महाडचा सत्याग्रह, समतेच्या संगराचे प्रथम पाऊल

27

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९ व २० मार्च १९२७ रोजी दोन दिवस महाडला अस्पृश्य समाजाची परिषद घेऊन, दुसऱ्या दिवशी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः एक ओंजळभर आणि नंतर इतरांनी त्या पाण्याला स्पर्श करून थोडे थोडे पाणी प्राशन केले. त्यानंतर ते तळे सर्वांसाठी खुले झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. ती परिषद आणि सत्याग्रह त्यांच्या चळवळीच्या इतिहासातील समतेच्या संगराचे ते प्रथम पाऊल ठरले.
आजच्या समतेच्या संगर दिनानिमित्त आपणास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची त्या परिषद तथा सत्याग्रहामागील भूमिका व त्यावेळेच्या उच्च जातीतिल स्पृश्य सवर्णांची मानसिकता समजून घेण्यासाठी हा लेखन प्रपंच.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईमध्ये पाणी मिळत नव्हते असा काही प्रश्न नव्हता किंवा महाडच्या तळ्यातील पाणी अमृतासमान होते, जे प्राशन केल्याने ते अजरामर होणार होते असेही काही नव्हते. परंतु १९२७ च्या पूर्वी जवळपास दहा ते अकरा वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सभा समारंभ तथा वृत्तपत्राच्या माध्यमातून क्रांतीच्या दिशेने अस्पृश्यांच्या मनमस्तिषकाची सतत मशागत केली होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्वत्वाची जाणीव व्हायला लागली होती. स्पृश्य लोकांप्रमाणे आपणही नैसर्गिक हक्क अधिकारांचे अधिकारी आहोत अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे सवर्णांच्या मानसिकतेची चाचपणी करणे आवश्यक होते. ते अस्पृश्यांना मानव समजतात किंवा नाही? त्यांचे नैसर्गिक हक्क अधिकार त्यांना मान्य आहेत किंवा नाही? समतेचे बीजारोपण त्यांच्या रक्तमांसी झाले किंवा नाही? हे समजून घेण्यासाठी समतेच्या संगराचे ते प्रथम पाऊल होते.

४ ऑगस्ट १९२३ रोजी रावबहादूर सी. के. बोले यांनी मुंबई प्रांतिक विधिमंडळामध्ये एक ठराव पास करून घेतला होता. त्या ठरावान्वये सार्वजनिक शाळा,पाणवठे, धर्मशाळा, न्यायालये ही अस्पृश्यांना खुली झाली होती. परंतु त्या ठरावा मध्ये एक त्रुटी होती, ती म्हणजे स्थानिक प्राधिकरण, नगरपालिका, नगरपंचायत, नगर मंडळे यांनी त्यांच्या अखत्यारीतील सार्वजनिक स्थळे खुली करण्यासाठी स्वतंत्र ठराव पास करावे
अस्पृश्य समाजातील बरेच लोक भागवतधर्मी (वारकरी) असल्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेशासाठी सत्याग्रह करून क्रांतीचा झेंडा प्रथम तेथे उभारावा असा विचार काही काळ समोर आला होता. परंतु कायदेशीर बाबी तपासल्या असता तेथील अनेक गोष्टी बोले ठरावाला अनुकूल नसल्याचे लक्षात आले. तेव्हा महाड नगरपरिषदेने सुरभानाना टिपणीस यांच्या अध्यक्षतेखाली ठराव घेऊन तेथील तळे सार्वजनिक करून अस्पृश्यांसाठी खुले केले होते.

परंतु एवढी पाण्याची चणचण असूनही त्या तळ्यावर अस्पृश्यांनी पाणी भरण्याचा शिरस्ता पडला नव्हता. यासोबतच आणखीही काही ऐतिहासिक कारणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय गुलामगिरीविरुद्ध बंड उभारण्यासाठी महाडची निवड केली होती.महाडचा समता संगर हा १९ व २० मार्च असा दोन दिवस कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या नेतृत्वात पार पडला. पहिल्या दिवशी तीन हजारांपेक्षा जास्त उपस्थित असलेल्या लोकांसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ऐतिहासिक भाषण झाले. जे आजही समाजाला दिशादर्शक आहे. त्यांनी आपल्या भाषणामध्ये विविध विषयाला हात घालत म्हटले की, ‘आपल्या आजच्या दु:स्थितीला इतरांप्रमाणे इंग्रजीही जबाबदार आहेत. आमच्यामुळेच म्हणजे त्यांनी एत्तदेशियांचे सैन्य उभारले म्हणून त्यांना सत्ता स्थापन करता आली. परंतु नंतर त्यांनी आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.’ यावरून हेच लक्षात येते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रज सरकारची कधीच भीड बाळगली नाही.

त्यानंतर ते पुढे म्हणाले की, ‘ परंपरागत कामे त्यांनी सोडून दिली पाहिजे. आपल्या उपजीविकेसाठी नोकरी करावी अथवा शेती करावी. कोणाच्याही शिळ्या अथवा उष्ट्या तुकड्यावर जगू नये. प्रत्येकांनी मुला मुलीच्या शिक्षणाची काळजी घ्यावी. कुणाचीही गुलामी करू नये, त्यासाठी जागृतीचा अग्नी सतत प्रज्वलित ठेवावा, यासाठी पेन्शनर लोकांनी चळवळीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणानंतर परिषदेमध्ये ३३ ठराव पास करण्यात आलेले सर्व ठराव अस्पृश्यांच्या सर्वांगीण उत्थानासाठी होते. तसेच ते इंग्रज सरकार आणि स्पृश्य लोकांसाठी सूचक होते. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी काही ठरावांवर चर्चा व भाषणे झाली. त्यानंतर अनंत विनायक चित्रे यांच्या सूचनेप्रमाणे सर्वजण शिस्तीत तळ्यावर जाऊन तेथील पाणी सर्वांनी प्राशन केले. त्यानंतर सर्वजण आपल्या मूळ ठिकाणी परतले. काही लोक जेवण करत होते, काही आपापल्या गावाकडे परत निघाले होते तर काही महाड गावामध्ये फेरफटका मारत असताना काही समाजघातकी स्पृश्यलोकांनी गावामध्ये गुरुवामार्फत खोटी दवंडी पिटवून सांगितले की, अस्पृश्य लोक आता विरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिर सुद्धा बाटवणार आहेत.

त्यामुळे गावातील जातग्रस्त उच्च जातीचे लोक खवळले. त्यांनी अस्पृश्यांवर अचानक हल्ला चढवला. त्यांच्याकरवी पिण्याचे पाणी रिचवून जेवणात माती कालवण्यात आली. अनेकांना बेदम चोप देण्यात आला. वीस लोक मरणासन्न अवस्थेला पोहोचले. साठ-सत्तर लोकांना जबर जखमी केले गेले. त्यामध्ये तीन चार बायका एका बालकाचा सुद्धा समावेश होता. एवढे होऊनही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकांना धीर देऊन संयम बाळगण्यास सांगितले.दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. २१ मार्च १९२७ रोजी महाडातील उच्चजातीय कर्मठ स्पृश्य लोकांनी अफलातून प्रयोग केला. त्यांनी तळ्यातील १०८ घागरी पाणी बाहेर काढून त्यामध्ये वेदमंत्रोच्चाराच्या सहाय्याने पंचगव्य(गायीचे शेण, मूत्र, दूध, दही, तूप) मिसळूले. तेच पाणी पुन्हा तळ्यात टाकून त्याचे शुद्धीकरण झाल्याचे जाहीर केले.अशा कोत्या आणि मनुवादी, विषमतावादी, सडक्या मानसिकतेचे लोक आजही समाजामध्ये पाहायला मिळतात. आजही खेडोपाडी कामगार, मजूर महिला-पुरुषांच्या कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची वेगवेगळी व्यवस्था असते.

काहींच्या मानसिकतेला जडलेला अस्पृश्यतेचा उच्चनीचतेचा जातीयवादी रोग अजूनही बरा होण्याचे नाव घेत नाही. ते माणसाला माणूस समजायला तयार नाहीत. त्यांच्या लेखी माणसापेक्षा जनावरांची किंमत तथा महत्त्व जास्त आहे. म्हणूनच तर मागील आठवड्यात उत्तर प्रदेशामध्ये एका दहा बारा वर्षाच्या मुस्लिम मुलाला मंदिरात पाणी पिण्यासाठी गेला म्हणून जबर मारहाण केली गेली. अशा लोकांना फ्रान्सच्या राष्ट्रीय सभेच जाहीरनामा वाचणे आवश्यक आहे. ज्यामुळे त्या देशातील लोक क्रांतीसाठी तयार होऊन स्वतंत्र झाले. ते म्हणतात,’ सर्व माणसे जन्मता समान दर्जाची असतात व ती मरेपर्यंत समान दर्जाची असतात.’

✒️लेखक:-भिमराव परघरमोल(व्याख्याता तथा अभ्यासक
फुले शाहू आंबेडकरी विचारधारा)तेल्हारा जि. अकोला
मो.९६०४०५६१०४