हिंदूंचा रक्षाबंधन- जैनांचा रक्षापर्व

30

हिंदू बांधवांच्या पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी पौर्णिमा ही राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन म्हणून पाळली जाते. तिलाच नारळी पौर्णिमासुद्धा म्हटले जाते. ही एकाच दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्याही दिवशी साजरी करतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पोर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. या विधीस ‘पवित्रारोपण’ असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते. उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो, अशी कामना करते. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे होय. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे होय.

काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना तर पत्नी पतीला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे, हीच यामागची भावना आहे. भारतीय समाजात ऐक्‍य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकांत रूढ झाला. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा होतो. या दिवशी बहिणी आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधतातच शिवाय त्या बंधुत्वसमान नाते असलेल्या व्यक्तीसही राखी बांधतात. विविध प्रकारच्या राख्या या दिवशी भावांना ओवाळून त्यांच्या हातावर बांधल्या जातात व आपले भावाविषयीचे प्रेम व्यक्त केले जातात. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, संय्यम आणि साहस होत. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचे नाते! पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे. आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे. स्त्रीचा सन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला उपदेश होय. फक्त स्त्री हक्क आणि स्त्रीला वरवर सन्मान देणाऱ्या आतल्या गाठीच्या लोकांना तिचे महत्व कळत नाही.

“यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:||
यात्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:||”

ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा म्हणजेच मान-सन्मान, सत्कार होतो तेथे लक्ष्मी निवास करते व सुशील, गुणी व उत्तम मुले घडतात. तर जेथे स्त्रीस सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही. हा विचार लहानपणापासून समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न या सणाद्वारे केला जातो.राखी शब्दातच रक्षण कर- राख म्हणजे सांभाळ, हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे. या सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकेय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. जैन लोक हा दिवस रक्षापर्व म्हणून पाळतात. त्या दिवशी जैन मंदिरातून राख्या ठेवलेल्या असतात. जैन मुनी त्यांचे आदराने ग्रहण करतात. उत्तर भारतात नोकर मालकाच्या हाताला राखी बांधतात.

आख्यायिका : रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली? याबद्दल निश्‍चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुराने देवांचा राजा इंद्राला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी त्यास विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुचीने विष्णूकडून मिळालेला एक दोरा इंद्राच्या हातावर बांधला. त्याच्या प्रभावाने इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गतवैभव परत आले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची रीत पडली, असे सांगितले जाते. तर हिंदू पौराणिक कथेनुसार महाभारत जे एक महान भारतीय महाकाव्य आहे. पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटाचे वाहते रक्त थांबवण्यासाठी साडीची किनार फाडून त्याच्या मनगटावर बांधली. कारण भगवान श्रीकृष्ण अनवधानाने स्वतःल जखमी झाले होते. अशा प्रकारे द्रोपदी व भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण होऊन रक्षण करण्याचे वचन दिले. ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मावतीने हुमायूँ बादशहाला राखी पाठवली व बादशहाने पण आपल्या या बहिणीचे बहादुरशहाच्या आक्रमणापासून संरक्षण केले.

दुसरा आलमगीर बादशहा दिल्लीवर राज्य करीत होता. त्याच्या प्रधानाने कट आखून बादशहाचा खून केला व प्रेत नदीत टाकून दिले. एका स्त्रिने ते प्रेत वाहून जाऊ नये म्हणून तिने ते पाण्याबाहेर काढले आणि प्रेताचा वाली येईपर्यंत जवळ बसून राहिली. बऱ्याच वेळानंतर बादशहाच्या शोधात सैनिक तेथे आले. बादशहाचा मुलगा शहाआलम याने त्या हिंदू स्त्रीचे आभार मानून तिला आपली बहीण मानले. ती स्त्री पुढे दरवर्षी त्याला राखी बांधू लागली. ही प्रथा पुढे अकबरशहा व बहादूरशहा यांनीही चालू ठेवली. मुघल बादशहानी पवित्र मानलेला हिंदूंचा हा एकमेव सण आहे.

“येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:।।
तेन त्वामपि बंधनामि रक्षे मा चल मा चल॥”

महाबली दानवेंद्र बळीराजा जिने बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधतो. हे रक्षे, तू चलित होऊ नकोस. यावरून मूळचे हे बंधन राजासाठी होते असे कळते.या श्रावण पौर्णिमेला ‘पोवती पौर्णिमा’ असेही म्हणतात. कापसाच्या सुताच्या नवसुती- नऊ धाग्यांची जुडी करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तशीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात. श्रावण पोर्णिमेसच श्रावणी असे देखील म्हटले जाते. पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानाने वेदपुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव साजरे करीत. तर कुमारांच्या शिक्षणाचा प्रारंभ करण्याचा मुहूर्त याच काळात काढला जाई. अध्ययनाचा प्रारंभ, शौर्याचे शुभचिन्ह या दोन गोष्टी मनोमन लक्षात ठेवणे व तसे आचरण करणे म्हणजे श्रावणी साजरी करणे होय. श्रावण नक्षत्रावर श्रावणी करतात. हा सण म्हणजे बहिण भावाचे अतूट नाते दाखवतो.

!! श्रावण पौर्णिमेच्या समस्त बंधुभगिनींना आभाळभर हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री निकोडे कृष्णकुमार गोविंदा[भारतीय सण-उत्सवांचे गाढे अभ्यासक.]मु. पिसेवडधा, ता. आरमोरी,जि. गडचिरोली (७७७५०४१०८६).