आपल्या कामातच पांडुरंग विठ्ठल आहे ही संत सावतांची शिकवण कृतीत आणूया!

96

संत सावता महाराज यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन. संत सावता महाराज यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असणाऱ्या आरण गावी झाला.परसोबा व नागीताबाई हे त्यांचे आईवडील.जन्मवर्षं इसवीसन १२५० हे आहे,जन्मतारखेबाबत अभ्यासकात मतभेद आहेत. लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान व चौकसवृत्ती असणारे संत सावता यांच्यावरती योग्य संस्कार घरच्या वातावरणात झालेले होते. वारकरी विचारांची परंपरा त्यांच्या घराण्यात होती.संत सावता यांचं मूळ घराणं हे औसे तालुका मिरज जिल्हा सांगली येथील होते.संत सावता महाराज यांच्या पत्नीचे नाव जनाबाई होते, त्या भेंडी गावचे भानवसे यांच्या कन्या होत्या.संत सावता यांना एक मुलगा होता,त्याचे नाव विठ्ठल जो अल्पायुषी ठरला.तर मुलगी नागुबाई होती.जी वसेकर घराण्यात दिली होती.त्यांचेच वारस आज आरण येथील विश्वस्त आहेत! आरण हे पंढरपूर पासून अवघ्या तीस किलोमीटरवर असणारे गाव आहे. जे संत सावता यांच्यामुळे प्रसिद्ध झाले आहे.पंढरपूरला महाराष्ट्रभरातून सर्व संताच्या दिंड्या पालख्या जातात.मात्र आरण येथून पालखी पंढरपूरला जात नाही तर पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी ही आरणला संत सावता महाराज यांच्या भेटीला येते. म्हणजे स्वतः विठ्ठल पांडुरंग हे संत सावता यांच्या भेटीसाठी येतात! यावरून संत सावता यांचे महत्व व कर्तृत्व आपल्या सहजपणे लक्षात येते! म्हणून तर वारकरी धर्माचा पाया रचणारे संत नामदेव महाराज त्यांच्या विषयी म्हणतात,

धन्य ते आरण,नररत्नांची खाणं। जन्मला निधान, सावता तो।। सावता सागर, प्रेमाचा आगर। धरिला अवतार माळ्याघरी।। धन्य त्याची माता,धन्य त्याचा पिता। साठविला दाता त्र्येलोक्याचा,नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धारिला माळीयाचा।।
रत्नांची खाण हे विशेषण फार मौलिक आहे.आपल्याला सोने,मोती हे मौल्यवान वाटते, तेच आपण पाहतो,जपतो.रत्न बहुमोल आहे. महासागर आणि आगर हे विशालता,विपुलता ज्यांच्याकडे असते त्यासाठी असते.तसे प्रेमाची विपुलता संत सावता यांच्याकडे होती.संत नामदेव महाराज त्यांच्या आई-वडिलांना धन्यता देतात. मनुष्य जीवनाची सफलता ही त्याचं कर्म यावर अवलंबून असते.अनेकदा हयातीत त्याने केलेले कर्म जर हे चांगले असतील तर त्याच्यानंतरचे त्या व्यक्तीचा गौरव करीत असतात. संत सावता महाराज यांच्या बाबतीतही हेच घडले आहे,आज आपण सातशे वर्षानंतर त्यांचा स्मृतिदिन साजरा करत असताना त्यांच्या कार्याची कर्तृत्वाची आठवण काढत आहोत.त्यांच्या कृतीविचारातून बोध घेणे आवश्यक आहे! नाहीतर अनेकांना आपल्या आजोबाचा जन्म व मृत्यू कधी झाला हे माहीत नाही! इतिहास हा त्याग,समर्पण आणि शौर्याचा सांगितला जातो.

संत सावता यांच्या जडणघडणीत संत नामदेव महाराज यांचा मोलाचा वाटा आहे. संत सावता यांनी त्यांना मार्गदर्शक मानले होते.संत नामदेव यांचे अनेक अभंग त्यांनी मुखदगत केले होते. नामदेवांनी सांगितल्याप्रमाणे ते स्वतः ही अभंगरचना करत असत.ज्याप्रमाणे चंद्रभागेच्या वाळवंटात उभे राहून संत नामदेवांनी सर्वांना समजेल,त्यातून त्यांचा उद्धार होईल असा पांडुरंग विठ्ठल सनगीतला त्याच भूमिकेचा अवलंब व वारसा संत सावता यांनी पुढे नेला. दिवसभर शेतात राबताना चित्त विठ्ठलाच्याकडे असे,आपण करत असलेले काम प्रत्यक्ष विठ्ठल पाहत आहे,तो सोबत आहे त्यामुळे ते पूर्ण समर्पित होऊन ते काम करत.

काम करत करत ते अभंग रचना करत. त्यांच्या अभंगाला शब्दबद्ध करण्याचे काम काशीबा गुरव यांनी केले. ते सतत संत सावता यांच्या सोबत राहत.काशीबा गुरव संत सावता यांना आपले वडीलबंधु समजत. संत नामदेवाच्या संघटनमधील संत सावता, संत ज्ञानेश्वर,संत नरहरी, संत सेना,संत गोरोबा, संत चोखोबा,संत बंका, संत जनाबाई व काशीबा गुरव अशी संत मंडळी होती. या सर्वांना संत नामदेव मार्गदर्शक होते. या सर्वांच्या सुखदुःखासह त्यांना अभंगरचना व कीर्तन प्रवचन प्रबोधन यासाठी संत नामदेव महाराज सर्वोत्तपरी मदत करत!संत सावता महाराजांनी फक्त भक्ती करत न बसता त्यास कृतीची जोड दिली आहे.आपण आपले काम प्रामाणिकपणे, समर्पित व उत्तमपणे करावे. त्यातच विठ्ठलाची सेवा आहे.
अभंगामध्ये ते म्हणतात,

कांदा मुळा भाजी।अवघी विठाई माझी। लसूण मिरची कोथिंबिरी।अवघा झाला माझा हरी। ऊस गाजर रताळू।अवघा झालासे गोपाळू। मोट नाडा विहीर दोरी।अवघी व्यापीली पंढरी।सावता म्हणे केला मळा। विठ्ठल पायी गोविला गळा।।
आपल्या कर्मांमध्ये विठ्ठल आहे.शेतीतून पिके ,भाजीपाला घेण्यासाठी शेताची नांगरणी, वखरणी,पेरणी,निंदणी,खत व वेळेवर पाणी देणे ही कामे करावी लागतात.रोपांची भाजीपाल्याची पोटच्या मुलांप्रमाणे काळजी घेतली तरच पीक उत्तम येईल. नसता नुकसान होते. काम करत असतांना विठ्ठल विठ्ठल हे चिंतन सुरू असते, ते चिंतन पिके,फळे भाजीपाला ऐकतात.आनंदी होतात आणि तसाच प्रतिसाद देतात. माझा पांडुरंग विठ्ठल कांदा,मुळा भाजी, लसूण मिरची कोथिंबीरी,ऊस,गाजर,रताळु यात आहे. तर पंढरी म्हणजे पंढरपूर माझ्या मोट नाडा विहीर दोरी यामध्ये सामावलेली आहे. माझं सर्वस्व हे विठ्ठलाला अर्पण केले आहे. म्हणजेच हर घडी काम करत असताना पंढरीचा पांडुरंग विठ्ठल हे सर्व बघतोय म्हणून ते काम मी पूर्ण निष्ठेने केले पाहिजेच.
संत सावता महाराज म्हणतात,

प्रपंच असुनी परमार्थ साधावा।वाचे आठवावा पांडुरंग।उचनीच काही न पहावे सर्वथा। पुराणीच्या कथा पुराणीच।। घटका आणि पळ साधी उतावीळ। वाउगा तो काळ जायू नेदी। सावता म्हणे कांते,
जप नामावळी। हृदयकमळी पांडुरंग।।
प्रपंच म्हणजे संसार, व्यवहार करत रहावे. प्रपंचात सतत चिंतन हे पांडुरंगाचे असावे.पुराणे,पोथ्या,श्रुती,स्मृती ही थोतांड आहेत,जी विषमतेचे समर्थन करतात म्हणून उच्च-निचता,भेदाभेद मानू नयेत.घराला लिंबू मिरच्या आणि उलटी काळी बाहुली बांधून चौकटीला लटकवतात याची कीव वाटते! लिंबू मिरच्या या खाण्यासाठी असतात एव्हढीही अक्कल तुम्हांला नसावी यापेक्षा दुसरी काय शोकांतिका असावी!कर्मकांड,शुभा-अशुभ असं काही नसते,काम करण्यासाठी सर्वकाळ हा योग्य आहे! अमावस्या पौर्णिमा या तिथी आहेत,त्या शुभ अशुभ असं काही नसते हे भूगोल शिकूनही समजत नसेल तर तुमच्याएव्हढे हुशार तुम्हीच!ज्यांच्या अंतःकरणात सर्वांसाठी स्नेह माया असते त्याच्या ठिकाणी निश्चितच पांडुरंग असतो!
याला दुजोरा देतांना अभंग

सत्कर्मात व्हावे रत,मोक्ष मिळो हातोहात।सावताने केला मळा।विठ्ठल देखीयला डोळा।
किंवा
योग याग तप धर्म।सोपे वर्म नाम घेता।तीर्थव्रत दान अष्टांग।याचा पांग आम्हा नको।।
या अभंगामधून संत सावता महाराजांनी प्रत्येक बंधू बहिणी यांनी उद्योगी असलं पाहिजे, कष्ट,मेहनत केले पाहिजे. त्याने कोणते का होत नाही परंतु काम केलं पाहिजे,सन्मार्गाने,सचोटीने पैसा कमावला पाहिजे.म्हणजेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गाथेत
चाकरी वाचून खाणे।
अनुचित वेतन।
धनी काढूनी निजा।करील कामाची पूजा।उचितावेगळे अभिलाषे तोंड काळे। सांगे तरी तूका।पहा लाज नाही लोका।।
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आपल्या अखंडात,
जळो जळो तुमचे जिने।
उद्योगा आधी ताजे खाणे।
हे बा कृत्य लाजिरवाणे। समजोत कपटी शहाणे।
घ्यावी घ्यावी माझी भाक।
जरी का सांगे अनेक।
स्वकष्टाने पोटे भरा।
ज्योती शिकवी फजित खोरा।।

हा संतानी,महापुरुषांनी दिलेला आदेश आपण सर्व बहुजन बांधवांनी शिरोधार्य मानून तसं वागणं असावं. असे जर वागलो तर खऱ्या अर्थाने आम्ही या संताचे महापुरुषांचे वारसदार आसू. नाहीतर आमच्यात विचार व कृतीत भेसळ आहे असं समजायला हरकत नाही!

बोकडे,कोंबड्या या देवीच्या नावावर कापणे ही कशी अंधश्रद्धा आहे हे त्यांनी लोकांना पटवून दिले.या नवस फेडण्याच्या कर्मकांडातून होणारी कलागत,भांडण यातून लोकांनी बाहेर पडावं.यासाठी त्यांनी लोकांचे प्रबोधन केले. याचबरोबर होम-हवन यज्ञयाग,दोरे-गंडे,अंगारे-धुपारे, तंत्र-मंत्र यातून बहुजन समाजाला कसं फसवलं जाते हे त्यांनी दाखवून दिले.अशा अनिष्ट प्रथातून बाहेर पडावं यासाठी संत सावता महाराजांनी आपल्या कीर्तनातून संदेश दिला. पंढरपूरच्या विठ्ठलाला नारळ,हार ,अगरबत्ती असं काहीच लागत नाही आणि ‘मध्यस्थ’ ही लागत नाही!

वेद श्रुती शास्त्रे पुराणे श्रमली। परी तया विठ्ठल गम्य नाही।
ते या पुंडलिका सुलभ पै जाहले।उद्दाराया आले भीमातटी। सावता म्हणे विठ्ठल दयाळा। लागो नेदी मळ भाविकांशी।।
चार वेद ,अठरापुराण,श्रुती स्मृती या सर्वांपेक्षा विठ्ठल प्रचंड आहे. त्यामुळे यात गुरफटून न राहता फक्त विठ्ठलाची भक्ती करावी. भक्त पुंडलिक यांनी जो मार्ग दाखवला आहे, तो विठ्ठला पर्यंत जाण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.तोच अनुसरावा,असे संत सावता महाराज म्हणतात.

अंधश्रद्धाळू रूढी परंपरा याचे समर्थन करून आज त्यावर बहुजन समाजाला दावणीला बांधणारे बाबा बापू कापू अम्मा स्वामी माँ आणि त्यांचे पुजारी या सर्वांवर संत सावता यांनी कठोर शब्दात प्रहार केले होते.हेच आम्ही विसरलो आहोत! संत सावता महाराज सर्व बहुजन समाजातील बांधवांना सोबत घेऊन भजन,कीर्तन, प्रवचन प्रबोधन करायचे. ज्यात महार, मांग, कुंभार,चांभार,माळी,साळी,गुरव
कुणबी असे सर्व होते. जसे की
भेदाभेद भ्रम अमंगळ।
वा
आमची एकाचीच वीण।
तेथे कैचे भिन्नभिन्न।
या न्यायाने ते समतेचे वारकरी मार्गदर्शक होते.संत सावता यांची कीर्ती महत्व सर्वदूर पसरले होते.साहजिकच काही विशिष्ट लोकांची पोटदुखी वाढली होती.ओंकार भट व चांडाळ चौकडी संत सावता महाराज यांना त्रास देत.हा सावता पोथीपुराण मानत नाही. होम-हवन याला किंमत देत नाही.पूजाअर्चा करत नाही. दर्शनाला जात नाही.विठ्ठलाला मानतो परंतु पंढरपुराला जात नाही. संस्कृत भाषेचा अपमान करतो. खालच्या जातीच्या लोकांना सोबत घेऊन जेवतो, भजन कीर्तन करतो. पण संत सावता महाराज आपले कर्म करीत राहतात. हे जो भेदाभेद करतात तो चुकीचा आहे, हे संत सावता महाराजांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे.

भली केली हीन याती।नाही वाढली महती। जरी असता ब्राह्मण जन्म।तरी हे अंगी लागते कर्म।स्नान नाही संध्या नाही।यातिकुळ संबंध नाही। सावता म्हणे हीन याती।कृपा करावी श्रीपती।
म्हणजेच जातीने हीन जरी असला आणि कर्म हे चांगले असतील तर विठ्ठल त्या भक्ताला भेटतो.जाती कुळ याचा काही संबध नाही. जातीने ब्राह्मण असला,स्नानसंध्या करीत असला पण कर्म करीत नसेल व त्याचे दुष्कर्म असेल तर त्याचा उपयोग नाही! संत सावता महाराज यांना एकूण 45 वर्षाचे आयुष्य लाभले.आषाढ वद्य चतुर्दशीला शके १२१७ ला म्हणजे १२जुलै १२९५ ला त्यांनी आरण येथे समाधी घेतली. आयुष्यात त्यांनी प्रबोधनाचे जे कार्य केले ते निश्चितच आमच्या सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. सतत कामात राहून ,उत्तम व्यवहार करून स्वतःची प्रगती करावी.कोणत्याही कामाची लाज न बाळगता इमानदारीने काम करावे.आज आमच्या महाराष्ट्रात कष्ट करण्याची, प्रवृत्ती लोप पावत आहे.इथे राजस्थानचे कारागीर येवून लाखो रुपये कमवून नेतात!पाणीपुरी,भेळवाला दिवसांत सहजपणे हजार रुपये कमवतो! काही महाराष्ट्रातील बांधवाना फुकटच्या,मित्रांच्या वा नेत्यांच्या फेकलेल्या तुकड्यावर जगण्याची ऐतखाऊ वृत्ती सोडून द्यावी लागेल!ती दीर्घकाळ व्यवस्था नसते! तुमचा वापर झाला की तुम्हांला कचराकुंडीत फेकून दिलं जाणारं! ठरवा काय करायचे ते तुमचं तुम्ही!
संत सावता एका अभंगात म्हणतात,
आमुची माळीयाची जात।शेत लावू बागाईत।आम्हां हाती मोट नाडा।पाणी जाते फुलझाडा। शांती शेवंती फुलली। प्रेम जाई जुई व्याली।सावताने केला मळा।विठ्ठल देखिला डोळा।।
सुधारित पद्धतीने शेती करून उच्च दर्जाचे उत्पादन मिळवावे. फुलझाडं फळझाडे यांचे संवर्धन करून त्यापासून ही उत्पन्न मिळते.वृक्षारोपण व संवर्धन करणे म्हणजे संत सावता व संत तुकाराम महाराज यांचा विचार अभंग कृतीत आणणे होय. जास्तीत जास्त वृक्षारोपण करून संवर्धन करूया.संत सावता यांना आपला आदर्श मानणारे सर्व बंधू बहिणी या फक्त विठ्ठलाची सेवा करतील, इतर देवाचे तोंड ही पाहणार नाहीत अशी अपेक्षा करण्यात आली आहे. जत्रा यात्रा, कंदुऱ्या,आसरा,मरीआई यात गुरफटणार नाहीत! कारण संत म्हणतात विठ्ठलवाचून ब्रह्म जे बोलती ते वचन संती मानू नये. म्हणजे विठ्ठला व्यतिरिक्त असलेले नाव संताचे नाही,ते उच्चारू नये! एक विठ्ठलची खरा बाकीचा पसारा वाउगाची। हा अभंगही ध्यानात घ्यावा! वेगवेगळ्या धातूचे,कागदाचे चिखल-मातीचे,अतिरिक्त हात पाय,तोंड असणारे, जनावरांचे अवयव,वाकडे तिकडे आकार असणारे देव व त्यांची कर्मकांडयुक्त पूजाअर्चा म्हणजेच पाखंड आहे! त्यांना संत तुकाराम महाराज शेंदरी हेंदरी दैवते।कोण ती पूजे भुते खेते।आपुल्या पोटासाठी इतरा पिडी।काय ती देईल बराडी। या शब्दांत त्यावर प्रहार करतात! आपण सर्व संत सावता व राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांची शिकवण ध्यानात धरूया! आमची मती ,नीती,गती ,वित्त आणि स्वाभिमान ही पंचसूत्री हवी असेल तर त्यासाठी एकच गोष्ट करावी ती म्हणजे विद्या संपादन होय! ती ही सत्यविद्या! संत सावता यांच्या सारखे चौकस व बुद्धिमान बनण्यासाठी प्रयत्न करूया.त्यासाठी आम्ही आमचा वेळ,बुद्धी,श्रम आणि पैसा राष्ट्रव्यापी संघटन यांना Payback करूया!

✒️हभप रामेश्वर तिरमुखे(राज्यप्रभारी, सत्यशोधक वारकरी महासंघ, महाराष्ट्र राज्य)Mob.9420705653