बीडमधील जलयुक्त शिवार घोटाळा; 90 लाखांच्या वसूलीचे प्रशासनाचे आदेश तर तक्रारदारांकडून आरोपींच्या अटकेची मागणी

41

✒️नवनाथ आडे(विशेष प्रतिनिधी)

बीड(दि.17फेब्रुवारी):-जिल्ह्यातील बहुचर्चित जलयुक्त शिवार घोटाळ्याप्रकरणी आता कारवाईला सुरुवात झाली आहे. औरंगाबाद विभागाच्या कृषी सहसंचालकांनी जलयुक्त शिवार घोटाळ्या तील संस्था आणि अधिकाऱ्यांना 90 लाख रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. या जलयुक्त शिवार आतील घोटाळ्यासंदर्भात आत्तापर्यंत परळीतील अनेक अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई झालेली असून त्यांना संबंधित रक्कम तातडीने भरण्यासाठी नोटीस ही बजावण्यात आली आहे. काँग्रेस (Congress) नेते वसंत मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनामध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर मागच्या अनेक दिवसापासून याची चौकशी सुरू आहे.

दोषींना अटक कधी होणार? काँग्रेस नेते वसंत मुंडे यांचा सवाल

जलयुक्त शिवार या कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केली होती. याप्रकरणी नव्वद लाख रुपयाची रिकव्हरी करण्याचे आदेश देखील कृषी विभागाने दिले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत तीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या गोळ्यामधील आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकले असतानाही आरोपींना अटक का होत नाही? असा सवाल काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, जलयुक्त शिवारच्या कामात अनियमितता आणि गैरप्रकार याचा तपास करण्यासाठी पाच पथकामार्फत चौकशी करण्यात आली होती. या पथकाने 15 टक्के कामाची निवड तपासणीसाठी केली होती. तसेच एकूण 815 कामांपैकी 123 कामे निवडण्यात आली होती. त्यापैकी 103 कामांची तपासणी झाली ज्यात 95 कामांमध्ये अनियमितता झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या कामांमध्ये नव्वद लाख रुपयाच्या वसूल पात्र असलेल्या संस्थांन नोटीस देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील एकूण 62 कंत्राटदार संस्था आणि अधिकारी कर्मचार्‍यांकडून या रकमेची वसुली केली जाणार आहे.