पैनगंगा प्रकल्पातर्गंत कोलमाईन्स प्रकल्पग्रस्तांना वेकोलीने नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात-पालकमंत्री विजय वडेट्टीवार

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.9नोव्हेंबर):- पैनगंगा प्रकल्पातर्गंत कोलमाईन्स प्रकल्पग्रस्तांना वेकोलीने नागरी सुविधा तातडीने उपलब्ध करून दयाव्यात. तसेच स्थानिक नागरिकांच्या याबाबतीत असलेल्या अडचणींवर चर्चेतून तोडगा काढावा.पुढील 15 दिवसात याबाबत पुन्हा आढावा घेण्यात येईल,असे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित पैनगंगा प्रकल्पातर्गंत कोलमाईन्स प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, महानगरपालीका आयुक्त राजेश मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, व्यवस्थापक वणी क्षेत्र आर.बी.सिंह, उपप्रबंधक वेकोली वणी क्षेत्र रोहित मेश्राम, अधिक्षक एम.वाय.पुरटकर यांच्यासह लाभार्थी श्री. देवगडे, मारोती पिंपळकर, गौतम धोटे यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नुकताच पैनगंगा कोलमाईन्स येथे दोन कामगारांचा अपघाती मृत्यु झाला.औद्योगिक जिल्हयात अशा पध्दतीच्या दुर्घटना घडणे योग्य नाही. म्हणून प्रकल्पप्रमुखांनी सर्व कामगार कायदयांचे पालन करावे. तसेच या कामगारांच्या मृत्यूची चौकशी आठवडयाभरात करण्याचे निर्देश त्यांनी अपर पोलीस अधिक्षकांना दिले.जिल्हयात मोठया प्रमाणात कोळशांच्या खाणीमध्ये कामगार कार्यरत आहेत. त्यांना कामगार कायद्याप्रमाणे वेतन व भत्ते वेळेत मिळावे.अनेक कारखान्यांमध्ये वेतनाबाबत तफावत आहे. त्यात समानता असावी तसेच करार तत्वावरील कामगारांना त्याच्या श्रमाचा योग्य तो मोबदला खाण प्रशासनाकडून देण्याचे कडक निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

जमीनीच्या भुसंपादनाचा मोबदला व पुनर्वसनसंदर्भात स्थानिक शेतकऱ्यांशी वाटाघाटी व चर्चा करण्याचे त्यांनी निर्देशीत केले.
कोळसा खाणीमुळे त्या भागात मोठया प्रमाणावर धुळ होते. यासाठी पर्यावरण विभागाने वेळोवेळी पाहणी करून नियमभंग करणाऱ्यांविरूध्द कारवाई करावी. तसेच त्या धुळीवर खाण व्यवस्थापनाने पाणी टाकावे, जेणेकरून धुळीमुळे रस्त्यांवरील अपघात होणार नाही.पैनगंगा प्रकल्पातर्गंत मौजा विरूर गाडे येथील 72 कुटुंबाचे पुनवर्सनाकरीता जलदगतीने काम करावे. पात्र उर्वरीत 38 कुटुंबापैकी 19 कुटुंबाचे पुनवर्सनस्थळी भुखंडाचा विकल्प बदलाच्या प्रस्तावांवर व अनुदानाचा विकल्पास मंजुरी देण्यात यावी.

कोणत्याही प्रकल्पग्रस्तांचा न्याय हक्क न डावलता काम करावे. तसेच या 19 कुटुंबाचे पुर्नवसनाचे काम सहा महिन्यात पूर्ण करण्याची सूचना श्री.वडेट्टीवार यांनी दिले.जिल्हयातील कोळसा खाणीमुळे शेताचे रस्ते बंद झाले, तर नदी प्रवाह बदलले असून याबाबत ड्र्रोन सर्व्हे करावा. अल्ट्राटेक सिमेंट उदयोगातील कामगार आणि पर्यावरणाबाबत आढावा घेतांना कामगारांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था कार्यस्थळी उपलब्ध करून देण्यात यावी. यावेळी कामगारांनी त्यांच्या अडचणी मांडल्या.नगर जिल्हयातील नुकत्याच घडलेल्या दुदैर्वी घटनेपासून बोध घेउून जिल्हयातील सर्व शासकीय रूग्णालयामध्ये अग्नीशमन यंत्र उभारण्याचे त्यांनी सांगितले.