प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे व्याख्यानांमध्ये माणसाचे मन परिवर्तीत करण्याचे सामर्थ्य होते – प्राचार्य डॉ.हरिदास विधाते

25

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.17जुलै):-थोर विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले सर हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते.त्यावेळी मी विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होतो.अनेक वेळा त्यांची व्याख्याने ऐकली व वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केली होती.भोसले सरांची व्याख्याने म्हणजे परिपुर्ण ज्ञानाचे पक्वान्न होय.माणसाचे मन परिवर्तीत करण्याचे सामर्थ्य त्यांच्या भाषेत होते असे प्रतिपादन कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते यांनी अध्यक्षीय भाषणातुन केले.

आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयात गुरूवार दि. १५ जुलै रोजी कोविड १९ नियमांचे पालन करून प्राचार्य शिवाजीराव भोसले जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.हरिदास विधाते होते.प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे सहवास लाभलेले रायमोह येथील ज्येष्ठ पत्रकार गोवर्धन जाधव व इंग्रजी विभागप्रमुख प्रा.डॉ.सज्जन गायकवाड हे होते.प्राचार्य डाॕ.विधाते म्हणाले की,प्राचार्य भोसले सर यांच्या ओघवत्या भाषेत सहज सामान्य श्रोत्यांचे मन-मत परिवर्तन करण्याचे सामर्थ्य त्यामध्ये होते.प्राचार्य भोसले यांचेकडे ज्ञानभांडार होते.कोणत्याही विषयावर ते सहज साध्या भाषेत बोलत.संपूर्ण महाराष्ट्राभर व्याख्याने देऊन त्यांनी ज्ञानयज्ञ उभा केला होता.

बॅरिस्टर बाबासाहेब भोसले त्यांचे बंधू राज्याचे मुख्यमंत्री असतांना कधी त्यांच्या सत्तेचा व पदाचा दुरुपयोग केला नाही.लोक प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची ओळख करून देतांना म्हणत,मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचे बंधू पण स्वतः ची ओळख करून देतांना ते सांगायचे बाबासाहेब भोसले माझे बंधू आहेत अशा अनेक प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या पैलूंवर प्राचार्य विधाते यांनी प्रकाश टाकला.प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार गोवर्धन जाधव म्हणाले की,प्राचार्य शिवाजीराव भोसले सर यांच्या बरोबर काही दिवस रहाण्याचे भाग्य मला मिळायचे.त्यांच्या सोबत अनेक विषयांवर चर्चा केली.भोसले सर नेहमी म्हणत शाळा महाविद्यालयाच्या इमारती उंच असून चालत नाहीत तर त्यामधून शिक्षण घेणारे विद्यार्थी उच्चपदस्थ झाले पाहिजे,चांगले माणसे घडविणारे ज्ञानमंदिरे उभा राहिली पाहिजेत.प्राचार्य भोसले हे व्रतस्थ होते.स्वामी वैखरीचा ही त्यांना दिलेली बिरुदावली सार्थ होती.महाराष्ट्रात अनेक माणसे घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

मी अनेक वेळा अनेक विषयांवर त्यांची व्याख्याने ऐकली,प्रत्येक वेळी नवनवीन विचार ऐकायला मिळाली.शब्द पंढरीचे प्राचार्य भोसले वारकरी होते तर दुसरे वक्ते प्रा.डॉ.गायकवाड म्हणाले की,प्राचार्य भोसले सर यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे ग्रंथ म्हणजे माणसांना अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणारे आहेत.फलटण येथील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रिय प्राचार्य म्हणून त्यांचा नावलौकिक होता.सतत कार्यमग्न रहात होते.त्यांचे वाचन खुप मोठे होते.त्यांची व्याख्याने माणसाला उद़्बोधन करणारी होती.प्राचार्य भोसले यांचे जीवन म्हणजे चालते बोलते विद्यापीठ होते.याप्रसंगी प्रस्तावित व्यक्त करतांना प्रा.डॉ.बापू खैरे यांनी प्राचार्य भोसले जीवनपट व महाराष्ट्रातील वक्तांची परंपरा विषद केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.जी.पी.बोडखे यांनी तर प्रविण आटोळे यांनी आभार मानले.