केंद्र सरकारने वन हक्क कायद्यातील तीन पिढ्यांची अट रद्द करावी – विदर्भ राज्य आंदोलन समिती ची मागणी

30

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जीवती(दि.19जुलै):- आदिम जमाती व पारंपारिक वन निवासी यांना वन जमिनीचे पट्टे देण्यासाठी सन 2006 मध्ये पारित झालेल्या वन हक्क कायद्यातील व्याख्येत जोडण्यात आलेली ‘ तीन पिढी वनात राहणारा ‘ अशी अट केंद्र सरकारने तात्काळ रद्द करावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या जिवती येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अँड. वामनराव चटप होते. यावेळी 9 ऑगस्ट ला नागपूर येथे होणार्‍या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

केंद्र सरकारने 2006 साली वन हक्क कायदा पारित करून वनात राहणारे आदिम जमाती व पारंपारिक वननिवासी यांना वन जमिनीचे मालक करून कायमस्वरूपी पट्टे देण्याचा निर्णय या कायद्यामुळे जाहीर केला. परंतु इतर पारंपारिक वननिवासी ( गैर आदिवासी ) यांची व्याख्या करताना तीन पिढ्या जंगलात राहणारा अशी केली असून त्यात जोडलेल्या स्पष्टीकरणात पंचवीस वर्षाची एक पिढी असे कायद्यात म्हटले आहे. म्हणजेच पंचवीस वर्षाच्या तिप्पट केले मोजले तर 75 वर्ष वनात वास्तव्य असा त्याचा अर्थ होतो.

देशाला स्वातंत्र्य मिळून केवळ 74 वर्षे झाली असून मुंबई ग्रामपंचायत कायदा पारित होऊन 62 वर्ष झाली आहेत. त्यामुळे 75 वर्षाचा पुरावा मिळणे प्रचंड अवघड असून केंद्र सरकारने वन हक्क कायदा दुरुस्ती करून तीन पिढ्यांची अट रद्द केली तरच इतर पारंपारिक वननिवासी ( गैर आदिवासी ) वन जमिनीचे मालक होऊ शकतील व पट्टे मिळण्यास पात्र ठरू शकतील. म्हणुन केंद्र सरकारने ही अट रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी नागपूर येथे विदर्भ चंडिका मंदिरासमोर होणाऱ्या केंद्र सरकारने निर्णय घेऊन ‘ विदर्भ राज्य निर्माण करा अन्यथा विदर्भातून चालते व्हा ‘, यासाठी आंदोलन होणार आहे. या आंदोलनात जिवती तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

यावेळी बोलतांना अँड. वामनराव चटप म्हणाले की, स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय शेतकरी आत्महत्या, कुपोषण, बेरोजगारी, लोकप्रतिनिधींची कमी झालेली संख्या हे प्रश्न आणि सिंचन व इतर क्षेत्रातील अनुशेष भरून निघू शकत नाही. बैठकीत विदर्भ राज्य आंदोलन आंदोलन समितीचे अध्यक्ष अँड. वामनराव चटप, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सुदाम राठोड, शेतकरी संघटना तालुका प्रमुख सय्यद शब्बीरभाई जागीरदार, कार्याध्यक्ष सैय्यद इस्माईल, स्वतंत्र भारत पक्ष तालुकाध्यक्ष देविदास वारे, उध्दव गोतावळे दलित आघाडी तालुकाप्रमुख, नगरसेवक मधुकर चिंचोलकर, युवा आघाडी तालुकाध्यक्ष अरविंद चव्हाण, सचिव विनोद पवार, डॉ. माधव पांचाळ, मच्छिंद्र मानकर, कोलाम फाऊंडेशनचे विकास कुंभारे, नरसिंग हामणे, गणेश कदम, रामेश्वर नामपल्ले, सायसराव कुंडगीर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.