वेल्हाणे येथील श्री चांगदेव महाराजांची आख्यायिका

35

धुळे तालुक्यातील वेल्हाणे हे गाव चांगदेव महाराजांच्या नावाने फक्त धुळे जिल्ह्यालाच नवे तर संपूर्ण खानदेशाला सोबत महाराष्ट्र व मध्यप्रदेश ला सुद्धा सुपरिचित आहे. दोन वर्षापासून चालू असलेल्या कोरोना महामारीमुळे मागच्या वर्षी साध्या व गाव पद्धतीने श्री.चांगदेव महाराज यांची यात्रा भरवण्यात आली होती. यावर्षीही वेल्हाणे ग्रामस्थ व प्रशासनाच्या सहकार्याने यात्रा ही स्थानिक स्वरूपात साजरी करण्यात येणार आहे. प्रतिवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक यात्रेसाठी येत असतात. यावर्षी ही कोरोना आजाराची महामारी जैसे थे तैसेच असल्यामुळे भाविक भक्त यात्रेकरूंना वेल्हाणे यात्रेसाठी नियमांचे पालन करूनच यावे असे आदेश ग्रामस्थ व प्रशासनाने दिले आहेत.

श्री चांगदेव हे स्वयंभू व जागृत देवस्थान आहे. जवळपास सातशे वर्षांची परंपरा या गावाला लाभली आहे. महाभारतातील पाच पांडव यांनी गौरवाचा कुरुक्षेत्राच्या मैदानात केलेला पराभव व त्या पराभवातून घडलेला रक्तपात गांधारीच्या शापाने भगवान श्रीकृष्णांचा यादव कुळाचा झालेला विनाश हे सगळे पाप माथी घेऊन भटकत असतांना त्यांनी बोद अवतार घेण्याचे ठरवले, आणि त्याप्रमाणे ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर यांनी वाघळी(चाळीसगाव), अर्जुन म्हणजेच चांगसुलतान वेल्हाणे अशा स्वरूपात अवतार घेऊन गावाचा, कुळांचा आणि भक्तांचा उद्धार केला. चांग आणि सुलतान असे दुहेरी नावाचे हे दैवत हिंदू व मुस्लीम ऐक्याचे प्रतिक आहे.

या देवाच्या अनेक आख्यायिका आहेत. वेल्हाणे गावातील ज्यांना सगळ्यात आधी देवाचा साक्षात्कार झाला ते निंबाबा भगत व त्यांचे सेवेकरी अजेंबसिंग पवार यांची पिढी आजही ती परंपरा प्रामाणिकपणे पार पाडत आहे.चांगदेव हे गवळी-धनगर समाज या दोन्हींची दैवत आहे. मंदिराच्या पायथ्याशी रतन तलाव आहे. वेल्हाणे गाव हेल्या गवळी या व्यक्तीच्या नावावरून गावाचे नाव वेल्हाणे असे पडले आहे.देवाने दिल्ली, हस्तिनापुर मध्ये साखळी सुलतान नाव धारण करून आसु आणि कासु या दोन भावांचा उध्दार केला आहे. तसेच धुळे तालुक्यातील शिरुड गावात कुकाबा, दगडुबा आणि लखमबा यांचा सुद्धा उद्धार केला आहे. असे हे जागृत देवस्थान या दैवताच्या जवळ प्रामाणिक पणे जो भाविक आपले दुःख दूर करण्याच्या इच्छेने भेट देतो, त्या भाविकाचे दुःख चांगसुलतान हे दैवत दूर करते अशा अनेक आख्यायिका भक्तांच्या बैठकीतून कानी पडतात.

श्रावण शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी चांगदेवांनी दगड फोडून स्वयम् अवतार घेतला आहे, म्हणूनच श्री.चांगदेव महाराजांची वेल्हाणे येथील यात्रा श्रावण शुद्ध चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच यंदाच्या 21 ऑगस्ट 2021 रोजी संपन्न होणार आहे. श्रावण शुद्ध तेरस या दिवशी पाच देवांच्या नावाने पाच काठ्या बसवल्या जातात. व श्रावण शुद्ध चतुर्थीच्या दिवशी त्या काठ्या उठवुन भक्तांच्या समूहाने गावभर वाजत-गाजत मिरविल्या जातात. आणि गावाबाहेरच्या श्री.चांगदेव महाराज मंदिराजवळ त्या काठ्यांची स्थापना केली जाते. आणि रक्षाबंधन(राखीपौर्णिमा) या दिवशी गावकऱ्यांची यात्रेमध्ये खरेदी-विक्री होते, अर्थात गावकऱ्यांची यात्राही रक्षाबंधन (राखीपौर्णिमा) या दिवशी असते. हे तीन दिवस गावकरी चांगदेव भक्त-भाविक हास्य व उल्हासात असतात. कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक भाविकांचे नवस या दिवशी फेडले जातात.

हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान असलेला श्रावण महिना गावकऱ्यांसाठी आणि भाविकांसाठी चांगदेव यात्रेच्या निमित्ताने एक नवी पर्वणी घेऊन येत असतो.आज जगावर जी परिस्थिती आहे, तीच परिस्थिती त्रिपार युगात जेव्हा रामराज्य होते, त्यावेळेस रावणासारखी महामारी तर द्वापारयुगात श्रीकृष्णसाठी कंसरूपी महामारी होती. त्यावेळी आदिमायेने दिलेला शाप आज कलियुगात जेव्हा-जेव्हा पाप वाढेल तेव्हा-तेव्हा संकटे येतील अशा स्वरूपात आज या कोरोना महामारीने पसरवला आहे.वेल्हाणे गावाच्या व पंचक्रोशीतील भाविक-भक्तांच्या आराध्य दैवतला, स्वयंभू, जागृत देवस्थानाला मनोभावे एकच प्रार्थना करुयात, जे संकट काल आज आणि उद्या या जगावर, देशावर, राज्यावर येणार आहे, आले आहे, ते लवकरात लवकर दूर करा व पुन्हा एकदा तो हसता खेळता महाराष्ट्र नावारूपाला येऊ द्या.तमाम वेल्हाणेकर ग्रामस्थांना व पंचक्रोशीतील श्री.चांगदेव महाराज भाविक-भक्तांना व यात्रेकरूंना श्री.चांगदेव महाराज यात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…!

श्री.चांगदेव महाराजांच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक-भक्तांनी कोरोना आजाराचे प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळून वेल्हाणे गावात या गावात आपले हार्दिक स्वागत…!

✒️लेखक:-जयदिप लौखे-मराठे(मुख्य संपादक दैनिक शिवरुद्राक्ष न्युज)

▪️मार्गदर्शक:- गौतम दादा वाघ