ही कृतीची लागवण तिथे अनुकरणाची उगवण कि अनुभवाचे बाळकढू..!

30

“एक आव्हानात्मक संकेत”

मी माझ्या काही महत्त्वाच्या कामाकरीता शहरात गेलो होतो. कामाच्या स्थळी जात असतांना शहराच्या मेन रोडवर अगदी मध्यभागी ब-याच लोकांची गर्दी जमली होती. त्यामुळे आपसुकच माझे पाय तिकडे वळले होते. मला कळून चुकलं होतं की, तिथे अपघात घडला असेल आणि जवळ जाऊन बघतो तर काय ? तो अपघातच होता. तिथे कदाचित जड वाहनांच्या वाहतुकीने रोड खरडल्यामुळे एक मोठा खल म्हणजेच खड्डा पडला होता आणि त्यात एक सामान्य कुटूंबातील छोटासा मुलगा पडला होता. त्याला स्वत:हून काही बाहेर पडता (निघता) येत नव्हतं. आजूबाजूला बघ्यांची जमलेली गर्दी…यामुळे बिचारा तो इतका घाबरला होता की, त्याच्या चलबिचल अवस्थेमुळे नुसता मुसमुस रडत होता. काही केल्या त्याचं रडणं थांबतच नव्हतं.बघ्यांमधील ब-याच व्यक्तींनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी त्याला त्याचा हात द्यायला सांगत होते. पण तो काही प्रतिसाद द्यायला तयार नव्हता. अशाप्रकारे शर्यतीचे प्रयत्न करूनही हाती अपयशच लागत होतं.

एवढ्यात मी तिथे गेलो होतो. मला बघताच तो हलकासा स्मितहास्य केला होता. तेव्हा तेथील बरेच व्यक्ती अचंबित झाले होते आणि हे साहजीकच होतं. एवढे सारे लोकं असतांना त्याच्यात कसलाच फरक पडत नव्हता. मग मला बघताच का..? त्यातील बरेच मला म्हटले होते की, बेटा! मगांपासून आम्ही याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. पण तो काही प्रतिसाद न देता सतत रडतच आहे. मात्र तुला बघताच त्याच्या चेह-यावर हास्य फुलले. याचं कारण काय आहे, ते तू सांगू शकतो का ? तू त्याला ओळखतो का ? मग हा तुला ओळखतो…अशा कितीतरी प्रश्नांचा वर्षाव माझ्यावर होत होता. पण त्यावेळी त्यांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेसुध्दा उपलब्ध नव्हतं. मी पण थोडा अवाक झालो होतो. माझ्या मनात विचारांचं दावानल पेटलं होतं. विचारा अंती तेथील पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर माझ्यावर आकाशवाणी झाल्यागत माझ्या डोक्यात प्रकाश पडला होता की, “हा देणा-यांमधील नाही तर घेणा-यांमधील आहे.”

कारण ज्या व्यक्तींनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, त्या व्यक्तींनी त्याला त्याचा हात द्यायला सांगत होते. नेमक्या याच कारणामुळे तो कदाचित प्रतिसाद देत नव्हता. शेवटी मी त्याला म्हटलं, “बाळा! तुला वर यायचं आहे ना!” तर तो उत्तरादाखल केवळ मान हलवून संकेत दिला होता. तेव्हा मी परत म्हटलं, “बाळा! माझा हात घे आणि पटकन वर ये बरं!” असं म्हणून मी त्याला माझा हात त्याच्या हातात देताच तो क्षणाचाही विलंब न करता माझा हात त्याच्या हातात करकचून पकडला होता. तेव्हा कुठे तो वर आला होता. अशाप्रकारे या अथक प्रयत्नाला अखेर यश मिळालं. त्याच्या या वर्तवणूकीने असं लक्षात आलं की, तो खूप बिकट परिस्थितीतून आपल्या जीवनाची वाटचाल करीत होता. त्याला ब-याच वर्षाचा अनुभव असल्यागत तो सर्वांना आपल्या अनुभवाचे बाळकढू पाजत होता. हे निर्विवाद सत्य नाकारता येत नाही.समाजप्रियतेच्या गप्पा मारणारी रुढीप्रिय वयस्क मंडळी आजही आपल्या जुन्या विचारानाच चिपकून आहे.

ते आपल्या अनुभवाचे बोल सांगताना म्हणतात, “आम्ही तुमच्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहून आहोत.” हो! आम्हाला पण मान्य आहे. तुमच्या काळात खूप पाऊस असायचा…पण त्यामुळे जनसंपर्क तुटलेला असायचा…म्हणून माहितीचा अभाव होता, हवी ती माहिती मिळत नव्हती. पण आज काळानुरुप खूप बदल झालेला आहे. त्यामुळे तुम्ही याची उलट परिस्थिती का विसरता ? आजच्या आधुनिक स्थितीत आजची युवा, त्याहीपेक्षा कुमार हे तुमच्यापेक्षा चार उन्हाळे (कडक) जास्त पाहत आहेत म्हटलं तर अतिशयोक्ती तर होणार नाही. कारण आजच्या युवा आणि कुमारांपुढे माहितीचे असंख्य द्वार खुले असल्यामुळे ज्ञानाचं एक भांडारच आहे. एकूणच बोटांवर माहिती खेळत आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे या बाळाच्या बाळकढू वरून असं दिसून येतं की, आजच्या युवांपुढे हे वयस्क व्यक्ती काहीच नाही आणि ही युवा या बालकांपुढे शून्य आहे. असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

✒️शब्दस्पर्शी- सुनील शिरपुरे(कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-7057185479)