महाराष्ट्राचे लाडके नेते : विलासराव देशमुख

32

(विलासराव देशमुख पुण्यतिथी विशेष)

विलासराव दगडोजीराव देशमुख साहेब हे मराठी, भारतीय राजकारणी होते. इ.स.१९७४ साली बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. विलासरावजी हे दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. हिंदी चित्रपटांतील अभिनेता रितेश देशमुख हा त्यांचा पुत्र आहे.विलासरावांचा जन्म दि.२६ मे १९४५ रोजी लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथे झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून बीएससी आणि नंतर कायद्याची पदवी घेतली. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी ते बाभळगावचे सरपंच झाले. तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीवर त्यांची खूप श्रद्धा होती आणि तुळजापूरचे तत्कालीन आमदार कै.साहेबराव हंगरगेकर यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.

युवक काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बॅंकेचे संचालक, पंचायत समितीचा उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असे करीत करीत ते इ.स.१९८०मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. इ.स.१९८२मध्ये बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिले नाही. पुढे इ.स.१९९५ पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण ते सदैव मंत्रिमंडळात राहिले. शिक्षण, कृषी, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी तत्परतेने पाहिला. १३ ऑक्टोबर १९९९ला विलासराव पहिल्यांदा आणि इ.स.२००४च्या निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पण इ.स.२००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्याने त्यांना आपले मुख्यमंत्री पद गमवावे लागले.

त्यांचा राजकीय प्रवास- १) इ.स.१९७४ बाभळगावचे सरपंच, २) इ.स. १९७४ ते ७९ सदस्य, उस्मानाबाद जिल्हा परिषद तसेच उपाध्यक्ष, लातूर तालुका पंचायत समिती. ३) इ.स.१९८०पासून १९९५पर्यंत आमदार, ४) इ.स.१९९५च्या विधानसभा निवडणुकीत पराभव. ५) पुन्हा इ.स.१९९९ ते २००९पर्यंत आमदार. ६) इ.स.१९८२ ते १९८५ दरम्यान राज्यमंत्री, ग्रामविकास, गृह, सामान्य प्रशासन, कृषी, परिवहन, शिक्षण, तंत्रशिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, माहिती व जनसंपर्क खात्यांचेही मंत्रिपद. ७) इ.स.१९८६ ते १९९५ या कालखंडात कॅबिनेट मंत्री. ग्रामविकास, कृषी, सहकार, दुग्धविकास व पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, शिक्षण आणि तंत्रशिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, परिवहन, संसदीय कार्य खात्यांचा कार्यभार. ८) १८ऑक्टोबर १९९९ ते जानेवारी २००३ मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म. ९) ११ नोव्हेंबर २००४ ते ७ डिसेंबर २००८ मुख्यमंत्रीपदाची दुसरी टर्म. १०) ऑगस्ट २००९मध्ये राज्यसभेवर निवड, ११) इ.स.२००९ ते २०११ दरम्यान केंद्रीय अवजड उद्योग खात्याचे मंत्री, १२) जानेवारी २०११ ते १२ जुलै २०११ ग्रामविकासमंत्री आणि पंचायत खात्याचा अतिरिक्त कार्यभार,१३) १२ जुलै २०११पासून विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री, असा होता.

इ.स.१९९५ साली शिवाजीराव कव्हेकर यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. हा त्यांच्या कारकीर्दीतला सर्वात मोठा हादरा होता. त्यानंतर काँग्रेसच्या बाहेर जाऊन शिवसेनेच्या मदतीने विधानपरिषदेवर येण्याचा त्यांचा प्रयत्नही फसला होता. पण पुढे दोनच वर्षात ९५ हजार मतांच्या फरकाने निवडून येऊन ते मुख्यमंत्री झाले.

विलासराव देशमुख यांचे दि.१४ ऑगस्ट २०१२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ०१:३० मिनिटांनी यकृताच्या आजाराने चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटल येथे निधन झाले. त्यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती आणि यकृताचा कर्करोग झाल्याने यकृताला सूज आली होती. त्यांच्या पार्थिवावर लातूर जिल्ह्यातील बाभूळगाव या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या १७ फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी अनेक राजकारणी, चित्रपट सृष्टीतील नामवंत आणि लाखो चाहत्यांचा समावेश होता.

!! स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन !!

✒️संकलक:-श्री एन. कृष्णकुमार जी. (से. नि. शिक्षक).मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी,ता. आरमोरी, जि. गडचिरोली.
मोबा. ७७७५०४१०८६.