तर मुख्याधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातच कोंडणार : शेतकरी कामगार पक्षाचा इशारा

31

✒️प्रतिनिधी गडचिरोली(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.7मार्च):-काही दिवसांपूर्वी गडचिरोली शहरातील फुटपाथ धारकांशी चर्चा करतांना पर्यायी व्यवस्था आणि गाळे वाटपाबाबत नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सकारात्मक आश्वासन दिले असतांना ते पुर्ण न करताच अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाने सामान्य फुटपाथ धारकांना व्यवसायापासून वंचित करण्याचे प्रयत्न राजकीय दडपणाखाली येवून नगर परिषदेचे मुख्याधिकारी करीत आहेत. हा प्रकार तात्काळ थांबला नाही तर शेतकरी कामगार पक्षातर्फे मुख्याधिकाऱ्यांना त्यांच्याच कार्यालयातच कोंडणार असल्याचा जबरदस्त इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी दिला आहे.भाई रामदास जराते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मागील पंधरा दिवसांपूर्वी नगर परिषद, महामार्ग विभागांनी पोलिस विभागाच्या मदतीने गडचिरोली शहरातील फुटपाथ अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली होती.

यामुळे हजारो कुटुंबांच्या उपजिविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली फुटपाथ धारकांचे आंदोलन उभे करण्यात आले होते.यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष, वंचित आघाडी सह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.दरम्यान मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी आंदोलकांशी चर्चा करतांना शहरातील पक्क्या इमारतींचे अतिक्रमण सरसकटपणे हटवून सर्वीस रोड तयार करणे, ५८५ फुटपाथ धारकांना तात्पुरती पर्यायी जागा आणि कारगिल चौकातील गाळे देण्याबाबत अनुकुलता दर्शविली होती. लांझेडा लगतच्या तलाव परिसरात जागाही नियोजित केली गेली, मात्र डुक्कर बसण्याच्या खड्ड्यांमध्ये दुकाने लावणे शक्य नसल्याने फुटपाथ धारक सदर जागा व्यवस्थीत होण्याची वाट बघत होते.

असे असतांना शहरातील बड्या भांडवलदारांच्या आणि काही राजकीय लोकांच्या दडपणाखाली येवून, दिलेले आश्वासन न पाळता पुन्हा फुटपाथ धारकांना हटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विकासाच्या नावाखाली सामान्य माणसाला व्यवसायापासून वंचित करण्याचा प्रयत्न शेतकरी कामगार पक्षातर्फे हाणून पाडले जाणार असून वेळ प्रसंगी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातच कोंडण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा भाई रामदास जराते यांनी दिला आहे.