भारतीय संविधान आठवा: प्रजासत्ताक साठवा!

32

[गणराज्य दिवस विशेष]

भारतातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तसेच शासकीय-खाजगी संस्था, ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी ध्वजवंदन केले जाते आणि भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त केला जातो. लेखाद्वारे या अविस्मरणीय दिवसाची आठवण ताजी करत श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी आपले मन पुलकित करण्याचा प्रयत्न करत आहेत.२६ जानेवारीचा हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. दि.२६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. अन्य दोन- स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट व गांधी जयंती २ ऑक्टोबर हे आहेत. या दिवशी भारताची राजधानी नवी दिल्ली येथे एक मोठी परेड- संचलन राजपथ मार्गावरून निघते. भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय सणाचा दिवस आहे. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान समितीने दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान स्वीकारले व दि.२६ जानेवारी १९५०पासून ते अंमलात आणले गेले. पं.जवाहरलाल नेहरू यांनी दि.३१ डिसेंबर १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची- स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.

या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते, राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्णदिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या दिवशी शाळा, महाविद्यालय शासकीय कार्यालय यांमध्ये विविध कार्यक्रमांसह भाषणे आयोजित केली जातात. संविधान प्रास्ताविकेचे मोठ्याने वाचन केले जाते.भारताला दीडशे वर्षांहून अधिक कालावधीतील ब्रिटीश राजवटीपासून दि.१५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्यलढा आणि त्यातील म.गांधींच्या अहिंसा पद्धतीचा मोठा हातभार आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे मात्र भारतीय राज्यशासनाच्या सन १९३५ सालच्या कायद्यावर- कलमावर आधारित होते. दि.२९ ऑगस्ट १९४७ रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे दि.४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला होता. तब्बल २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचारविमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती- हिंदी आणि इंग्रजी या दि.२४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. म्हणून भारतीय संविधानाच्या निमित्ताने हा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा करण्यात येऊ लागला.

दरवर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत म्हणजे नवी दिल्ली येथे एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक व अमर जवान ज्योती येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राणार्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तेवढ्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आणि २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोकचक्र आणि कीर्तिचक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते. भारतीय फौजा- नौदल, पायदल, वायुसेना यांचे वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे-क्षेपणास्त्रे जसे- पृथ्वी, अग्नी, रणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. भारताच्या विविधतेतून एकता या वैशिष्ट्याला ही मानवंदना असते. या संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी विशेष काळजीपूर्वक व शिस्तीने केली जाते, इतके या संचलनाचे महत्त्व आहे. नवी दिल्ली येथे होणार्‍या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात. शेवटी बीटिंग रिट्रीट ‎या कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता केली जाते.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या ओळी, तिरंंगा ध्वज आदी संंकल्पनांचा कल्पकतेने वापर करून परस्परांना शुभेच्छा दिल्या जातात. देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन परस्परांमधले ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहनही केले जाते..

!! पुरोगामी एकता परिवारातर्फे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशप्रेमी बंधुभगिनींना हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलन व सुलेखन:-‘अलककार’- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी(म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी.)मु. पो. ता. जि. गडचिरोली,व्ह. नं. ९४२३७१४८८३.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com