मीडियाची तोंडावाटे हगवण आणि तीन सभा!

30

काल कशाला अगदी परवापासून तीन सभांचे ‘ब्रेकिंग न्यूज’ च्या नावे मीडियाची मुखाद्वारे सतत् हगवण होत होती. अगदीच किळसवाणा प्रकार होता.असे त्यांचेच मत होते ज्यांनी हा प्रकार ‘आंखो देखी’ बघितला.साहेब निघाले,साहेब इथे पोहचले,साहेब जेवतात,साहेब झोपतात पर्यंतच्या ‘ब्रेकिंग न्यूज’ दाखवल्या जात होत्या.या निमित्ताने माजलेले नेते आणि पत्रकारितेची पातळी किती खाली गेली,हे पुन्हा बघायला मिळाले आणि त्याच बरोबर मीडिया (काही अपवाद) राज्य कर्त्यांची किती बटीक झाली,हे ही सिद्ध झाले.याची प्रचिती वारंवार येते हे त्यापेक्षा भयंकर!

काल 1 मे कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिवस होता.या दिनानिमित्त राज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.मात्र लोकांची नजर होती ती तीन सभांवर. एक औरंगाबादची राज ठाकरेची सभा,मुंबई येथील भाजपची बूस्टर डोज सभा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेची शासकीय सभा.सकाळपासून मीडिया ब्रेकिंग न्यूजच्या नावाने काहीही दाखवत होते आणि आम्हीही काहीही बघत होतो.एकाच वेळी तिन्ही सभा लाईव्ह दाखवण्याची स्पर्धा,भाटगीरी सर्व चॅनल्स करीत होत्या.टीआरपी पेक्षा आपणच कसे ‘जवळचे’ हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न होत होता.नंतर त्याचे त्यांना फायदे मिळतात.मात्र काळ सुकावतोय!

या तिन्ही सभा म्हणजे ‘खोदा पहाड निकला चुंहा’ किंवा शिळ्या कढीला ऊत म्हणू या.उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करून कामगारांना शुभेच्छा देण्याची औपचारिकता पार पाडली. राज्याचे कर्ते- धर्ते म्हणून कामगारांच्या प्रश्नांवर,लोकांच्या महागाई,बेरोजगारी,आरोग्य,शिक्षणावर बोलणे व त्यावर मार्ग काढणे अपेक्षित होते.मात्र त्यांनी आपली नैतिक जबाबदारी पार पाडली नाही.केवळ इव्हेंट म्हणून बाहेर पडणे मुख्यमंत्री ठाकरे यांना शोभा देत नाही.ते काय करतील आणि काय बोलतील हे त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा कळत नसावे. कालच्या कार्यक्रमाच्या एका मिनिटाच्या तयारीसाठी झालेला लाखोंचा खर्च अर्थात सरकारच्या तिजोरीतून झाला आणि तो वाया गेला,हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही.मुख्यमंत्री महोदय केवळ कामगारांना शुभेच्छा देऊन जातात,याला काय म्हणावे?. या शुभेच्छा सुद्धा शरद पवारांना विचारून दिल्या नसतील अशी आशा करू या.एवढे मात्र खरे उद्धव ठाकरेंची सभा ही कामगारांसाठी वांझोटी ठरली.

भाजपचे काय तर ‘सैया बन गये थानेदार अब डर काहे का?’ या उक्ती प्रमाणे सुरू आहे.तुम्ही नरेंद्र मोदीला, भाजपला विरोध करता काय? मग तुम्ही देशद्रोही,हिंदुद्रोही.देशद्रोह्याची नवीन व्याख्या-संकल्पना भाजप ने जन्मास घातली आहे.त्यांची मग्रुरी कालच्या सभेत जाणवली. कामगारांचे निमित्त करून घेतलेल्या सभेत फडणवीस महाशय ‘ब्र’ सुद्धा काढत नाहीत.उलट मस्जिद पाडण्यात माझा किती आणि कसा वाटा होता,हे गर्वाने सांगतात.बाबरी पाडल्यानंतर देशात जो नरसंहार झाला त्याला फडणवीस जबाबदार आहेत.हे अधोरेखित झाले आहे.मात्र तज्ज्ञांचे विश्लेषण आले नाही.उलट टीव्हीचे अँकर व पत्रकार तोंडाला फेस येई स्तोवर सतत अपडेट देत होते.हे अधःपतन म्हणावे की लाचारी ?

बेडकाला फुगवून बैल केला जावू शकतो,असा भाबडा समज बहुदा मीडियाला आला असावा.तसा प्रयोग त्यांनी आधी अण्णा हजारेवर केला आणि आता राज ठाकरेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.राज हा मीडियामान्य नेता आहे, जनमान्य नाही.केवळ भाषणाने आणि मिमिक्री केल्याने टाळ्या मिळतात.बौद्धिक मान्यता नाही.आम्ही व्यक्तीपूजेचे विरोधक असलो तरी आमची मान्यता आहे की लोकांच्या मनात घर निर्माण करायचे असेल तर नैतिकता,चारित्र्य आणि प्रामाणिकता असावी लागते,जी आजच्या नेत्यांमध्ये नाही. अशा या वातावरणात मीडियाची महत्वाची भूमिका असते मात्र त्यांनाही आपली विश्वासहार्यता गमावली आहे. मीडिया आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा नादात स्वाभिमान सुद्धा गहाण ठेवला आहे.कालची राज ठाकरेची सभा म्हणजे,खोदा पहाड निकला चुंहा अशी झाली.तेच मुद्दे,तीच भाषा,तेच हावभाव (खरे तर चेहऱ्यावर हावभाव नसतातच) त्यामुळे मागच्या सभेचा व्हिडीओ तर आपण पाहत नाही ना ? असा प्रश्न पडत होत.याचा अर्थ असा की मस्जिद,भोंगे,शरद पवार,पुरंदरे या मुद्द्यांपलीकडे त्यांच्याकडे काही नाही.पोहऱ्यात येण्यासाठी आडात असावे लागते. ते जे पेरू पाहतात ते कदापि उगवणार नाही.कारण ही भूमी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराणे सिंचित झाली आहे.

मीडिया आपल्या मुख्य उद्देशापासून भरकटत चाललेला आहे.तशी आजच्या ब्राह्मणी आणि भांडवली मीडिया कडून आम्ही फार काही अपेक्षा करीत नाही.ज्यांचा इतिहासच (पत्रकारिता संदर्भात) भेदाभेद निर्माण करणारा असेल तर त्यांचा वर्तमान आणि भविष्य ही तसेच असेल.जेंव्हा बाळ गंगाधर टिळक यांनी पत्रकारिता सुरू केली तेंव्हा शूद्र-अतिशूद्राला त्या वृत्तपत्रात स्थान नव्हते.टिळकांना आदर्श ठेवून व त्यांचा कित्ता गिरवत आजची पत्रकारिता केली जात आहे. या पत्रकारितेला पर्याय द्यायचा असेल तर आम्हाला आपली मीडिया निर्माण करावी लागेल.टिळकांच्या वृत्तपत्रात आम्हाला स्थान मिळत म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक सुरू केले नव्हते तर त्या काळात ती गरज होती.बाबासाहेब म्हणतात,”अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासारखी वृत्तपत्रासारखी अन्य भूमीच नाही.” या संदेशातून आज सुद्धा आम्हाला बोध घ्यावा लागेल आणि आजच्या माध्यमांना नवा पर्याय द्यावा लागेल.

✒️जीवन गावंडे(नागपूर)मो:-7350442920