धनंजय मुंडेंचा शब्द ठरला खरा, बीड जिल्ह्याला आणखी १४२ कोटींची मदत मिळाली

31

🔹संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने मदत वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114

बीड(दि.18फेब्रुवारी):-महाराष्ट्रातील बहुतांश भागात जून ते सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानभरपाई पोटी राज्य शासनाने वाढीव दराने उर्वरित मदत वितरित करण्याचा शासन आदेश महसूल व वन विभागाच्या वतीने जारी केला आहे. याद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून १०३५ कोटी १४ लाख रुपये वितरित करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यापैकी मराठवाड्यात सर्वाधिक मदत बीड जिल्ह्यात मिळाली असून बीड जिल्ह्यासाठी १४२ कोटी ३१ लाख रुपये मदतीपोटी विभागीय आयुक्त कार्यालयास प्राप्त झाले आहेत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनी केलेल्या भाषणात अतिवृष्टी अनुदानाची उर्वरित २५ टक्के मदत मिळवून देण्याचा शब्द दिला होता. हा शब्द खरा ठरला असून जिल्ह्यास सर्वाधिक १४२ कोटी ३१ लाख रुपये मदत प्राप्त झाली आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने मदत वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. खरीप हंगामात पिके ऐन बहरात असताना बीडसह मराठवाड्यात पावसाने थैमान घातले होते. अतिवृष्टी, पुरामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.

धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिलासा देण्यासाठी १६ वेळा दौरे केले होते. त्यानंतर मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसेच औरंगाबाद येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून बीड जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती अवगत करून दिली. जिल्ह्याला भरीव निधी देण्याची मागणी मुंडे यांनी वारंवार केली होती. त्यानुसार राज्य शासनाकडून जाहीर झालेल्या विशेष आर्थिक पॅकेजमधून बीड जिल्ह्यात नुकसानीच्या ७५ टक्के प्रमाणे ५०२ कोटी रुपये मदत मिळाली होती. तर आता उर्वरित २५ टक्के वाढीव दराने १४२ कोटी रुपये मंजूर करून वितरित करण्यात आले आहेत. मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.