करावा.

सरकारी आदेश देऊन ही काही शाळा कॉलेज गजानन महाराज,गांधींचा फोटो ठेऊन झेंडा वंदन करतात.काही लोक चाळीत,सोसायटी मध्ये आज भी सत्यनारायण महापूजा घालतात.ते केवळ खोटया अहंकारा पोटी. आम्ही हिंदू आहेत आमच्या सुट्टीच्या दिवशी आमच्या सार्वजनिक महापूजा कोणी अडवू शकत नाही.असे काही तरुण खुलेआम कायदा सुव्यस्थेला आव्हान देतात. तेव्हा वाटते खरेच भारतात प्रजासत्ताक चिरायु झाला.असे म्हणता येईल काय?. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देता येतील काय?. भारताततील प्रयत्न नागरिक जागृत झालाच पाहिजे तर प्रजासत्ताक दिन चिरायू झाला होईल.तरी सुद्धा जागरूक वाचकांना माझ्या कडून माझ्या दैनिका कडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!.

धन्यवाद !
जय हिंद!.जय भारत!!. जयभिम !!!

✒️सागर रा तायडे(मो:-९९२०४०३८५९)भांडूप,मुंबई.