दीप प्रज्वलन: एक आत्मपरीक्षण!

76

जीवन हे दिव्याच्या वातीप्रमाणे आहे, तुम्ही जगातल्या भौतिक गोष्टीमध्येच बुडून गेलात तर तुमच्या जीवनात आनंद आणि ज्ञान येऊ शकणार नाही. याच जगात राहूनसुध्दा भवसागरात न बुडता एक टोक बाहेर ठेवू शकला तर आनंद आणि ज्ञानरूपी प्रकाश आपल्या जीवनात पडेल. मातीचा दिवा म्हणजे शरीर व तेलाची वात म्हणजे ज्ञान. ज्ञानाचा प्रकाश हाच आपण आपल्या अंतर्त्म्यात जागृत ठेवायचा आहे. इतरांचेही हृदयमंदिर प्रकाशित करायचे आहेत. श्रीकृष्णदास (बापू) निरंकारीजीं यांचा हा खास ज्ञानवर्धक लेख वाचकांच्या सेवेत… संपादक.

दिवाळी हा रोषणाईचा सण, लखलखत्या दिव्यांनी वातावरणातल्या अंधःकाराचे साम्राज्य दूर सारण्याचा. आयुष्य तेजोमय, प्रकाशमय आणि दिव्याच्या ज्योतीसमान पवित्र करण्याचा सण म्हणजेच दीपावली होय. दीप म्हणजे प्रकाश आणि आवली म्हणजे ओळ. प्रत्येक जागेतला कोपरा न कोपरा प्रज्वलित करणारी व त्याचबरोबर आपल्यालाही त्या तेजात प्रकाशमान करून तेजोमय करणारी ही दिवाळी. हा तेजाचा उत्सव आपल्या आतील प्रकाशाला म्हणजेच आत्मप्रकाशाला या बाहेरच्या प्रकाशाने जागृत करायचे. घेतलेले ज्ञान- शिक्षण इतराना वाटायचे व त्यांनाही ते प्रसारित करण्यास प्रेरणा द्यायची असते. उपनिषदांतील प्रार्थना ‘तमसो मा ज्योतिर्गमय।’ म्हणजेच अंधारातून मला प्रकाशाकडे ने! दीपावलीचा हाच संदेश- अंधारातून प्रकाशाकडे जाणे होय. त्याचप्रमाणे अज्ञानाकडून ज्ञानाकडे, दुःखातून आनंदाकडे, नैराश्यातून उत्साहाकडे, अंधश्रद्धेतून विज्ञानाकडे, अनीतीकडून नीतीकडे, दुष्कृत्यातून सत्कृत्याकडे, असमाधानातून समाधानाकडे, गरीबीतून श्रीमंतीकडे जाणे होय. दीपावली म्हणजेच दिव्यांचा उत्सव. जो स्वत: प्रकाशतो किंवा दुसऱ्यायाला प्रकाशित करतो तो दीप होय. संस्कृत सुभाषित ग्वाही देते-

“दीप्यते दीपयति वा स्वं,
परं चेति इति दीपः।।”

पंचमहाभूतांतल्या तेजाचं प्रतीक म्हणजे दिवा मग तो लामणदिवा असो वा साधी पणती असो. दिवा हा अग्नी- तेजाचेच रूप. मिणमिणत्या पणतीपासून ते झळाळत्या आकाशकंदिलापर्यत, समईच्या स्निग्ध ज्योतीपासून ते भुईनळ्यापर्यंत आणि आंघोळीत केलेल्या औक्षणातील निरांजनापासून ते सप्तरंगाची बरसात करणाऱ्या बाणापर्यंत सर्वत्र भरून पुरून उरले आहे, ते म्हणजे फक्त तेज आणि तेजच! दीपावलीच्या सप्तरंगी इंद्रधनुष्यात रमा एकादशी, गुरुद्वादशी- वसुबारस, आश्विन वद्य त्रयोदशी- धनत्रयोदशी, आश्विन वद्य चतुर्दशी- नरकचतुर्दशी, अमावस्या- लक्ष्मीपूजन, कार्तिक शुद्ध प्रतिपदा- बलिप्रतिपदा आणि भाऊबीज. अशा सप्तरंगाच्या ओळीत ही दीपावली येते व तस-तशाप्रकारचे ज्ञान प्रसार व प्रेरणा पेरून जात असते. चौथ्या शतकातल्या पद्मपुराणात आणि सातव्या शतकातल्या स्कंद पुराणात दिवाळीचे वर्णन आढळते. आपण नुसत्या पणत्या व आकाशकंदील लावून दिवाळी साजरी करतो. पण ते एक प्रतीकात्मक आहे. हा सण वरवर प्रकाशाचा, आसमंत उजळून टाकणाऱ्या पणत्यांचा खरा. परंतु पणती व तिची ज्योत हे एक सुंदर रूप आहे ज्ञान व ज्ञानदानाचे!

घनदाट काळोखाला भेदण्याचे सामर्थ्य एवढ्याशा एका पणतीत असते. आपल्या भोवतालच्या अंधाऱ्या विचारांना, परिस्थितीला भेदण्याचं काम अंतर्मनातील एक छोटीशी पणती करू शकते, त्यासाठी हा दीपोत्सव अर्थात ज्ञानदानोत्सव महत्त्वाचा ठरतो. फक्त दिवे लावून अंगण उजळणे एवढाच दिवाळीचा अर्थ नाही, तर अंगणात लावलेल्या या दिव्यांनी आपल्या मनाचा गाभाराही उजळला पाहिजे. तो अंगणही उजळतो त्याचबरोबर आपले काया-वाचा-मनही.दिवाळी धनश्रीमंतांचे इमलेही उजळते आणि मनश्रीमंतांचे दरवाजेही उघडते. दिवाळी बाहेरील तिमिराला प्रकाशमान तर करतेच; पण त्याबरोबरच आपल्या मनावर साठलेलं मळभ दूर करून प्रसन्नतेची, उल्हासाची ज्योत जागृत करते. दिवाळी या नावातच दिव्याचं अस्तित्व दिसतं.

“पणत्यांचा लखलखाट,
दारी आकाशदिव्यांचा थाट|
दिवाळीसण दिव्यांचा,
आणतो जणू चैतन्याची पहाट||”

लखलख चंदेरी चांदण्यांनी आकाशाचा निळा गाभारा सजलेला आहे. थंडीचा हलकासा अत्तरस्पर्श उन्हालाही मऊ-मुलायम बनवतो आहे. दिव्यांचा केशरी-पिवळसर प्रकाश अंधःकार दूर करत आहे. प्रकाशाचा हा प्रसन्न उत्सव म्हणजेच दीपावली. जीवनातला अंधार दूर सारून उजेडाला सामोरे जाण्याचा उत्सव, दीपोत्सवात घर-दार आणि देवघर जसे दिव्यांनी उजळायचे, तसेच अंतरीचे क्षीण झालेले दिवेही स्नेहाच्या फुलवातींनी उजळायचे असतात. आपल्या आशा-आकांक्षाचे क्षितीज निरभ्र असले, की मग अंतरीचे आकाशही उजळून तेजोमय होते.
ज्ञानाचा दिवा सतत प्रज्ज्वलित ठेवून अज्ञान, अंधःकाराचा नाश करणे म्हणजेच खरी दीपावली साजरी करणे होय. दिव्याचे माहात्म्य ‘कालिका’ पुराणात भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितले-

“दीपेन लोकान् जयति दीपतेजोमयः स्मृतः
चतुर्वर्गप्रदो दीपस्तस्माददीपं यजेत प्रिये||”

दीपांमुळे लोकांवर विजय मिळवता येतो. दीप हे तेजोमय, धर्मार्थ, कामनादायी, मोक्षप्रद आहेत. म्हणून त्यासाठी ज्ञानदीप प्रज्ज्वलित करायला हवेत. यासाठी मातीच्या, धातूच्या दिव्याबरोबरच आपल्या अंतःकरणातल्या प्रेरणेचा, चैतन्याचा दीप जागृत करायचा, असा अंतःकरणातला दिवा प्रज्ज्वलित असेल तर संवेदना, भावना, विचार यांच्या शलाका म्हणजेच ज्योती तेजाळ होतील आणि मग तुम्ही इतरांच्या अंतःकरणावर विजय मिळवू शकाल. भगवान तथागत गौतम बुद्धांनी ‘अत्त दीपो भव’ म्हणजेच तुम्हीच तुमचे दिवे व्हा, असा संदेश दिला. चांगल्या वर्तनाचा प्रकाश स्वतःप्रमाणेच इतरांचेही आयुष्य उजळून टाकतो. आज माणसाचे मन अंधारात चाचपडतंय, त्याला स्वतःचा उजेड मिळेनासा झालाय, त्यासाठी त्याने स्वतःच स्वतःचा दिवा व्हायला हवाय-

“दिवा तपति आदिच्चो रत्तिं आभाति चन्दिमा।
सन्नध्दो खत्तियो तपति झायी तपति ब्राह्मणो।
अथ सब्बमहोरत्तिं बुद्धो तपति तेजसा।।२६.४।।”

[पवित्र धम्मपद: गाथा क्र.३८७: अट्ठकथा क्र.२६- ब्राह्मणवग्गो.]
(अर्थ- दिवसा सूर्य तळपतो, रात्री चंद्र प्रकाशतो. सज्ज असल्यास क्षत्रीय तळपतो, ध्यानस्थ बसल्यावर ब्राह्मण प्रकाशतो. हे अंशकालिक झाले. मात्र कायमदायम बुद्ध- प्रज्ञावंत अथवा प्रतिभावान मनुष्य अहोरात्र आपल्या तेजाने झळाळत असतो. त्याला रोजच दिवाळी असते.)
दिवाळीची अमावस्या म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचा उत्सव मानला जातो. घराघरातली स्त्री ही या लक्ष्मीचे रूप मानूनच तिला गृहलक्ष्मी म्हटले आहे. स्त्रीच निरपेक्ष प्रेम करू शकते. जसे कवीने म्हटले-

“एकच ठावे काम मला,
प्रकाश द्यावे सकलाला।
कसलेही मज रूप मिळो,
देह जळो अन् जग उजळो।।”

दिव्याचे प्रतीक असलेली ही इवलीशी पणती समाजातल्या प्रत्येक घटकाला आपलेसे करून प्रत्येकाला समसमानच प्रकाश देते. आजच्या बदलत्या जीवनशैलीत प्रत्येक जण स्वतःच्या चौकटीत असताना, आपल्या शैलीत बदल करता करता जीवन तर बदलत नाही ना? याकडे प्रत्येकानेच लक्ष द्यायला हवे. दिवाळीतल्या या दिव्यांकडून आपणही हेच शिकले पाहिजे, की आपले काम, स्वरूप कसेही असो; पण त्यातून जग उजळले पाहिजे. हे जग उजळवताना फटाक्यांमुळे वायु प्रदूषण होणार नाही, पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, याची काळजी घेतलेली बरी. दिव्यांची रोषणाई जरूर करावी; पण विजेच्या वापरावर नियंत्रण ठेवून विजेची बचतही करायला हवी. दिवाळी हा आसमंत उजळवून टाकणाऱ्या प्रकाशाचा क्षण. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे अंधार दूर करण्याचा सण होय. खरं तर अंधार म्हणजे सूर्याने पाठ फिरवल्यावर मागे पडणारी सावली किंवा सूर्यास्तानंतर निर्माण होणारी काळ्या रंगाची अमर्याद पोकळी. आज अवतीभवती दिसणारी असुरक्षितता, भयभीत वातावरण, सुविधांचा अभाव, सर्वच क्षेत्रात उठलेले भ्रष्टाचाराचे काहूर, बेजबाबदार वागणे हे पाहिले की मन अस्वस्थ होते. स्त्री-शक्तीची पूजा बांधणाऱ्या आपल्या या देशात, स्वतःच्या घरात ‘तिला’ सुरक्षित वाटते का? कोवळ्या वयात आत्महत्येचे धाडस पाहिले की अंधाराची व्याप्ती दिवसेंदिवस फारच मोठी होत असल्याचे जाणवते; कारण या सगळ्या गोष्टी एका अर्थाने अंधाराचीच रूपे आहेत. या सणाच्या निमित्ताने दिसणारा प्रकाशाचा लखलखाट आठवड्यापुरताच असतो.
“मातीचा दिवा हो, कापसाची वात हो!” या म्हणीप्रमाणे पणतीतली वात तेवण्यासाठी, वातही तेलात बुडालेली असावी लागते आणि त्याच वेळी तिचे एक टोक बाहेरही असावे लागते. अन्यथा ती प्रकाश देऊच शकत नाही. या दिवाळीच्या निमित्ताने आज खऱ्या अर्थाने मने उजळायला हवीत. सद्याच्या ताणतणावाखाली आपण स्वतःलाच नीट पाहत नाही. या प्रकाशात स्वतःलाही पाहून घेऊ या. संत निरंकारी मिशनचे निरंकारी बाबा संतशिरोमणी हरदेवसिंहजी महाराज स्पष्ट करतात-

“छट जाये अज्ञान अंधेरा तो फिर रोज़ दिवाली है।
ज्ञान उजाला डाले डेरा तो फिर रोज़ दिवाली है।
झूठ पर मन की विजय हो तो फिर रोज़ दिवाली है।
कहे ‘हरदेव’ सत्य की जय हो तो फिर रोज़ दिवाली है।”
[सम्पूर्ण हरदेव बाणी: पद क्र.२४२.]

विवेकाचा उजेड मनामनात पेरण्यासाठी दीपावली ही तर आपल्यासाठी पर्वणीच. त्यासाठी आज आपण प्रतीकात्मक पद्धतीने हा प्रकाशोत्सव साजरा करू या. जिथे प्रकाश असेल तिथे तो जागता ठेवू, जिथे तो नसेल तिथे त्याला जाग आणू. तेजस्वी दिव्यांच्या लखलखाटात आपल्या सर्वांमध्ये सामावलेल्या शुभशक्तींना जागे होण्याचे आवाहन करू. अवघे जीवन प्रकाशमय करून दीपावलीतील या तेजस्वी जाणिवांनी आपली ज्योत उजळणे, हाच प्रज्ञावंत अंतर्यामींचा खरा दीपोत्सव- ज्ञानदानोत्सव ठरेल.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे ज्ञानदान-दीपोत्सवाच्या समस्त भावंडांना प्रकाशमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️संतचरणरज:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी(भारतीय सण-उत्सव, आत्मज्ञान आणि ज्ञान-विज्ञानाचे गाढे अभ्यासक-विश्लेषक)c/o प. पू. गुरूदेव हरदेव कृपानिवास.मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली, व्हा. नं. ७४१४९८३३३९.
इमेल- krishnadas.nirankari@gmail.com.